गडचिरोली : छत्तीसगडमध्ये जवान व माओवाद्यांमध्ये चकमकीचे सत्र सुरु असतानाच ९ जून रोजी सकाळी ११ वाजता माओवाद्यांनी भूसुरुंग स्फोट घडवून आणला. या भ्याय हल्ल्यात महाराष्ट्रातील सुपुत्र व मूळचे नागपूरचे आयपीएस अधिकारी व छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्याच्या कोंटा विभागाचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक आकाश राव गिरीपुंजे (४६) हे शहीद झाले. इतर काही अधिकारी व कर्मचारी जखमी आहेत.
माओवाद्यांचा सर्वोच्च नेता व मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचा महासचिव नंबाला केशव राव उर्फ बसवा राजू याचा सुरक्षा जवानांनी २१ मे रोजी झालेल्या चकमकीत खात्मा करण्यात आला होता. या चकमकीत एकूण २७ माओवादी ठार झाले होते. दरम्यान, बसवा राजूच्या स्मरणार्थ व सरकारच्या निषेधार्थ माओवाद्यांच्या केंद्रीय समितीचा सदस्य भूपती उर्फ अभय याने १० जून रोजी बंदचे आवाहन केले होते. या पार्श्वभूमीवर सुकमा जिल्ह्यात ९ जून रोजी सकाळी माओवादविरोधी अभियान राबविण्यात येत होते. या मोहिमेत कोंटा विभागाचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक आकाश राव गिरीपुंजे हे स्वत: जवानांसोबत पायदळ गस्तीसाठी रस्त्यावर उतरले होते. कोंटा-एर्राबोर मार्गावरील डोंड्रा गावाजवळ माओवाद्यांनी आधीच सापळा रचून ठेवलेला होता. रस्त्याच्या खोल भागात लपवलेला स्फोटक सापळा गस्ती दरम्यान अचानक उडवण्यात आला. स्फोट इतका जबरदस्त होता की, अतिरिक्त अधीक्षक गिरीपुंजे यांना वाचवण्याची संधीच मिळाली नाही. कोंटाचे ठाणेप्रमुख व आणखी काही जवान जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
मी पुढे चाललोय म्हणणारे गिरीपुंजे खरेच पुढे निघून गेलेअतिरिक्त पोलिस अधीक्षक आकाश राव गिरीपुंजे हे गस्तीवर असताना जवानांना चालण्यासाठी हिंमत देत. 'मी पुढे चाललोय तुम्ही मागे उभे राहून नका', असे सांगणारे गिरीपुंजे आज खरेच आम्हाला सोडून पुढे निघून गेले.... अशा भावना व्यक्त करत सोबतच्या जवानांचा कंठ दाटून आला. भरल्या डोळ्यांनी त्यांनी त्यांचा मृतदेह तेथून आणला, असे पोलिस सूत्रांनी सांगितले.
माओवाद्यांनी तंत्र बदलले का?सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, आता नक्षलवादी स्फोटके २ फूट किंवा त्याहून अधिक खोल रस्त्याखाली लपवत आहेत. त्यामुळे डिटेक्टर उपकरणांनीही त्यांचा थांगपत्ता लागत नाही. माओवादविरोधी अभियानाआधी रोड ओपनिंग केली जाते, यात या स्फोटकांचा जवानांना अंदाज आला नाही. यापूर्वी बिजापूरमध्येही अशाच पद्धतीने हल्ला करण्यात आला होता. त्यामुळे माओवाद्यांनी तंत्र बदलले का, असा प्रश्न सुरक्षा यंत्रणांना पडला आहे.
अनेक धाडसी मोहिमांमध्ये होते अग्रस्थानीआकाश राव गिरीपुंजे हे महाराष्ट्रातील विदर्भाचे सुपुत्र होते. नागपूर जिल्ह्यातले मूळ रहिवासी असलेले गिरीपुंजे मोठ्या जिद्दीने आयपीएस झाले होते. त्यांनी छत्तीसगडमध्ये अनेक माओवादविरोधी मोहिमा ययशस्वीरीत्या पार पाडल्या होत्या. ते शिस्तप्रिय, मनमिळावू आणि लोकाभिमुख अधिकारी म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या जाण्याने पोलिस दल हळहळले आहे.