आम्ही कोणीच नाही का! मोजकेच पापाराझी आलेले पाहून नीतू कपूर शॉक; नक्की काय झालं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2026 13:24 IST2026-05-07T13:24:25+5:302026-05-07T13:24:56+5:30
"आज इतके कमी लोक कसे?" असा प्रश्न नीतू कपूर यांनी उपस्थित केला. पुढे काय घडलं वाचा

आम्ही कोणीच नाही का! मोजकेच पापाराझी आलेले पाहून नीतू कपूर शॉक; नक्की काय झालं?
अभिनेत्री नीतू कपूर यांचा 'दादी की शादी' सिनेमा आजच रिलीज झाला. या सिनेमात त्यांची मुलगी रिद्धिमा कपूरने वयाच्या ४५ व्या वर्षी पदार्पण केलं आहे. तसंच कपिल शर्माही सिनेमात मुख्य भूमिकेत आहे. नुकतंच दोघी या चित्रपटाच्या विशेष स्क्रिनिंगसाठी पोहचल्या होत्या. मात्र, यावेळी पापाराझींची अत्यंत कमी गर्दी पाहून नीतू कपूर शॉक झाल्या. नेहमीप्रमाणे फोटोग्राफर्सचा गराडा असण्याऐवजी तिथे केवळ मोजकेच जण पाहून नीतू कपूर यांनी आश्चर्य व्यक्त केले आणि "आज इतके कमी लोक कसे?" असा प्रश्न उपस्थित केला. पुढे काय घडलं वाचा
नीतू कपूर यांच्या प्रश्नाला उत्तर देताना एका फोटोग्राफरने सांगितले की, "काल रणबीर कपूर आणि आलिया भट्ट आले होते ना, म्हणून आज गर्दी कमी आहे." काल झालेल्या स्क्रिनिंगला रणबीर-आलियाने हजेरी लावली होती, त्यामुळे आज अनेक फोटोग्राफर्सनी दांडी मारल्याचे ऐकताच नीतू कपूर मिश्किलपणे म्हणाल्या, "का, आम्ही कोणीच नाहीये का?(क्यूँ हम लोग कुछ नही है क्या?) नमस्ते बॉलिवूड या सेलिब्रिटी फोटोग्राफर इन्स्टाग्राम पेजने व्हिडीओ पोस्ट आहे.
नीतू कपूर यांचा हा प्रश्न ऐकताच तिथे उपस्थित असलेल्या फोटोग्राफर्सची तारांबळ उडाली आणि त्यांनी परिस्थिती सावरून घेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर नीतू कपूर यांनी हसतमुखाने पापाराझींना पोझ दिली. यावेळी त्यांच्यासोबत त्यांची मुलगी रिद्धिमा कपूर साहनी देखील उपस्थित होती.
आशिष आर. मोहन यांनी सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. हा एक कौटुंबिक विनोदी चित्रपट असून यामध्ये कपिल शर्मा आणि सादिया खातीब यांच्या लग्नाभोवती फिरणारी कथा आहे. कथेला वळण तेव्हा येते जेव्हा सादियाच्या आजीची (नीतू कपूर) भूमिका साकारणारी व्यक्तिरेखा स्वतः लग्नाचा निर्णय घेते. आर. सरथकुमार, निखत हेगडे आणि तेजस्विनी कोल्हापुरी यांच्याही या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका आहेत.