शांतिलाल मुथ्था यांचे प्रतिपादन : भारतीय जैन समाजातर्फे सत्कार कार्यक्रम गडचिरोली : बदलेल्या सामाजिक परिस्थितीमध्ये मुलाला संस्कारक्षम बनविणे सर्वात मोठे आव्हान असून हे आव्हान पालकांनी पेलले पाहिजे, असे प्रतिपादन अखिल भारतीय जैन संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अध्यक्ष तथा शांतिलाल मुथ्था फाऊंडेशनचे अध्यक्ष शांतिलाल मुथ्था यांनी केले. चामोर्शी तालुक्यातील तळोधी केंद्रात चालू वर्षात मूल्यवर्धन हा उपक्रम शांतिलाल मुथ्था फाउंडेशनच्या वतीने राबविण्यात येत आहे. या उपक्रमाचा आढावा घेण्यासाठी शांतिलाल मुथ्था गडचिरोली जिल्ह्यात गुरूवारी आले होते. या निमित्त भारतीय जैन संघटना शाखा गडचिरोलीच्या वतीने धानोरा मार्गावरील रामायण हॉटेलमध्ये गुरूवारी शांतिलाल मुथ्था यांच्या सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी मुथ्था बोलत होते. या कार्यक्रमाला भारतीय जैन संघटना शाखा चंद्रपूरचे अमर गांधी, दीपक पारख, महेंद्र मंडलेचा, प्रशांत बैद, नीरज खजांची, जितेंद्र जोगड, गौरव कोचर, दिलीप भंडारी, पद्म लोढा, रोहित पुगलिया, भारतीय जैन संघटना शाखा गडचिरोलीचे डॉ. गणेश जैन, शैलेश महाजन, प्रकाशभाई कामदार, धनराज जैन, मनोज जैन, डॉ. सुषमा गणेश जैन, सुरेश खजांची, टोपरे, डोळस, अनिल जैन, सावळकर, निरज बोथरा यांच्यासह जैन समाजातील अनेक नागरिक व महिला उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान भारतीय जैन संघटना शाखा गडचिरोलीच्या वतीने शांतिलाल मुथ्था यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मार्गदर्शन करताना शांतिलाल मुथ्था म्हणाले की, मुलगी बाहेरच्या वातावरणाचा सामना करू शकेल, यासाठी तिला शारीरिक व मानसिक दृष्ट्या सक्षम करणे आवश्यक आहे. यासाठी दोन दिवसांची कार्यशाळा आयोजित केली जाते. या कार्यशाळेत मुलींना विविध प्रकारचे प्रशिक्षण दिले जाते. अहमदनगर जिल्ह्यातील १ लाख ३ हजार मुलींना आत्मसंरक्षणाचे धडे देण्यात आले आहे. जैन समाजाच्या विकासासाठीही विविध कार्यक्रम भारतीय जैन संघटनेच्या वतीने राबविले जातात. राज्य दृष्काळमुक्त करण्यासाठी चित्रपट अभिनेते आमीर खान व जैन संघटनेच्या विद्यमाने राज्यभरात उपक्रम राबविला जात आहे. राज्यातील आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलांची शिक्षणाची जबाबदारी जैन संघटनेने स्वीकारली आहे. मूल्यवर्धन हा कार्यक्रम राज्यातील काही निवडक शाळांमध्ये सुरू करण्यात आला आहे. सरकारने या मूल्यवर्धन कार्यक्रमाचे महत्त्व जाणले आहे. त्यामुळे या कार्यक्रमाचा विस्तार करण्याचा विचार शासन करीत असून भविष्यात राज्यातील सर्व शाळांमध्ये मूल्यशिक्षणाचे धडे दिले जाणार आहेत. या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी आपण गडचिरोली जिल्ह्यात यापुढे नेहमी येत राहू, असे आश्वासन शांतिलाल मुथ्था यांनी उपस्थितांना दिले. कार्यक्रमाचे संचालन शैलेश महाजन यांनी केले. (नगर प्रतिनिधी)
संस्कारक्षम पिढी घडविणे पालकांसमोर आव्हान
By admin | Updated: December 23, 2016 00:58 IST