विसोरा : विद्यार्थ्यांचे शाळेमध्ये ये-जा करणे सुकर व्हावे, यासाठी मानव विकास मिशनने बस उपलब्ध करून दिल्या आहेत. त्याचबरोबर काही बसेस विद्यार्थ्यांच्या शाळा सुटण्याच्या वेळेवर सोडल्या जातात. मात्र या बसमध्ये सामान्य प्रवाशांचीच अधिक गर्दी राहत असल्याने विद्यार्थिनींना उभ्याने प्रवास करावा लागत आहे. तर काही विद्यार्थिनींना जागाच होत नसल्याने त्यांना बसस्थानकावरच ताटकळत बसावे लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे. विद्यार्थिनींच्या गळतीचे प्रमाण कमी व्हावे, या उद्देशाने शासनाने विद्यार्थिनींचा प्रवास मोफत केला आहे. त्याचबरोबर ज्या मार्गावरून विद्यार्थी जातात, त्या मार्गावर मानव विकास मिशनच्या बस सोडाव्या व इतरही बस चालविण्यात याव्या, असे सक्त निर्देश शासनाच्या मार्फतीने आगाराला देण्यात आले आहेत. त्यानुसार शाळा सुटण्याच्या वेळेवर बहुतांश बसेस सोडल्या जातात. या बसेसचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांची वाहतूक करणे हा आहे. मात्र या बसमध्ये सामान्य प्रवशांनाहीबसविले जाते. सायंकाळच्या सुमारास घराकडे जाणारे अनेक प्रवाशी सुध्दा एसटीला मिळतात. हेच प्रवाशी एसटीमधील बहुतांश सीट व्यापतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना बसण्यास जागा शिल्लक राहत नाही. कधीकधी एसटी पूर्णपणे भरून राहत असल्याने विद्यार्थिनींना एसटीमध्ये प्रवेशही मिळत नाही. त्यामुळे बसस्थानकावर ताटकळत राहावे लागत आहे. ही परिस्थिती विसोरा बसस्थानकावर नेहमीच बघायला मिळते. देसाईगंज-कुरखेडा मार्गावरून अनेक बसेस चालत असल्या तरी सायंकाळच्या सुमारास बहुतांश बसेस प्रवाशांनी भरून येत असल्याने कित्येक तास विद्यार्थिनींना वाट बघत राहावे लागते. (वार्ताहर)
विद्यार्थ्यांसाठी असलेल्या बसमध्ये प्रवाशांचीच गर्दी
By admin | Updated: July 11, 2015 02:21 IST