'चला हवा येऊ द्या'च्या दुसऱ्या सीझनमध्ये परत तीच टीम का नव्हती? श्रेया बुगडे म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2026 13:36 IST2026-04-27T13:35:47+5:302026-04-27T13:36:32+5:30
दुसरा सीझन लवकर संपला याचं कारण..., श्रेया बुगडेने केलं स्पष्ट

'चला हवा येऊ द्या'च्या दुसऱ्या सीझनमध्ये परत तीच टीम का नव्हती? श्रेया बुगडे म्हणाली...
'चला हवा येऊ द्या' या विनोदी कार्यक्रमाने १० वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन केलं होतं. डॉ निलेश साबळे, भाऊ कदम, श्रेया बुगडे, सागर कारंडे, कुशल बद्रिके, भारत गणेशपुरे हे कलाकार स्टार झाले. महाराष्ट्रभरातून त्यांना भरभरुन प्रेम मिळालं. मात्र १० वर्षांनंतर टीआरपीच्या कारणामुळे कार्यक्रमाने निरोप घेतला. काही महिन्यांनी कार्यक्रमाचा दुसरा सीझन आला. त्यामध्ये डॉ निलेश साबळे आणि भाऊ कदम दिसले नाहीत. बाकी श्रेया बुगडे, कुशल, भारत गणेशपुरे आणि गौरव मोरे दिसले. याचा अर्थ टीममध्ये धुसफूस झाली का? अशीही चर्चा झाली. आता या सगळ्यावर श्रेया बुगडेने उत्तर दिलं आहे.
'मित्र म्हणे'ला दिलेल्या मुलाखतीत श्रेया बुगडे म्हणाली, "चला हवा येऊ द्या' जेव्हा पहिल्या सीझननंतर थांबलं तेव्हाच असं ठरलं होतं की जेव्हा ते कधीही परत येईल तेव्हा ते सीझन बेस्डच असेल. ते कधीच पुन्हा १० वर्षांसाठी होणार नव्हतं. कारण आता ट्रेण्ड्स बदलले आहेत. लोकांना नवीन नवीन बघायचंय. वाहिनी म्हणून ते वेगळ्या पद्धतीने याकडे बघतायेत. त्यांच्या पण काही गोष्टी आहेत ज्या त्यांना फॉलो करायच्या आहेत. प्रचंड स्पर्धा आहे. आता तर ओटीटी पण आहे. टेलिव्हिजनचीही गणितं बदलली आहेत. त्यामुळे दुसरा सीझन लवकर संपला असं नाही तर हा सीझन एवढाच असणार होता. मर्यादित भागांचाच असणार होता. सोबतच डॉ निलेश साबळेंचं सिनेमाचं काम सुरु होतं. भाऊ एका वेगळ्या सिनेमासाठी शूट करत होता. त्यामुळे अशा वेगवेगळ्या गोष्टींमुळे जी टीम एकत्र आली ती ही होती."
आम्ही अजूनही चांगले मित्र
ती पुढे म्हणाली, "आमचं बाँण्डिंग अजूनही तसंच आहे. अजूनही आम्ही महाराष्ट्रामध्ये कार्यक्रम करतो तेव्हा सगळे एकत्रच असतो. नुकतंच मी आणि भाऊ एका कार्यक्रमात होतो. कुशल, मी, भाऊ, भारत दादा आम्ही भेटत राहतो...माझी तर इच्छा आहे की आमची टीम पुन्हा वेगळ्या स्वरुपात, कार्यक्रमात परत यावी. डॉक्टर तर इतके टॅलेंटेड आहेत त्यांच्याकडे एवढ्या भन्नाट संकल्पना असतात त्यामुळे वाहिनीची साथ मिळाली आणि आम्ही तर आहोतच तर हे नक्की घडू शकेल."