ग्रामीण भागात संख्या अधिक : गडचिरोली जिल्ह्यात तीन वर्षांत दिलीप दहेलकर - गडचिरोलीगडचिरोली जिल्ह्यात वनक्षेत्र व धान शेती मोठ्या प्रमाणावर आहे. अनेक गाव अरण्य भागाला लागून आहे. त्यामुळे दरवर्षी पावसाळ्याच्या दिवसात सर्पदंशाच्या घटना मोठ्या प्रमाणावर घडतात. आजही ग्रामीण भागात उपचारासाठी आरोग्य व्यवस्था बळकट नाही. त्यामुळे सर्पदंशाने मृत्यूचे प्रमाण गडचिरोली जिल्ह्यात प्रचंड प्रमाणात आहे. गेल्या तीन वर्षात ६२० नागरिकांचा मृत्यू केवळ सर्पदंशाने झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. गडचिरोली जिल्ह्यात शहरी भागापेक्षा ग्रामीण व दुर्गम भागात सर्पदंशांने मृत्यू झालेल्यांचे प्रमाण अधिक आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र स्तरावर २०१२ या वर्षात १७८ नागरिकांचा सर्पदंशाने बळी गेला. २०१३ मध्ये २०७ तर २०१४ मध्ये २१५ नागरिकांचा सर्पदंशाने मृत्यू झाला. जिल्हा सामान्य रूग्णालयात २०१०-११ या वर्षात सर्पदंशाचे १०४ रूग्ण दाखल करण्यात आले. यापैकी ३ जणांना आपला जीव गमवावा लागला. २०११-१२ या वर्षात या रूग्णालयात सर्पदंशाचे ९४ रूग्ण दाखल झाले. यापैकी ७ रूग्णांचा मृत्यू झाला. २०१२-१३ या वर्षात सर्पदंशाचे ११७ रूग्ण दाखल करण्यात आले. यापैकी ६ नागरिकांचा मृत्यू झाला. २०१३-१४ या वर्षात सर्पदंशाचे १०१ रूग्ण दाखल करण्यात आले. यापैकी ४ जणांचा बळी गेला. एप्रिल ते जून २०१४ या दरम्यान येथील जिल्हा सामान्य रूग्णालयात सर्पदंशाचे ८ रूग्ण दाखल करण्यात आले. त्यांच्यावर लागलीच उपचार झाल्याने या सर्वांचे प्राण वाचले. सर्पदंश झालेल्या अनेक नागरिकांचे प्राण वाचविण्यात आरोग्य विभागाला यश आले आहे. मात्र ही परिस्थिती शहरी भागाची आहे. ग्रामीण व दुर्गम भागात स्थानिक पातळीवर आरोग्य सेवेच्या सोयीसुविधा नसल्यामुळे सर्पदंशाने अनेक नागरिकांचा बळी गेल्याचे वरील आकडेवारीवरून स्पष्ट होते. साप आणि त्याचे विष...विषासंदर्भात सापांचे तीन गट पडतात़ यात बिनविषारी (नॉन व्हेनमस ) म्हणजे विष नसलेले, निमविषारी (सेमी व्हेनमस) सौम्य विष असलेले़ ज्या विषाने छोटे किटक, पाल, पक्षी आदी मरू शकतात पण, मोठे प्राणी किंवा माणूस मरू शकत नाही़ विषारी (व्हेनमस) म्हणजे ज्याच्या विषाने मोठे प्राणी किंवा माणूस मरू शकतो असे़ विशेष म्हणजे विषाला इंग्रजीत पॉईझन म्हणण्याचा प्रघात आहे़पण, सापाच्या विषाला व्हेनम असेच म्हणतात़ या विषांचेही दोन प्रकार पडतात़ एक रक्तविष (हेमोटॉक्सिक ) दुसरे मज्जाविष (न्युरोटॉक्सिक) होय़ रक्तविषाचा प्रभाव दंश केलेल्या प्राण्याच्या रक्तावर होतो़ या विषामुळे रक्त साकळण्याची प्रक्रीया अतिवेगाने वाढते़ त्यामुळे नसांमध्ये अवरोध निर्माण होऊन नसा सुजतात व फुटतात़ ही सूज वाढत गेल्यावर प्राणी मरतो़ हे विषय वायपर प्रजातीमध्ये असते़ मज्जाविष हे चेतासंस्था (नव्हर्स सिस्टिम) वर आघात करते़ त्यामुळे मेंदूवर परिणाम होऊन भोवळ येणे, जिभ जड होणे, शुद्ध हरपणे आदी लक्षणे दिसतात़ हे विष नाग व मण्यार या सापांमध्ये असते़
सर्पदंशाचे ६०० बळी
By admin | Updated: July 18, 2014 00:02 IST