"आता हा दिग्दर्शन करणार, बघू काय दिवे लावतो...", रितेशने सांगितली दिग्दर्शनाच्या निर्णयामागची गोष्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2026 16:25 IST2026-04-25T16:24:29+5:302026-04-25T16:25:06+5:30
रितेशने 'वेड' सिनेमातून दिग्दर्शनात पाऊल ठेवलं होतं. पण, दिग्दर्शन करताना त्याला दडपण आलं होतं. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्याने दिग्दर्शनाच्या निर्णयामागची गोष्ट सांगितली.

"आता हा दिग्दर्शन करणार, बघू काय दिवे लावतो...", रितेशने सांगितली दिग्दर्शनाच्या निर्णयामागची गोष्ट
रितेश देशमुख त्याच्या 'राजा शिवाजी' सिनेमामुळे चर्चेत आहे. या सिनेमात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारण्याबरोबरच रितेशने चित्रपटाचं दिग्दर्शनही केलं आहे. रितेशने 'वेड' सिनेमातून दिग्दर्शनात पाऊल ठेवलं होतं. पण, दिग्दर्शन करताना त्याला दडपण आलं होतं. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्याने दिग्दर्शनाच्या निर्णयामागची गोष्ट सांगितली.
"जेव्हा मी सिनेमात काम करण्याचा निर्णय घेतला तेव्हा मी माझ्या वडिलांना ही गोष्ट सांगितली. तेव्हा मी आर्किटेक्ट म्हणून काम करत होतो. माझी स्वत:ची एक फर्म होती. त्यांनी मला विचारलं की तू निर्मिती करणार आहेस का? मी म्हटलं नाही मी अभिनय करणार आहे. ते मला म्हणाले की ठरवं...तुझं आयुष्य आहे काय करायचं ते तू ठरव. मी त्यांना म्हणालो की तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात आणि मला कोणीच ओळखत नाही. आणि असं कोणी नाही की तुम्हाला ओळखत नाही. पण मी जेव्हा सिनेमात काम करेन आणि तेव्हा माझ्या लिहिलं जाईल. तेव्हा माझं काम चांगलं झालं नाही तर कदाचित तुमच्या नावाची बदनामी होऊ शकते. म्हणून मी तुम्हाला विचारतोय काय केलं पाहिजे. त्यांनी मला एक वाक्य सांगितलं की तू तुझ्या नावाची काळजी घे. मी माझ्या नावाची घेतो. हे वाक्य खूप काही शिकवून जातं", असं रितेश अथर्व सुदामेला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला.
दिग्दर्शनाच्या निर्णयाबाबत रितेशने सांगितलं की "आपण चांगलं काम केलं आणि प्रामाणिकपणे केलं तर लोकांना ते आवडतं. जेव्हा मी वेड दिग्दर्शित करणार होतो तेव्हा चार लोक काय म्हणतील असा विचार आला. जेवढं दिसतं तेवढं ते सोपं नाही. कारण इतकी वर्ष अभिनेता म्हणून काम केल्यानंतर आता हा दिग्दर्शित करणार का, बघू आता काय दिवे लावतो, असा प्रश्न येतोच. मी सेटवर गेल्यानंतर आतापर्यंत कॅमेऱ्यासमोर होता आता हा सांगणार का शॉट कसा लावायचा..हे असतंच. जेव्हा मी निर्णय घेतला तेव्हा जिनिलीया म्हणाली की काय होईल जास्तीत जास्त...वाईट सिनेमा होईल. कदाचित नाही जमणार, पण प्रयत्न तर केले. म्हणून वेड त्या प्रयत्नातून झाला".