सिंचन क्षमता वाढली : जलयुक्त शिवार योजनेची फलश्रृती गडचिरोली : भाजपप्रणित राज्य शासनाने २०१५-१६ या वर्षात जलयुक्त शिवार ही महत्त्वपूर्ण योजना हाती घेतली. या योजनेंतर्गत गडचिरोली जिल्ह्यात ६६.६० कोटी रूपये खर्च करून जलसंधारणाची तब्बल ३ हजार ५६१ कामे पूर्ण करण्यात आली. जलयुक्त शिवार अभियानाच्या कामातून जिल्ह्यात एकूण २५ हजार ३४१ टीसीएम जलसाठ्याची निर्मिती झाली असून २१ हजार ८१२ हेक्टर क्षेत्रात संरक्षित सिंचन क्षमता निर्माण झाली आहे. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सन २०१५-१६ या वर्षात गडचिरोली जिल्ह्यातील एकूण १५२ गावांची निवड कृती आराखड्यात करण्यात आली. ८०.२७ कोटी रूपये जलसंधारणाच्या कामासाठी आराखड्यानुसार मंजूर करण्यात आले. ३ हजार ९३६ कामे हाती घेण्यात आली. यापैकी ३ हजार ५६१ कामे पूर्ण झाले आहेत. तर ३०० वर कामे प्रगतीपथावर आहेत. ६६.६० कोटी रूपये सन २०१५-१६ या वर्षात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जलसंधारणाच्या कामावर खर्च झाले. या कामातून १० हजार ९६० टीसीएम एवढी संरक्षित सिंचनाची अपेक्षीत उपलब्धता होती. जलयुक्त शिवार अभियानाच्या कामाची फलश्रुती पाहून सन २०१६-१७ या चालू वर्षात जिल्हा प्रशासन व कृषी विभागाच्या वतीने कृती आराखडा तयार करण्यात आला. या आराखड्यात एकूण १६९ गावांचा समावेश करण्यात आला असून या गावात जलसंधारणाची अनेक कामे मंजूर करण्यात आली आहेत. पाणी ताळेबंद भरलेली व आराखडा भरलेल्या गावांची संख्या १६९ आहे. आॅनलाईन अर्ज करून कामाची मागणी करणाऱ्या गावांची संख्या ५१९ इतकी आहे. निवड करण्यात आलेल्या १६९ गावांमध्ये ६ हजार ६६९ इतकी जलसंधारणाची कामे मंजूर करण्यात आली. सन २०१६-१७ या वर्षात आराखड्यानुसार जलसंधारणाच्या कामांसाठी ११८.९५ कोटी रूपये मंजूर करण्यात आले आहेत. यापैकी चालू वर्षात संपूर्ण जिल्ह्यात ३२० कामे सुरू करण्यात आली असून आतापर्यंत २०० वर कामे पूर्ण झाली असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गडचिरोली कार्यालयाच्या सूत्रांकडून मिळाली आहे. चालू वर्षात जलयुक्त शिवार योजनेंतर्गत १३४ कामे प्रगतीपथावर असून आतापर्यंत या कामांवर ३.४३ कोटी रूपयांचा खर्च झाला आहे. टंचाईमुक्त महाराष्ट्र घडविण्यासाठी व राज्यासह गडचिरोली जिल्ह्यातील उन्हाळ्यात जाणवणाऱ्या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी भाजपप्रणित राज्य सरकारने जलयुक्त शिवार अभियान ही महत्त्वपूर्ण योजना हाती घेतली व सदर योजना प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश जिल्हा प्रशासन व कृषी विभागाला दिले. या अभियानाच्या कामांचा आढावा राज्य सरकार नियमित घेत आहे. (स्थानिक प्रतिनिधी) मागेल त्याला शेततळे योजनेवर ८६ लाखांचा खर्च गडचिरोली जिल्ह्यात सिंचन क्षेत्र वाढविण्यासाठी राज्य शासनाने कृषी विभागामार्फत मागेल त्याला शेततळे ही योजना सन २०१५-१६ वर्षापासून सुरू केली. सन २०१५-१६ व २०१६-१७ या पावणेदोन वर्षात आतापर्यंत शेततळ्याच्या कामावर ८६.६५ लाख रूपये खर्च झाले असल्याची माहिती मिळाली आहे. सन २०१५-१६ वर्षात शेततळ्याची १७८ कामे पूर्ण झाली असून चालू वर्षात शेततळ्यांची १७ कामे प्रगतीपथावर आहे. मागेल त्याला शेततळे योजनेच्या जनजागृतीसाठी कृषी विभागाने गावागावात माहिती दिली. त्यामुळे ग्रामीण व दुर्गम भागातील शेतकऱ्यांचा शेततळ्याच्या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. मागेल त्याला बोळीसाठी ४७२ शेतकऱ्यांचे अर्ज प्राप्त राज्य शासनाने कृषी विभागामार्फत ‘मागेल त्याला बोळी’ ही योजना सन २०१६-१७ पासून सुरू केली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील अनेक मोठे व मध्यम सिंचन प्रकल्प वन कायद्याच्या जाचक अटीमुळे रखडले आहेत. परिणामी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दरवर्षी दुष्काळाचा सामना करावा लागत होता. शेतकऱ्यांना दिलासा देऊन त्यांची प्रगती साधण्यासाठी राज्य सरकारने मागेल त्याला बोळी या योजनेची अंमलबजावणी सुरू केली. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाच्या माहितीनुसार बोडीच्या लाभासाठी आतापर्यंत ४७२ शेतकऱ्यांचे अर्ज प्राप्त झाले आहेत.
जिल्ह्यात २५,३४१ टीसीएम जलसाठा
By admin | Updated: December 26, 2016 01:25 IST