'जारण'चा नवा विक्रम! १२ दिवसांत कमावले इतके कोटी
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 17:27 IST2025-06-18T17:27:08+5:302025-06-18T17:27:49+5:30
Jarann Marathi Movie : 'जारण' चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून दमदार अभिनय, हृदयाला भिडणारी कथा आणि उत्तम दिग्दर्शन यामुळे चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे.

'जारण'चा नवा विक्रम! १२ दिवसांत कमावले इतके कोटी
'जारण' (Jarann Marathi Movie)चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आणि या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात खास स्थान मिळवत आहे. दमदार अभिनय, हृदयाला भिडणारी कथा आणि उत्तम दिग्दर्शन यामुळे चित्रपटाने केवळ १२ दिवसांत तब्बल ३.५ कोटी रुपयांची कमाई करत बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. विशेष म्हणजे, दुसऱ्या आठवड्यात केवळ विकेण्डला या चित्रपटाने तब्बल १.६५ कोटींचा गल्ला जमवला आहे, जो अलीकडच्या काळातील सर्वाधिक असल्याचे मानले जात आहे.
वर्ड ऑफ माऊथ, दमदार अभिनय, वास्तवाशी नाते सांगणारी कथा आणि उत्तम दिग्दर्शन यांच्या जोरावर ‘जारण’ने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. अमृता सुभाष आणि अनिता दाते यांच्या सशक्त अभिनयाने या कथेला भावनिक उंची मिळाली असून, त्यांचा अभिनय पाहून प्रेक्षक भारावून गेले आहेत. सोशल मीडियावर दोघींच्या अभिनयाची आणि चित्रपटाच्या कथेची जोरदार चर्चा सुरू आहे. चित्रपटाच्या यशस्वी वाटचालीमुळे चित्रपटगृहात शोज वाढवले जात आहेत आणि प्रत्येक शोमध्ये प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद दिसून येत आहे. कथानकातील सत्यता, भावनांची खोली, आणि उत्तम सादरीकरण यामुळे चित्रपट सर्व वयोगटातील प्रेक्षकांची मने जिंकत आहे.
दिग्दर्शक हृषिकेश गुप्ते म्हणतात, '''जारण'सारखा संवेदनशील विषय प्रेक्षकांसमोर सादर केला, ज्याला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला याचा खूप आनंद होतो. इतक्या मोठ्या प्रमाणात प्रेक्षक, समीक्षक आणि इंडस्ट्रीतील दिग्गजांनी कथा आणि सादरीकरणाचं कौतुक केलं, हे एखाद्या दिग्दर्शकासाठी अत्यंत समाधानकारक आहे. प्रत्येक प्रतिक्रिया, प्रत्येक शाबासकी आम्हाला पुढच्या प्रवासासाठी प्रेरणा देते.''
अनिस बाझमी प्रॅाडक्शन्स प्रस्तुत, ए अँड एन सिनेमाज, एलएलपी यांच्या सहयोगाने आणि ए३ इव्हेंट्स अँड मिडिया सर्व्हिस निर्मित ‘जारण’चे लेखन व दिग्दर्शन हृषीकेश गुप्ते यांनी केले असून अमोल भगत आणि नितीन भालचंद्र कुलकर्णी यांनी निर्मितीची धुरा सांभाळली आहे. तर मनन दानिया सहनिर्माते आहेत. चित्रपटात अभिनेत्री अमृता सुभाष व अनिता दाते यांच्या प्रमुख भूमिका असून किशोर कदम, ज्योती माळशे, विक्रम गायकवाड, राजन भिसे, अवनी जोशी, सीमा देशमुख यांचाही दमदार अभिनय पाहायला मिळत आहे.