सौरदिवे बंद : गावात अंधारकुरखेडा : राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमांतर्गत वीज नसलेल्या कुरखेडा तालुक्यातील ३४ गावांमध्ये सौरउर्जेवर दुहेरी हातपंप नळ पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली. मात्र सद्यस्थितीत १० गावातील पाणी पुरवठा योजना बंद आहे. तर काही गावात वॉल्व लिकेज आहे. त्यामुळे नागरिकांना भर उन्हाळ्यात पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. बंद पडलेल्या पाणी पुरवठा योजनेमध्ये चिनेगाव, कुंभीटोला, मोर्शी, भगवानपूर, चिचटोला, महाजन टोला, वाशिम, सोनेरांगी, खापरी, मोहगाव आदी गावांचा समावेश आहे. लाखो रूपये खर्च करून शासनाने सौरउर्जेवर आधारित नळ पाणी पुरवठा योजना कार्यान्वित केली. मात्र अल्पावधीतच काही ठिकाणच्या योजना बंद असल्याने शासनाचा लाखोंचा खर्च व्यर्थ गेल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली. पर्यावरण संतुलीत समृध्द ग्राम योजना, दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत सन २०१२-१३ व २०१३-१४ या दोन वर्षात कुरखेडा तालुक्यात २५ ग्रामपंचायतीच्या हद्दीतील गावांमध्ये १७१ सौर पथदिवे लावण्यात आले. मात्र यापैकी अर्धे अधिक सौर पथदिवे बंद पडले असल्याने संबंधित गावांमध्ये अंधार पसरला आहे. जिल्हा परिषद सीईओंना निवेदनकुरखेडा तालुक्यातील विविध गावातील गेल्या अनेक महिन्यापासून सौर पथदिवे बंद आहेत. तसेच दहा गावातील सौरउर्जेवरील नळ पाणी पुरवठा योजना बंद पडल्या आहेत. त्यामुळे उन्हाळ्यात पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली आहे. जि.प. प्रशासनाने तत्काळ दखल घेऊन बंद असलेल्या पाणी पुरवठा योजना व सौर पथदिवे सुरू करण्याची कार्यवाही करावी, अशी मागणी कुरखेडाचे पं.स. सदस्य चांगदेव फाये यांनी निवेदनाद्वारे जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी संपदा मेहता यांच्याकडे केली आहे.
सौर ऊर्जेवरील १० योजनांतून पाणीपुरवठा नाही
By admin | Updated: May 30, 2015 01:54 IST