कृषी विभागाचे नियोजन : धान पिकासाठी युरियासह इतर खतांची मागणी वाढणारगडचिरोली : धान गर्भात येताच शेतकरी वर्गाकडून युरीया तसेच इतर मिश्र खतांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. दरवर्षीप्रमाणे खताचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने अगोदरच तयारी करून ठेवली असून युरीयासह १५ हजार मेट्रिक ९९२ मेट्रिक टन खताचा साठा उपलब्ध आहे.जुलै महिन्यात धानपिकाच्या रोवणीची कामे पूर्ण होतात. रोवणीच्या कामादरम्यान खत टाकले जाते. त्यानंतर धान गर्भात आल्यानंतर खत देणे आवश्यक आहे. त्यामुळे आॅगस्ट सप्टेंबर महिन्यात युरीयासह इतर मिश्रखतांची मागणी वाढते. विशेष करून युरीया खत टाकण्याकडे शेतकऱ्यांचा कल असल्याचे दिसून येते. या कालावधीत शेतकऱ्यांकडून प्रचंड मागणी वाढत असल्याने युरिया खताचा तुटवडा निर्माण होतो. २०१६-१७ साठी २४ हजार २०० मेट्रिक टन युरिया खताचे आवंटन मंजूर करण्यात आले. त्यापैकी १४ हजार ९८८ मेट्रिक टन खत उपलब्ध झाले. ११ हजार ६५० मेट्रिक टन खताची प्रत्यक्ष विक्री झाली व मागील हंगामातील १ हजार ३४३ मेट्रिक टन खत शिल्लक होते. त्यामुळे शिल्लकी साठा आता ४ हजार ६८२ मेट्रिक टनवर पोहोचला आहे. यावर्षी अगदी सुरूवातीलाच दमदार पाऊस झाल्याने तलाव तुडूंब भरले व त्यानंतरही अधूनमधून पाऊस येत आहे. त्यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत धानपीक चांगले असल्याने शेतकरी आनंदी आहे. थोडे जास्त खत टाकल्यास उत्पादनात वाढ होईल. या अपेक्षेने शेतकरी वर्ग या वर्षी मागील वर्षीच्या तुलनेत खताची जास्त खरेदी करणार आहे. ही बाब लक्षात घेऊन आणखी खत मागविले आहे. त्यामुळे किमान यावर्षी खताचा तुटवडा निर्माण होणार नाही, अशी अपेक्षा केली जात आहे. (नगर प्रतिनिधी)एक हजार मेट्रिक टन युरिया खताची पडणार भरसद्य:स्थितीत जिल्हाभरात युरिया खताचा ४ हजार ६८२ मेट्रिक टन साठा शिल्लक आहे. तरीही पुढील १५ दिवसात युरिया खताची मागणी वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन कृषी विभागाने एक हजार मेट्रिक टन युरिया खताची मागणी केली आहे. सदर खत पुढील आठवड्यात उपलब्ध होण्याची शक्यता कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. हा खत उपलब्ध झाल्यास युरियाचा जिल्हाभरातील साठा साडेपाच हजार मेट्रिक टनावर पोहोचणार आहे. योग्य नियोजनाची गरजयुरिया खताची मागणी एकावेळेस वाढत असल्याचा दरवर्षीचा अनुभव आहे. याचा फायदा कृषी केंद्र चालक उचलतात. खताचा कृत्रिम निर्माण करून शेतकऱ्यांकडून अधिकची रक्कम वसूल करण्याचा प्रयत्न कृषी केंद्र चालकांकडून केला जातो. खत उपलब्ध असतानाही जाणूनबुजून शेतकऱ्यांची लूट होत असल्याचा अनुभव आहे. त्यामुळे कृषी विभागाने योग्य नियोजन करून प्रत्येक कृषी केंद्र चालकाकडे किती खत साठा उपलब्ध आहे, याची अद्यावत माहिती मागविणे गरजेचे आहे व संबंधित कृषी केंद्र चालकांवर नजर ठेवणे गरजेचे आहे.
१६ हजार मेट्रिक टन खत शिल्लक
By admin | Updated: September 3, 2016 01:25 IST