"मला मौलानाशीच लग्न करायचंय" दोन अपयशी लग्नांनंतर राखी सावंतचा निर्णय, म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2026 16:25 IST2026-04-29T15:55:40+5:302026-04-29T16:25:00+5:30
दोन लग्न अपयशी ठरल्यानंतर राखीने आता पुन्हा एकदा लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

"मला मौलानाशीच लग्न करायचंय" दोन अपयशी लग्नांनंतर राखी सावंतचा निर्णय, म्हणाली...
बॉलिवूडची 'ड्रामा क्वीन' राखी सावंत नेहमीच तिच्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असते. दोनदा लग्न होऊनही संसार टिकू न शकलेल्या राखीने आता पुन्हा एकदा लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. "मला आता एका मौलानाशी लग्न करायचं आहे", असे राखीने म्हटले आहे.
'फिल्मीचर्चा'ला दिलेल्या एका मुलाखतीत राखीला तिच्या धर्माबद्दल विचारण्यात आले. आदिल खान दुर्रानीशी लग्न करताना राखीने इस्लाम धर्म स्वीकारून आपले नाव 'फातिमा' ठेवले होते. यावर स्पष्टीकरण देताना ती म्हणाली, "माझा घटस्फोट झाला असला तरी मी इस्लाम सोडलेला नाही. मी अजूनही फातिमाच आहे. माझा नवरा वाईट निघाला, पण माझा देव दयाळू आहे. मी पूर्ण मनाने धर्माचा स्वीकार केला आहे".
राखीने आपल्या तिसऱ्या लग्नाबद्दलची इच्छा बोलून दाखवली. ती म्हणाली, "मला एका मौलानाशी लग्न करायचे आहे. माझी बहीण सना खान हिने मुफ्ती अनस यांच्याशी लग्न केले आहे. ते दिवसातून पाच वेळा नमाज पढतात. जे लोक नमाज पढतात ते खूप चांगले असतात आणि ते मशिदीतच राहतात. मलाही असाच जोडीदार हवा आहे".
राखी सावंतने २०२२ मध्ये आदिल खान दुर्रानीशी लग्न केले आणि इस्लाम धर्म स्वीकारून तिचे नाव 'फातिमा' ठेवल. यापूर्वी तिचे रितेश नावाच्या एनआरआय व्यक्तीशी २०१९ मध्ये लग्न झाले होते, जे २०२२ मध्ये तुटले. दुसरे लग्न तिचे वादाच्या भोवऱ्यात राहिले. आदिलवर तिने मारहाण आणि फसवणुकीचे गंभीर आरोप केले होते, ज्यानंतर त्यांचा घटस्फोट झाला.