अहेरी : २५ आॅगस्टपासून वनरक्षक व वनपाल संवर्गातील कर्मचारी आंदोलनावर आहेत. चार दिवसानंतरही त्यांच्या मागण्यांवर तोडगा निघाला नसल्याने आंदोलन सुरूच आहे. दरम्यान गुरूवारपासून वन मजुरांनी या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला असून वन मजूर आंदोलनात सहभागी झाल्याने आलापल्ली व अहेरी वनविभागांतर्गत वन वसाहतीला होणारा पाणी पुरवठा प्रभावित झाला आहे. आलापल्ली येथे वन विभागाची वसाहत आहे. या वसाहतीत वन विभागाच्या कर्मचाऱ्यांचे ४३० क्वॉर्टर आहेत व हजार ते अकराशे लोक वास्तव्याला आहेत. या वसाहतीला पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी वन विभागाच्या वन मजुरांकडे आहे. एकीकडे वनरक्षक, वनपालांचा संप सुरू असताना वन मजुरांनीही या संपाला पाठींबा देत आपल्याकडील चाव्या वन कार्यालयात जमा केल्या आहेत. त्यामुळे पाणी पुरवठा करण्याचे कामही ठप्प झाले आहे. गुरूवारी टँकरद्वारे या वसाहतीला पाणी पुरवठा करण्यात आला. टँकरमधून पाणी घेऊन वसाहतीतील नागरिकांना आपली तहान भागवावी लागली. यानंतर संतप्त महिलांनी वनसंरक्षक कार्यालय गाठून निदर्शन केलीत. (तालुका प्रतिनिधी)
वन वसाहतीचा पाणी पुरवठा प्रभावित
By admin | Updated: August 28, 2014 23:47 IST