एटापल्ली : जवळील तुमरगुंडा मार्गावरील भांडारकार नाल्यावर संपूर्ण गिट्टी उखडून पडली आहे. त्यामुळे येथे दुचाकीस्वारांना दररोज अपघात होण्याच्या घटना वाढल्या आहे.एका वर्षाआधी सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे सदर पुलाचे बांधकाम करण्यात आले. मात्र पुलावर सपाटीकरण झाले नाही. परिणामी पुलावर दोन्ही बाजूस फक्त गिट्टीच शिल्लक राहिली आहे. येथे दररोज दुचाकीधारक पडून त्यांना इजा होत आहे. गट्टा, उडेरा, बुर्गी, जांबिया, येमली, हेडरीसारख्या मोठ्या गावांना जाण्यासाठी हाच एकमेव मार्ग आहे. त्यामुळे दररोज शेकडो दुचाकीधारक एटापल्ली मुख्यालयात ये-जा करतात. त्यामुळे भविष्यात मोठा अपघात होऊन जीवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सदर पुलावर सपाटीकरण करण्यात यावे अशी मागणी होत आहे.
भांडारकर पुलावरील गिट्टी उखडल्याने अपघात वाढले
By admin | Updated: December 10, 2015 01:46 IST