चित्रपटाच्या सेटवर पहिली भेट अन्...; 'असं' बहरलं ज्ञानदा-हर्षदचं नातं, लव्हस्टोरी आहे खूपच हटके
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2026 17:42 IST2026-02-02T17:41:10+5:302026-02-02T17:42:59+5:30
२०१५ मध्ये पहिली भेट, दोघांच्या वयामध्ये ७ वर्षांचं अंतर! 'अशी' आहे 'लग्नानंतर होईलच प्रेम' मधील काव्याची लव्हस्टोरी

चित्रपटाच्या सेटवर पहिली भेट अन्...; 'असं' बहरलं ज्ञानदा-हर्षदचं नातं, लव्हस्टोरी आहे खूपच हटके
Dnyanada Ramtirhkar: 'ठिपक्यांची रांगोळी' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे ज्ञानदा रामतीर्थकर. आपल्या सहज सुंदर अभिनयाच्या जोरावर तिने मालिका रसिकांना आपलंसं केलं. सध्या ज्ञानदा लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करते आहे.अलिकडेच ज्ञानदा रामतीर्थकरनं साखरपुडा पार पडला. अभिनेत्रीच्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव हर्षद आत्माराम आहे. हर्षद हा सिनेमॅटोग्राफर आहे. सध्या हे भावी जोडपं एका मुलाखतीमुळे चर्चेत आलं आहे.
अलिकडेच 'राजश्री मराठी'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये ज्ञानदा आणि तिचा होणारा नवरा हर्षदने त्यांच्या प्रेमकहाणीचा किस्सा शेअर केला. त्यावेळी ज्ञानदा म्हणाली, "आमची लव्हस्टोरी हळुहळू फुलत गेली. २०१५ मध्ये एका शॉर्टफिल्मच्या शूटिंगदरम्यान आम्ही पहिल्यांदा भेटलो. त्यावेळेस हर्षद मुंबईत राहत नव्हता.तो फक्त कामानिमित्त मुंबईत यायचा. तो इथे आल्यावर मला न भेटता गेला की, मला कसंतरी वाटायचं. ती एक प्रेमाची सुरुवात होती. अशी एक-एक गोष्ट आमच्यात घडत गेली. तोपर्यंत आम्ही रिलेशनशिपमध्ये नव्हतो. २०१९ मध्ये त्याच्या जवळच्या दोन मित्रांची लग्न होती आणि तेव्हा त्याची इच्छा होती की, मी त्याच्याबरोबर जावं. मी सुद्धा त्यांच्या लग्नाला गेले आणि त्यानंतर हा मला घरी सोडायला येत होता. त्यावेळी मला म्हणाला, ज्ञानदा... माझ्या दोन्ही मित्रांची लग्न झाली. त्यांनी पटकन एकाच दिवशी दोघांनीही लग्न केलं. चल आपण सुद्धा लग्न करून टाकूया.असं त्यादिवशी त्याने मला प्रपोज केलं होतं."
त्यानंतर मग हर्षद म्हणाला, "ज्ञानदा ही माझ्यापेक्षा वयाने लहान होती. त्यामुळे आमचं ठरलं होतं की, आपण थोडा वेळ घ्यायचा. ज्ञानदा पुढे म्हणाली, मी २२ व्या वर्षी याच्या प्रेमात पडलीये. आमच्यात ७ वर्षांचा फरक आहे. त्यामुळे त्याचं असं म्हणणं होतं की, तू वेळ घे विचार घे. पण, माझं आधीपासूनच सगळं ठरलं होतं. मग पुढे जेव्हा त्याने लग्नासाठी विचारलं तेव्हा नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता कारण माझं ठरलं होतं की, आपल्याला याच्याशीच लग्न करायचंय." असा प्रेमकहाणीचा किस्सा त्यांनी शेअर केला.