वन विभागाचा उपक्रम : वन्य पशुंची तहान भागणारगडचिरोली : वन्य पशुंची उन्हाळ्यात तहाण भागविण्याबरोबरच भूजल साठ्यात वाढ करण्याच्या उद्देशाने राज्य शासनाने गडचिरोली वनवृत्तासाठी सुमारे ६२ वनतळे व सिमेंट बंधारे मंजूर केले आहेत. त्यासाठी १ कोटी २४ लाख ६६ हजार रूपयांचा निधीसुध्दा उपलब्ध करून दिला आहे. गडचिरोली जिल्ह्याच्या एकूण क्षेत्रफळाच्या सुमारे ७८ टक्के जंगल आहे. या जंगलामध्ये विविध प्रकारचे वन्य पशु आहेत. पावसाळा व हिवाळ्यात नदी, नाल्यांना पाणी राहत असल्याने वन्य पशुंना पाण्यासाठी गावाकडे धाव घ्यावी लागत नाही. मात्र मार्च नंतर लहान नद्या व तलाव कोरडे पडण्यास सुरूवात होतात. परिणामी वन्य पशुंना पाण्यासाठी गावाकडे धाव घ्यावी लागते. यातून प्राण्यांच्या शिकारीच्या घटना घडतात. तर काही प्राणी पाण्याअभावी तडफडून मरतात. या सर्व बाबी लक्षात घेऊन मागील तीन वर्षांपासून वन विभागाच्या मार्फतीने राज्य शासन जंगलात शेततळे बांधत आहे. मागील वर्षी सुमारे २४५ वनतळे बांधण्यात आले होते. त्यावर पाच कोटी रूपयांपेक्षा अधिक रक्कम खर्च झाली होती. यावर्षी राज्य शासनाने ६२ वनतळे व सिमेंट बंधारे बांधण्यास मंजुरी दिली आहे. त्यासाठी १ कोटी २४ लाख ६६ हजार रूपयांचा निधी मंजूर केला आहे. लवकरच निविदा काढली जाणार असून मार्चपूर्वी सर्वच वनतळ्यांचे काम पूर्ण केले जाणार आहे. मागील वर्षीचे २४५ व यावर्षीचे ६५ असे एकूण ३०७ वनतळे जिल्ह्यात होणार आहेत. या वन तळ्यामध्ये पाणी साचून वन्यप्राण्यांची तहाण जंगलातच भागण्यास मदत होईल. (नगर प्रतिनिधी)१०० वॉटर होलची निर्मितीवन्य प्राण्यांची तहाण भागविण्यासाठी वन विभागाच्या मार्फतीने वॉटर होलचेही बांधकाम करण्यात येते. या वॉटर होलमध्ये उन्हाळ्याच्या दिवसात टँकरच्या सहाय्याने पाणी पुरवठा केला जातो. सदर वॉटर होल केवळ १५ हजार रूपयांच्या निधीत तयार होत असल्याने वन विभाग वॉटर होल निर्मितीवर विशेष भर देतो. चालू वर्षी १०० वॉटर होलचे बांधकाम केले जाणार आहे. नाल्यांवर सिमेंट बंधाऱ्यांचे बांधकाम जंगलात अनेक लहान-मोठे नाले आहेत. या नाल्यांचे पाणी अडविल्यास वन्य पशुंची तहाण भागविणे शक्य आहे. ही बाब लक्षात घेऊन वनतळ्यांबरोबरच ज्या ठिकाणी नाला आहे व या नाल्याला एप्रिल, मे महिन्यापर्यंत पाणी उपलब्ध राहते, अशा नाल्यावर सिमेंट बंधारा बांधून पाणी अडविले जाणार आहे. भूजल पातळी वाढण्यासही मदतभूजल पातळी वाढण्याबरोबरच सिंचनाची सुविधा उपलब्ध होण्यासाठी राज्य शासनाने जलयुक्त शिवार अभियान राज्यभरात सुरू केले आहे. या अंतर्गत गडचिरोली जिल्ह्यात ३३६ शेततळ्यांचे बांधकाम करण्यात आले आहे. वनतळ्यांच्या माध्यमातूनही भूजल साठ्यात वाढ होईल, अशी अपेक्षा शासनाला असल्याने यावर्षी वनतळ्यांसाठी तत्काळ निधी उपलब्ध करून दिला आहे.
सव्वा कोटीतून ६२ वनतळ्यांची निर्मिती
By admin | Updated: December 6, 2015 01:34 IST