प्रस्ताव शासनदरबारी प्रलंबित : आमदारांचे कृषी व पणन मंत्र्यांकडे साकडेगडचिरोली : अहेरी, एटापल्ली व भामरागड, सिरोंचा या चार तालुक्यासाठी अहेरी येथे एकमेव कृषी उत्पन्न बाजार समिती आहे. अहेरीपासून सिरोंचाचे ९६ किमी अंतर आहे. यामुळे तिनही तालुक्यातील शेतकऱ्यांना आपला कृषी माल अहेरी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीकरीता आणण्यासाठी अडचण जात आहे. परिणामी अनेक खासगी व्यापारी शेतकऱ्यांची लूट करीत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी, यासाठी सिरोंचा येथे कृषी उत्पन्न बाजार समिती निर्माण करण्यात यावी, अशी मागणी अहेरीचे आमदार दीपक आत्राम यांनी राज्याचे कृषी व पणनमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केली आहे.सिरोंचा या नव्या कृषी उत्पन्न बाजार समितीचा प्रस्ताव शासन दरबारी गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहे. त्यामुळे शासनाने आता सिरोंचा बाजार समितीच्या प्रस्तावाला मान्यता द्यावी, अशी मागणी आमदार दीपक आत्राम यांनी कृषी व पणनमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. त्यांनी अधिवेशन काळात या मागणीचे निवेदन नामदार विखे पाटील यांना दिले. आमदार दीपक आत्राम यांनी निवेदनात म्हटले आहे की, अहेरीपासून भामरागड व एटापल्लीचे अंतर प्रचंड आहे. या दोनही तालुक्यातून शेतकरी अहेरी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत येत नाही. कारण त्यांना वाहतुकीचा खर्च परवडत नाही. तसेच त्यांना निवास व भोजनाचीही समस्या भेडसावते. चार तालुक्यासाठी दोन स्वतंत्र बाजार समित्या आवश्यक आहेत. मात्र असे असतानासुध्दा शासनदरबारी प्रलंबित असलेल्या सिरोंचा बाजार समितीच्या प्रस्तावावर मंत्रीमंडळात चर्चा घडवून आणून त्याला मान्यता द्यावी, अशीही मागणी आमदार दीपक आत्राम यांनी निवेदनातून केली आहे. स्वतंत्र बाजार समिती नसल्याने सिरोंचा या शहरातील व तालुक्यातील बाजारपेठ विकसित होत नसल्याचेही आमदार दीपक आत्राम यांनी म्हटले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)
सिरोंचा बाजार समितीला मान्यता द्या
By admin | Updated: June 23, 2014 00:03 IST