विद्यार्थ्यांसाठी डोकेदुखी : आॅनलाईन शिष्यवृत्ती योजनादिलीप दहेलकर - गडचिरोलीविद्यार्थ्यांना अर्ज भरण्यास सोपे व्हावे या हेतूने गेल्या तीन वर्षांपासून शासनाने समाजकल्याण व आदिवासी विकास विभागामार्फत सुरू असलेल्या सर्व प्रकारच्या शिष्यवृत्ती योजनेची प्रक्रिया आॅनलाईन केली आहे. भारत सरकार शिष्यवृत्ती योजनेचे सद्यस्थितीत ३ हजार ७८९ अर्ज अपलोड करण्यात आले आहे. जिल्ह्यात केवळ २० टक्केच शिष्यवृत्तीचे अर्ज अपलोड झाले असून बहूतांश महाविद्यालयांनी अभ्यासक्रमाची परिपूर्ण माहिती न भरल्यामुळे आॅनलाईन शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांसाठी डोकदुखी ठरली आहे.मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना कनिष्ठ महाविद्यालयीन तसेच पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण घेता यावे, या शिक्षणासाठी त्यांना आर्थिक मदत व्हावी यासाठी केंद्र शासनाने भारत शिष्यवृत्ती योजना अंमलात आणली आहे. या शिष्यवृत्तीचा लाभ इतर मागास वर्गीय, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, एसबीसी व व्हीजेएनटी आदी प्रवर्गातील इयत्ता ११ वी ते पदव्युत्तर पर्यंतच्या विद्यार्थ्यांना लाभ मिळतो. जिल्ह्यामध्ये कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयांची संख्या मोठी आहे. सद्य:स्थितीत जिल्ह्यातील २५ महाविद्यालयातील ३ हजार ७८९ विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीचे आॅनलाईन अर्ज अपलोड केले आहेत. यामध्ये इतर मागास प्रवर्गातील १ हजार ६६७, अनुसूचित जाती प्रवर्गातील १ हजार ५५५, एसबीसी प्रवर्गातील १४९ व विजाभज प्रवर्गाच्या ४१८ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. शिष्यवृत्तीचे आॅनलाईन अर्ज भरणाऱ्या अनुसूचित जमाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांची संख्या फार कमी आहे. चुकीच्या बँक खाते क्रमांक नोंदविल्यामुळे तसेच लिंकफेलचा फटका वारंवार बसत असल्याने आॅनलाईन शिष्यवृत्ती अर्ज सादर करण्याच्या प्रक्रियेला अपेक्षीत गती नाही. २८ आॅगस्टपासून या शिष्यवृत्ती योजनेचे आॅनलाईन अर्ज सादर करण्यास सुरूवात झाली. मात्र अनेक महाविद्यालयांनी अभ्यासक्रम व इतर माहिती परिपूर्णरित्या भरली नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे आॅनलाईन शिष्यवृत्ती अर्ज अपलोड होण्यास अडचण निर्माण जात आहे. जिल्ह्यातील बहुतांश महाविद्यालयांनी आवश्यक पूर्ण माहिती न भरल्यामुळे नासिकच्या समाज कल्याण कार्यालयाच्यावतीने काही दिवस लिंक बंद ठेवण्यात आली होती.आॅनलाईन प्रक्रियमुळे नेट कॅफेत गर्दीगडचिरोली जिल्ह्यात इयत्ता अकरावी, पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या शिक्षणाची सोय असणाऱ्या एकूण महाविद्यालयाची संख्या २५२ आहे. यापैकी अनेक महाविद्यालयात इंटरनेट कनेक्टीव्हीटीची पुरेशी सोय नाही. अनेक महाविद्यालयात लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. यामुळे बहुतांश महाविद्यालयाचे विद्यार्थी भारत सरकार शिष्यवृत्ती योजनेचे आॅनलाईन अर्ज अपलोड करण्यासाठी शहरातील नेट कॅफेचा आधार घेत आहेत. त्यामुळे या नेट कॅफेमध्ये सध्या विद्यार्थ्यांची गर्दी होत आहे.
२०% अर्ज अपलोड
By admin | Updated: October 7, 2014 23:33 IST