मम्मी, प्लीज वापस आओ! सिमल्यात शूट करत होत्या नीतू कपूर, रणबीरला वाटली काळजी; थेट...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2026 09:35 IST2026-05-07T09:33:39+5:302026-05-07T09:35:34+5:30
कपिल शर्माने सांगितला 'दादी की शादी' शूटिंगवेळचा किस्सा

मम्मी, प्लीज वापस आओ! सिमल्यात शूट करत होत्या नीतू कपूर, रणबीरला वाटली काळजी; थेट...
बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरची आई आणि ज्येष्ठ अभिनेत्री नीतू कपूर सध्या त्यांच्या 'दादी की शादी' या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. हा चित्रपट आज ८ मे रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. नुकत्याच पार पडलेल्या सिनेमाच्या प्रमोशन कार्यक्रमात चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचा एक रंजक किस्सा समोर आला आहे. सिमला येथे शूटिंग सुरू असताना रणबीर कपूर आईच्या सुरक्षेबाबत खूप काळजीत होता आणि त्याने तिला चित्रीकरण सोडून परत येण्यास सांगितले होते. नक्की काय घडलं होतं.
'दादी की शादी'मध्ये कपिल शर्मा मुख्य भूमिकेत आहे. सिमल्यातील शूटिंगवेळचा किस्सा सांगताना तो म्हणाला, "सिनेमाच्या शूटवेळी काय काय नाही झालं? युद्ध झालं..त्यावेळी परिस्थिती इतकी गंभीर बनली होती की रणबीरने नीतू यांना फोनही केला. तो म्हणाला, 'मम्मा,प्लीज वापस आ जाओ' . " यावर नीतू म्हणाल्या, " हो, पण मी त्याला तेव्हा म्हणाले की ही सर्वात सुरक्षित जागा आहे. इथे कोणी बॉम्ब मारणार नाही. पण जेव्हा युद्धाची परिस्थिती होती तेव्हा कोणीच काहीही बोललं नाही. सगळ्यांनी काम केलं. कारण सगळेच सिनेमासाठी खूप उत्साहित होते. कोणाचीच जायची इच्छा नव्हती."
या चित्रपटाद्वारे रणबीरची बहीण रिद्धिमा कपूर साहनी बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. रिद्धिमाने सांगितले की, "शूटिंगदरम्यान सर्व कलाकारांमध्ये एक सुंदर नाते तयार झाले होते, त्यामुळे कोणालाही काम सोडून जावंसं वाटलं नाही. नीतू कपूर यांनी हे देखील स्पष्ट केले की, सिमल्यात जागेची कमतरता असल्यामुळे तिथे वॅनिटी व्हॅनची सोय नव्हती, त्यामुळे सर्व कलाकार कॉटेजमध्ये एकत्र राहत असत, ज्यामुळे त्यांच्यातील मैत्री अधिक घट्ट झाली."
दिग्दर्शक आशिष आर. मोहन यांचा 'दादी की शादी' हा एक कौटुंबिक विनोदी चित्रपट आहे. या चित्रपटात नीतू कपूर पुन्हा लग्न करण्याचा निर्णय घेतात, ज्याला त्यांची मुलगी रिद्धिमा विरोध करते, अशी मनोरंजक कथा मांडण्यात आली आहे. चित्रपटात कपिल शर्मा, नीतू कपूर, रिद्धिमा कपूर, आर. सरथकुमार आणि सादिया खातीब यांच्या प्रमुख भूमिका आहेत. सिनेमात सोनू निगम आणि सुनिधी चौहान यांनी गायलेलं 'सुनो न दिल' हे गाणं सध्या गाजत आहे.