लाेकमत न्यूज नेटवर्क
आष्टी : चामाेर्शी तालुका विस्ताराने अतिशय माेठा आहे. आष्टी परिसरातील शेवटच्या गावातील व्यक्तिला तालुकास्थळी जाण्यासाठी ८० ते ९० किमीचे अंतर पार करावे लागते. त्यामुळे आष्टी तालुक्याची निर्मिती करण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख राकेश बेलसरे यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनातून केली आहे.
आष्टी हे गाव चंद्रपूर जिल्ह्याची सीमा संपल्यानंतर पहिलेच गाव आहे. येथील लोकसंख्या दहा हजारांच्या जवळपास आहे. आष्टी येथे स्वतंत्र पोलीस स्थानक आहे. या पोलीस स्थानकअंतर्गत ६० गावांचा समावेश आहे. येथे महसूल मंडलांतर्गत पाच सजे आहेत. ग्रामीण रुग्णालय, राष्ट्रीयीकृत स्टेट बँकेची शाखा, ग्रामीण बँक, जिल्हा मध्यवर्ती बँक तसेच परिसरातील मोठी बाजारपेठ आहे. चामोर्शी हे तालुक्याचे ठिकाण आष्टीपासून ३५ किमी अंतरावर आहे. प्रत्येकवेळी लहान - सहान कामासाठी चामोर्शी येथे जाणे नागरिकांना परवडणारे नाही. काम न झाल्यास मानसिक त्रास सहन करावा लागते. आष्टी तालुका झाल्यास परिसरातील ५० ते ६० गावातील लोकांना आपली प्रशासकीय कामे करणे सोयीस्कर होईल. परिसरातील नागरिकांच्या अडचणी व जनभावना लक्षात घेऊन आष्टीला तालुका म्हणून घोषित करावे, अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली. याप्रसंगी शिवसेना उपजिल्हाप्रमुख राकेश बेलसरे, राजू एडलावार, कपिल पाल, मंगेश पोरटे, रवी आलचेट्टीवार, छोटू दुर्गे, सत्यशील डोर्लीकर, संतोष बारापात्रे आदी उपस्थित होते.