"तुमचं लग्न झालंय का?", १२ वर्षांच्या मुलाचा तो प्रश्न ऐकून संतापलेल्या भारती आचरेकर, म्हणाल्या- "कानाखाली देईन..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2026 17:41 IST2026-05-09T17:40:58+5:302026-05-09T17:41:22+5:30
एका जाहिरातीचं शूटिंग करताना आलेला अनुभव भारती आचरेकर यांनी सांगितला. १२ वर्षांच्या मुलाने त्यांना विचारलेल्या प्रश्नाने त्या संतप्त झाल्या होत्या.

"तुमचं लग्न झालंय का?", १२ वर्षांच्या मुलाचा तो प्रश्न ऐकून संतापलेल्या भारती आचरेकर, म्हणाल्या- "कानाखाली देईन..."
अभिनयाने मराठी आणि हिंदी कलाविश्वात छाप उमटवलेल्या भारती आचरेकर गेली कित्येक दशकं प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. नाटक, सिनेमा आणि मालिकांमध्येही त्यांनी काम केलं आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत भारती आचरेकर यांनी इंडस्ट्रीतील अनुभव शेअर केले. एका जाहिरातीचं शूटिंग करताना आलेला अनुभव भारती आचरेकर यांनी सांगितला. १२ वर्षांच्या मुलाने त्यांना विचारलेल्या प्रश्नाने त्या संतप्त झाल्या होत्या.
अमोल परचुरेंच्या कॅच अप पॉडकास्टमध्ये भारती आचरेकर यांनी हजेरी लावली होती. शूटिंगचा प्रसंग सांगताना त्या म्हणाल्या, "मी जाहिरातीचं शूटिंग करत होते. आजकालची लहान मुलं जरा जास्तच उर्मट आहेत. त्यांच्या आईवडिलांनी त्यांना डोक्यावर बसवलेलं असतं. ते खूप आगाऊ असतात. एक १२ वर्षांचा मुलगा होता. शॉट संपल्यावर तो माझ्या जवळ आला. मला तो काहीतरीच विचारायला लागला. तुमचं लग्न झालंय का? तुम्हाला मुलं आहेत का वगैरे...असे प्रश्न तो विचारत होता. मी त्याच्या आईला सांगितलं की प्लीज याला घेऊन जा. तरी पण त्याने खूप विचित्र प्रश्न विचारले. मग मी त्याच्या आईला म्हटलं की मी आता याला मारेन, तुम्ही प्लीज याला घेऊन जा".
"मी त्याला म्हटलं की मी सरळ कानाखाली देईन. त्यानंतर तो इतका घाबरला की मग निघून गेला. पण हे करावं लागतं. पण ती मुलं आईवडिलांमुळे आगाऊ झाली आहेत. कारण आईवडील इतकं त्यांना डोक्यावर चढवतात. एखादी जरी त्यांना जाहिरात मिळाली किंवा काय मिळालं तरी त्यांना असं वाटतं की माझा मुलगा आता शाहरुखच होणार. त्यामुळे अशा मुलांशी मी बोलणं टाळते", असंही त्यांनी पुढे सांगितलं. सध्या भारती आचरेकर या 'मी जिंकून घेईन सारं' या मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत.