"आमच्या महाराष्ट्राला..." रिक्षाचालकांना मराठी अनिवार्य प्रकरणावर धनंजय पोवारची प्रतिक्रिाय
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2026 12:01 IST2026-04-24T11:59:19+5:302026-04-24T12:01:49+5:30
रिक्षाचालकांना मराठी अनिवार्य प्रकरणावर 'बिग बॉस मराठी ५'मधील धनंजय पोवारने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन आपलं मत व्यक्त केलं आहे.

"आमच्या महाराष्ट्राला..." रिक्षाचालकांना मराठी अनिवार्य प्रकरणावर धनंजय पोवारची प्रतिक्रिाय
येत्या १ मे पासून राज्यातील रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य करण्यात आले आहे. राज्याच्या परिवहन विभागाकडून मराठी न येणाऱ्या रिक्षा चालकांवर कारवाईचा बडगा उचलण्यात येणार आहे. याविरोधात रिक्षाचालकांनी आंदोलन पुकारले आहे. या मुद्द्यावरून सध्या विविध स्तरांवर चर्चा सुरू असून, अनेक मराठी कलाकारही आपली भूमिका मांडताना दिसत आहेत. अशातच 'बिग बॉस मराठी ५'मधील धनंजय पोवारने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन आपलं मत व्यक्त केलं आहे.
धनंजय म्हणाला, "आज १५ लाख लोक रस्त्यावर येत आहे, ते त्यांच्या रोजीरोटीसाठी... त्यांच्या हक्कांसाठी... त्यांच्या हक्कासाठी मराठी लोक उभे राहतील. पण आमच्या भाषेच्या, आमच्या अस्मितेच्या विरोधात जर तुम्ही रस्त्यावर येत असाल, तर तो आमच्या मराठी अस्मितेचा अनादर असेल आणि असे असेल तर तुमची आमच्या महाराष्ट्राला कोणतीही गरज नाही. आजपर्यंत महाराष्ट्रात संघर्षाचा इतिहास आहे आणि तो संघर्ष आमच्यासाठी रोजचा घटक आहे", या शब्दात त्यानं नं मराठी भाषेला विरोध करणाऱ्या रिक्षा चालकांना खडे बोल सुनावले आहेत.

महाराष्ट्र सरकारचा निर्णय काय आहे?
महाराष्ट्र सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी जाहीर केल्यानुसार, येत्या १ मे २०२६ पासून राज्यात रिक्षा आणि टॅक्सी चालवणाऱ्या चालकांना मराठी भाषा येणे अनिवार्य करण्यात आले आहे. ज्यातील परवानाधारक रिक्षा आणि टॅक्सी चालकांची पडताळणी मोहीम राबवली जाणार आहे. ५९ प्रादेशिक परिवहन कार्यालयांमध्ये (RTO) चालकांना मराठी वाचता आणि लिहिता येते की नाही, हे सिद्ध करावे लागेल.
जी व्यक्ती ही अट पूर्ण करू शकणार नाही, त्यांचा परवाना (License) रद्द केला जाऊ शकतो, अशी कडक तरतूद करण्यात आली आहे.महाराष्ट्र सरकारच्या या निर्णयाला युनियनने तीव्र विरोध दर्शविला आहे. निर्णय मागे घेतला नाही तर शशांक राव यांच्या नेतृत्वाखालील ऑटोरिक्षा चालक-मालक संयुक्त कृती समितीने ४ मेपासून तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.