९० च्या दशकातील लोकप्रिय अभिनेता; एकेकाळी शाहरुखसोबत व्हायची तुलना, 'ती' एक घटना अन् करिअरला लागला फुलस्टॉप
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2026 13:26 IST2026-05-18T13:10:01+5:302026-05-18T13:26:55+5:30
शाळेत इतिहासाचा शिक्षक अन् बॉलिवूडमध्ये घेतली एन्ट्री! 'त्या' एका घटनेमुळे करिअर संपलं, आता काय करतो हा अभिनेता?

हिंदी सिनेसृष्टीत ९०च्या दशकात अनेक कलाकारांनी तुफान लोकप्रियता मिळवली. असाच एक अभिनेता ज्याने इंडस्ट्रीत एन्ट्री करताच पहिल्याच सिनेमातून प्रचंड स्टारडम मिळवलं. मात्र, या अभिनेत्याबरोबर अशी काही घटना घडली की ज्यामुळे त्यांच्या करिअरला उतरती कळा लागली.

'तेरे मेरे सपने' आणि गुलजार यांच्या 'माचिस' या चित्रपटांमधील त्यांच्या भूमिकांमुळे प्रेक्षकांनी त्यांना डोक्यावर घेतलं. मात्र नियतीने घात केला आणि नशीबी अयशस्वीतेचा शाप लिहीला गेला.हा अभिनेता म्हणजे चंद्रचूड सिंग.

११ ऑक्टोबर १९६८ रोजी उत्तर प्रदेशातील अलीगढ येथे अभिनेता चंद्रचूड सिंग याचा जन्म झाला. चंद्रचूडचे वडील कॅप्टन बलदेव सिंग हे लष्करी अधिकारी आणि सेवानिवृत्तीनंतरअलीगढच्या खैर येथील आमदार होते, चंद्रचूड यांची आई कृष्णा कुमारी देवी या ओरिसातील बोलांगीरच्या राजघराण्यातील होत्या.

त्याने डेहराडून येथील प्रतिष्ठित वेल्हम बॉईज स्कूल आणि दून स्कूल, डेहराडून येथे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर सेंट स्टीफन कॉलेज, दिल्ली विद्यापीठात महाविद्यालयीन शिक्षण घेतलं.

शालेय जीवनापासून त्याने संगीताची आवड जोपासली होती. कठोर परिश्रमांनी एक प्रशिक्षित भारतीय शास्त्रीय गायक ही झाले. याच शिक्षणाचा उपयोग करुन महाविद्यालयीन शिक्षणानंतर वसंत व्हॅली या शाळेत संगीत शिक्षक नोकरीस सुरुवात केली. नंतर द दून स्कूल येथे काही काळ इतिहास या विषयही विद्यार्थ्यांना शिकवला.

१९९६ साली अमिताभ बच्चन कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणजेच एबीसीएलने घेतलेल्या स्पर्धेत जिंकल्यावर याच संथेची निर्मिती असलेल्या 'तेरे मेरे सपने "या चित्रपटाद्वारे चंद्रचूड सिंग यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं. यानंतर सिनेसृष्टीची दारे त्याच्यासाठी खुली झाली.

'तेरे मेरे सपने' या चित्रपटानंतर 'माचिस','दागः द फायर', तसेच 'जोश' यासारख्या चित्रपटांमध्ये त्याने प्रमुख आणि सहाय्यक भूमिका साकारल्यात. या त्यांच्या चित्रपटांनी तिकीटबारीवर चांगली कामगिरी केली नसली तरी त्यांच्या अभिनयाचे प्रेक्षकांनी कौतुक केलं.चंद्रचूड सिंहने आपल्या कारकिर्दीत ऐश्वर्या राय, प्रीती झिंटा या नायिकांबरोबर काम केलं आहे. तसंच त्याकाळी त्याची तुलना शाहरुखसोबत केली जायची.

मात्र, कारकिर्द बहरत असतांना नियतीने घात केला. पाण्यावर स्कीईंग करत असतांना झालेल्या अपघातामुळे त्यांच्या खांद्याला गंभीर दुखापत झाली. अनेक दिवस बेडरेस्ट करावी लागल्याने त्याचा शरीरयष्टीवर परिणाम झाला. हातातील अनेक चित्रपट दुस-या कलावंतांकडे गेले. पुन्हा पदार्पण करण्याचा प्रयत्न केला पण मनासारख्या भूमिका मिळाल्या नाहीत.

वैयक्तिक आयुष्यात अभिनेत्या अवंतिका कुमारी यांच्याशी लग्न केलं. या दाम्पत्याला २००७ मध्ये श्रानजाई सिंग हा मुलगा झाला.परंतु, लग्नानंतर काही वर्षातच हे दोघे वेगळे राहू लागले. तेव्हापासून चंद्रचूड सिंग एकट्यानेच आपल्या मुलाचे संगोपन करत आहे.
















