गडचिरोली : मागील चार महिन्यांपासून एपीएल शिधापत्रिकाधारकांचा धान्य पुरवठा बंद करण्यात आला आहे. त्यामुळे एपीएलधारकांना खुल्या बाजारपेठेतून धान्य खरेदी करावे लागत आहेत. यापूर्वीच्या संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारने संपूर्ण देशातील जवळपास ७० टक्के जनतेला स्वस्त दरात धान्य उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने अन्न सुरक्षा योजना सुरू केली. या योजनेंतर्गत काही एपीएलधारक कुटुंबाना प्रती व्यक्ती पाच किलो धान्याचा पुरवठा स्वस्त दरात केला जात आहे. मात्र बरेचसे एपीएलधारक वगळण्यात आले आहेत. केंद्रात सत्तेत आलेल्या नवीन भाजपा सरकारने एपीएलधारकांचा धान्य पुरवठा बंद केला होता. याबद्दलची ओरड सुरू झाल्यानंतर दोन महिने धान्य उपलब्ध करून देण्यात आले. त्यानंतर पुरवठा कायमचा बंद करण्यात आला आहे. हीच स्थिती गडचिरोली जिल्ह्यासह संपूर्ण राज्यातच आहे. केंद्र शासनाकडूनच धान्य उपलब्ध होत नसल्याने आपण कुठून धान्य देणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. एपीएलधारकांमध्येही बहुतांश कुटुंब गरीब आहेत. सर्वच नागरिकांना खुल्या बाजारपेठेतील धान्य खरेदी करणे शक्य होत नाही. त्यामुळे सदर कुटुंबावर उपासमारीची पाळी येत आहे. धान्याचा पुरवठा करावा, अशी मागणी आहे. (नगर प्रतिनिधी)
एपीएलचा धान्य पुरवठा बंद
By admin | Updated: February 8, 2015 23:46 IST