चामोर्शी : तालुक्यातील मुरखळा येथे कृषी विभागाच्यावतीने मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याप्रसंगी शेतकऱ्यांना निकृष्ठ चारा सकस करण्याचे प्रात्यक्षिक कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून करून दाखविण्यात आले.यावेळी कृषी व पशुसंवर्धन सभापती अतुल गण्यारपवार, जि.प. सदस्य राजू आत्राम, जिल्हा परिषदेचे मोहीम अधिकारी व्ही. जे. महाजन, कृषी विभागाचे उंदीरवाडे, देशमवाड, वाडीभस्मे, पशुधन विकास अधिकारी डॉ. देवकुळे, डॉ. सचिन भोयर आदी मान्यवर उपस्थित होते. ग्रामीण भागातील नागरिकांचा एकमेव व्यवसाय शेती आहे. त्यामुळे ग्रामीण भागात पशुधन मोठ्या प्रमाणात आढळून येते. मात्र या पशुधनाची योग्य काळजी शेतकरी वर्गाकडून घेतली जात नाही. परिणामी या पशुधनाचे आयुष्यमान कमी आहे व कार्यक्षमतासुध्दा कमी आहे. पशुधनाचे आरोग्य चांगले राहण्यासाठी सकस चारा मिळणे आवश्यक आहे. धानाची तणीस, सोयाबीन, तूर, चना, लाखोरी आदींच्या फोलापासून बनलेला कुटार यांचा वापर केला जातो. हा सर्व चारा व्यवस्थितरित्या ठेवल्या जात नाही. परिणामी त्याचा दर्जा खालावतो. त्याचबरोबर सदर चारा पशु पाहिजे त्या प्रमाणात खात नाही. दिवसेंदिवस जंगलाचे प्रमाण कमी होत चालल्याने गुरांना चराईसाठी जागा उपलब्ध राहत नाही. त्यामुळे जंगलातही जनावरांना पोटभर चारा मिळत नसल्याने जनावरांना घरच्या चाऱ्यावरच अवलंबून राहावे लागते. घरचा चाराही निकृष्ठ राहत असल्याने जनावरांचे आयुष्य व कार्यक्षमता कमी होते. कृषी विभागाकडून यावर्षी सकस चारा बनविण्याचे प्रात्यक्षिक शेतकऱ्यांना करून दाखविण्यात येत आहे. सकस चारा बनविण्याची पध्दत अत्यंत साधीसोपी आहे. प्रात्यक्षिकानंतर असंख्य शेतकऱ्यांनी सकस चारा बनविणे सुरूही केले आहे. याचा फायदा शेतकरीवर्गाला होण्याची शक्यता कृषी विभागाने वर्तविली आहे. (शहर प्रतिनिधी)
सकस चारा बनविण्याचे प्रात्यक्षिक
By admin | Updated: July 21, 2014 00:12 IST