आरमोरी : अपघात झाल्याने काही प्रमाणात मोडलेले वाहने अपघातानंतरच्या न्यायालयीन प्रकरणामुळे किंवा कागदपत्रांअभावी आरमोरी पोलीस ठाण्यामध्येच ठेवली आहेत. वर्षोन्वर्षे ही वाहने बाहेरच असल्याने ती भंगार होण्याच्या मार्गावर आहेत.वाढत्या वाहनांच्या तुलनेत रस्त्यांचे रूंदीकरण झाले नाही. त्याचबरोबर रस्त्यांची अवस्था अत्यंत वाईट असल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे. अपघात झाल्यानंतर अपघातग्रस्त वाहन पोलीस स्टेशनमध्ये जमा केल्या जाते. त्याचबरोबर अवैध दारूची वाहतुक करणारे वाहन, चोरी, कोंबळा बाजार, जुगारावर धाड टाकून जप्त केलेली वाहने पोलीस स्टेशनच्या आवारातच ठेवली जातात. सदर वाहने सोडविण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची आवश्यकता असते. मात्र बऱ्याच वाहनांचे कागदपत्रेच राहत नाही. त्यामुळे सदर वाहन पोलीस स्टेशनमधून परत जाऊ शकत नाही. त्याचबरोबर न्यायालयीन खटला चालू असलेली वाहने खटल्याचा निकाल लागल्याशिवाय नेता येत नाही. वर्षोन्वर्ष खटल्याचा निकाल लागत नाही. तोपर्यंत हे वाहन ऊन, वारा, पाऊस यांना अंगावर झेलत पोलीस स्टेशनमध्येच पडून राहते. न्यायालयाचा निकाल लागल्यानंतर सदर वाहन परत नेता येऊ शकते मात्र तोपर्यंत वाहन भंगारामध्ये विकण्याच्याच लायकीचे झाले असल्याने बरेच वाहनधारक वाहन नेण्यास तयार होत नाही. १० वर्षानंतर सदर वाहन ओळखणेही कठीण होऊन बसते. त्यामुळे वाहन पोलीस स्टेशनमध्येच कायमचे पचते, अशी माहिती पोलिसांनी दिली. आरमोरी पोलीस स्टेशनमध्ये सायकल, दुचाकी, चारचाकी वाहने, कार यासाखी हजारो वाहने भंगार झाली आहेत. एवढी मोठी वाहने व्यवस्थित ठेवण्यासाठी पोलीस स्टेशनकडे जागा नाही. त्यामुळे ही वाहने उघड्यावरच बेवारस स्थितीत पडली आहेत. ठाण्यातील शेकडो सायकली पूर्णपणे गंजल्या आहेत. काही सायकलीचे भाग कायमचे नष्ट झाले असल्याचे दिसून येते. (प्रतिनिधी)
अपघातात मोडले; कागदपत्राअभावी सडले
By admin | Updated: June 21, 2014 01:38 IST