गडचिरोली : इयत्ता १० वी तील गुणवंत विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढावा या उद्देशाने प्राथमिक तथा माध्यमिक शिक्षणाधिकारी उल्हास नरड यांनी गुणवंत विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन त्यांचा कौतुक करण्याचा अभिनव उपक्रम हाती घेतला. आज शुक्रवारी जि. प. अध्यक्ष भाग्यश्री आत्राम व शिक्षणाधिकारी उल्हास नरड यांनी शहरातील दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन पुष्पगुच्छ देऊन तसेच पेढे भरवून कौतुक केले.यावेळी जिल्ह्यात पहिल्यांदाच शासन व प्रशासन गुणवंताच्या दारी पोहोचल्याचे दिसून आले. यापूर्वी शिक्षणाधिकारी उल्हास नरड यांनी बारावीचा निकाल लागल्यानंतर शहरातील इयत्ता १२ वीतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन त्यांचे कौतुक केले होते. प्लॅटीनम ज्युबिली हायस्कूलची विद्यार्थिनी भाग्यश्री वाडीघरे (९४.२०), याच शाळेचा ओमप्रकाश खुशाल बोदलकर (९३.४०), विद्याभारती कन्या विद्यालयाची नुरसबा मुदाचिर सय्यद (८६.४०) तसेच राणी दुर्गावती विद्यालयाची पूजा चुनारकर (९०.६०) व अश्विनी कुळमेथे (९३.२०) या गुणवंत विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन जि. प. अध्यक्ष भाग्यश्री आत्राम व शिक्षणाधिकारी उल्हास नरड यांनी भेट घेतली. दरम्यान त्यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतु केले. पुढील शिक्षण कोणत्या शाखेत घेणार असून कोणत्या महाविद्यालयात प्रवेश घेणार असल्याची विचारपूसही त्यांनी गुणवंत विद्यार्थी व त्यांच्या पालकांना केली. गुणवंत विद्यार्थ्यांच्या या यशामुळे जिल्ह्याचा सन्मान अधिकच वाढल्याची प्रतिक्रिया जि. प. अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांनी यावेळी दिली. याप्रसंगी गुणवंत विद्यार्थ्यांचे पालक, शिक्षक उपस्थित होते.
प्रशासन गुणवंतांच्या दारी
By admin | Updated: June 21, 2014 01:41 IST