गायनातून निवृत्ती घेतलेला अरिजीत सिंह आता राजकारणात उतरणार? 'या' राज्यातून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2026 15:34 IST2026-01-29T15:31:56+5:302026-01-29T15:34:48+5:30
भारतीय संगीत विश्वातील प्रसिद्ध गायक अरिजीत सिंहने नुकतीच पार्श्वगायनातून निवृत्ती घेण्याची घोषणा करून सर्वांना धक्का दिला आहे. मात्र, या धक्क्यातून चाहते सावरत असतानाच आता त्याच्याबद्दल एक मोठी बातमी समोर येत आहे.

गायनातून निवृत्ती घेतलेला अरिजीत सिंह आता राजकारणात उतरणार? 'या' राज्यातून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा
भारतीय संगीत विश्वातील प्रसिद्ध गायक अरिजीत सिंहने (Arijit Singh) नुकतीच पार्श्वगायनातून निवृत्ती घेण्याची घोषणा करून सर्वांना धक्का दिला आहे. मात्र, या धक्क्यातून चाहते सावरत असतानाच आता त्याच्याबद्दल एक मोठी बातमी समोर येत आहे. अरिजीत सिंह आताराजकारणात प्रवेश करणार असल्याची चर्चा वर्तवण्यात येत आहे. जाणून घ्या याविषयी सविस्तर.
NDTV ने दिलेल्या रिपोर्टनुसार अरिजीत सिंह पश्चिम बंगालमध्ये आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर स्वतःचा राजकीय पक्ष लाँच करण्याची तयारी करत आहे. तो केवळ पक्षच काढणार नाही, तर निवडणूकही लढवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अरिजीतचा त्याच्या मूळ गावी म्हणजे मुर्शिदाबाद आणि संपूर्ण पश्चिम बंगालमध्ये खूप मोठा चाहता वर्ग आहे. हा प्रभाव पाहता, अरिजीत राजकारणात उतरल्यास त्या भागातील राजकीय क्षेत्रात मोठी उलथापालथ होऊ शकते, असा अंदाज व्यक्त केला जातोय.
पक्ष स्थापन करण्याच्या आधी अरिजीतला तळागाळातील भागात काम करण्याची इच्छा आहे. त्यामुळे राजकारणात उतरण्यापूर्वी अरिजीतला लोकांचं मन जिंकायचं आहे, असं सांगण्यात येतंय. अरिजीतने यावर अजून अधिकृत वक्तव्य जारी केलं नाहीये. अरिजीत राजकारणात उतरल्यावर त्याचे चाहते त्याला सपोर्ट करणार का, हे भविष्यात दिसून येईल.
अरिजीतने पार्श्वगायनातून घेतली निवृत्ती
काही दिवसांपूर्वीच अरिजीतने सोशल मीडिया पोस्टद्वारे आपण यापुढे चित्रपटांसाठी गाणी गाणार नसल्याचे जाहीर केले होते. "मी आता थांबत आहे," अशा शब्दांत त्याने आपल्या प्रदीर्घ आणि यशस्वी प्ले बॅक सिंगिंग प्रवासाला पूर्णविराम दिला होता. तेव्हापासूनच तो भविष्यात काय करणार, याबद्दल तर्कवितर्क लढवले जात होते. जर अरिजीत सिंहने खरोखरच नवा पक्ष स्थापन केला, तर पश्चिम बंगालच्या राजकारणात तृणमूल काँग्रेस (TMC) आणि भाजप (BJP) यांच्यासमोर एक तिसरा मोठा पक्ष निर्माण होऊ शकतो.