जिमलगट्टा : अहेरी तालुक्याच्या सुद्धागुडम येथे रविवार ३ जानेवारीला शेतात विद्युत प्रवाह लावून चितळाची शिकार करण्यात आली. याबाबत माहिती मिळताच दाेन आराेपींना शिजलेल्या मटनासह अटक करण्यात आली. मात्र या घटनेतील तीन आराेपी अद्यापही फरार आहेत. सुद्धागुडम येथे ३ जानेवारीला दुपारी २.३० वाजता गावातील रामुलू व्यंकटी भेडकी (६०) यांच्या घरी वन्य प्राण्याचे मांस असल्याची माहिती गाेपनीय सूत्राकडून वन कर्मचाऱ्यांना मिळाली. या माहितीवरून त्याच दिवशी दुपारी ३ वाजता गावात धाड टाकून तपासणी केली असता, शिजविलेले १.४०४ किलाे व ८.९७२ किलाे कच्चे मांस वन कर्मचाऱ्यांना मिळाले. या संदर्भात आराेपींची सखाेल चाैकशी केली असता, व्यंकटस्वामी रामुलू भेडकी (२९) व त्याचा जावई सुमित मेश्राम भामरागड यांनी २ जानेवारी सायंकाळी शेतात विद्युत तारांवर आकडा टाकून विद्युत प्रवाह साेडला. त्याच दिवशीच्या रात्री चितळ अडकले. ३ जानेवारीला सकाळी शिकार झाल्याची माहिती मिळाल्यानंतर पाच जणांनी शेतामध्येच चितळाला कापून त्याचे मांस खाण्याकरिता आपल्या घरी आणले. चितळाचे काही अवशेष व कातडी शेतातच लपवून ठेवले, अशी माहिती अटक केलेल्या दाेन्ही आराेपींनी दिली. जप्त केलेला मांस व कातडीवरून चितळ हे वन्यप्राणी असून शेड्युल्ड ३ तृणभक्ष्यी असल्याचे आढळून आल्याने आराेपींविराेधात भारतीय वन्यजीव संरक्षण अभिनियमांतर्गत गुन्हा नाेंदविण्यात आला. ४ जानेवारीला दाेन आराेपींना ताब्यात घेण्यात आले. मात्र तीन आराेपी अद्यापही फरार आहेत. या प्रकरणाचा अधिक तपास एसीएफ प्रवीणकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली वन परिक्षेत्राधिकारी नगराळे करीत आहेत.
सुद्धागुडम येथे विद्युत प्रवाह साेडून चितळाची शिकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:58 IST