अहेरी : पावसाळ्यात उद्भवणाऱ्या पूर परिस्थितीवर मात करून नागरिकांना सुरक्षा मिळावी यासाठी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपत्ती निवारणाबाबत दक्ष राहावे, असे निर्देश अहेरीचे तहसीलदार एस. एन. सिलमवार यांनी दिले.अहेरीचे उपविभागीय अधिकारी जितेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनात शुक्रवारी तहसील कार्यालयात आपत्ती निवारण मान्सूनपूर्व बैठक घेण्यात आली. या बैठकीत अध्यक्षस्थानावरून तहसीलदार सिलमवार बोलत होते. या बैठकीत आपत्तीच्या वेळेस संपर्क यंत्रणा सज्ज ठेवणे, बोट, लाईफ जॉकेट, जनरेटर, जेसीबी आदी साहित्य तयार ठेवणे, कर्मचाऱ्यांनी मुख्यालय राहून संवेदनशील भागात लाऊडस्पीकरद्वारे पुराची माहिती देणे, कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणे, नदी काठावरील अतिक्रमण काढणे, आरोग्य यंत्रणा व चमू सुसज्ज ठेवणे, विद्युत पुरवठा सुरळीत ठेवणे, अन्न व इतर जीवनाश्यक वस्तूंचा नागरिकांना पुरवठा करणे, तसेच पावसाळ्यापूर्वी नाल्यांचा उपसा करून स्वच्छता ठेवणे आदी विषयांवर चर्चा करण्यात आली. या बैठकीला अहेरीचे अधीक्षक डॉ. कन्ना मडावी, पोलीस निरिक्षक चंद्रकांत चौधरी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता बोबडे, आगार व्यवस्थापक राकडे, तालुका कृषी अधिकारी पानसरे, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण शिंदे, महावितरणचे अभियंता पिंपळे आदीसह बीएसएनएल, पाटबंधारे तसेच गृहरक्षक दलाचे अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
आपत्ती निवारणाबाबत दक्ष राहा
By admin | Updated: May 17, 2015 02:14 IST