मुख्यमंत्र्यांना निवेदन : एप्रिल २०१४ पासून मानधनवाढ द्यागडचिरोली : एप्रिल २०१४ च्या शासन निर्णयानुसार अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मानधन वाढ देण्यात यावी, या प्रमुख मागणीसह इतरही मागण्यांसाठी आयटकच्या वतीने जिल्हा परिषदेसमोर शुक्रवारी धरणे आंदोलन करण्यात आले. या संदर्भातील निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्फतीने मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले. अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे थकीत मानधन, प्रवास भत्ता, इंधन बिल त्वरित देण्यात यावा, दर महिन्याला ५ तारखेच्या आत मानधन द्यावे, एप्रिल २०१४ पासून सेवानिवृतत झालेल्या कर्मचाऱ्यांना पेन्शनची एक एकाच वेळी रक्कम अदा करावी, अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पूर्व प्राथमिक शिक्षकेचा दर्जा देऊन वेतनश्रेणी लागू करावी, शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे नक्षलग्रस्त भत्ता लागू करावा, १५ अंगणवाडी केंद्रांसाठी एक पर्यवेक्षिका देण्यात यावी, अंगणवाडी पर्यवेक्षिकांची १०० टक्के पदे अंगणवाडी सेविकांमधून भरण्यात यावी, अंगणवाडी केंद्राची वीज जोडणी करून विजेचे बिल भरण्यावर कायमस्वरूपी तोडगा काढावा, रिक्त असलेल्या सेविका व मदतनिसांच्या जागा त्वरित भराव्या, प्रत्येक अंगणवाडी केंद्राला स्वतंत्र इमारतीचे बांधकाम करावे, आदी मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी, बालवाडी, संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात जिल्हाभरातील शेकडो अंगणवाडी कर्मचारी सहभागी झाल्या होत्या. दिवसभर सुरू असलेल्या रिमझीम पावसातही आंदोलन करण्यात आले. आंदोलनानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्फतीने मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविले. निवेदन जिल्हा संघटक देवराव चवळे, राधा ठाकरे, मिरा कुरंजेकर, अनिता अधिकारी, कुंदा बंडावार, कौशल्या गोंदोळे, शशीकला धात्रक, प्रभा बावणकर, दुर्गा कुर्वे, रूपा पेंदाम, कांता फटींग, मिनाक्षी झोडे, ज्योती कोमलवार, जहारा शेख, लता मडावी, बसंती अंबादे, रेखा जांभुळे, नयन टेंभुर्णे उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)
अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे जि.प.समोर भर पावसात धरणे
By admin | Updated: July 11, 2015 02:24 IST