वडिलांनी हात जोडले, ढसाढसा रडले, तरी मोनालिसाचं फरमानशी लग्न; आजी म्हणते, "तो भिकारी!"
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2026 15:58 IST2026-03-12T15:57:22+5:302026-03-12T15:58:17+5:30
महाकुंभमधील 'व्हायरल गर्ल' मोनालिसा आणि फरमान खान यांच्या लग्नाने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.

वडिलांनी हात जोडले, ढसाढसा रडले, तरी मोनालिसाचं फरमानशी लग्न; आजी म्हणते, "तो भिकारी!"
महाकुंभमधील 'व्हायरल गर्ल' मोनालिसा आणि फरमान खान यांच्या लग्नाने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. महाकुंभमधून प्रसिद्धी मिळाल्यानंतर मोनालिसाच्या करिअरने मोठी झेप घेतली होती. तिने चित्रपट आणि म्युझिक अल्बम्समध्ये काम करायला सुरुवात केली. तिच्या यशाने कुटुंब आणि चाहते आनंदी होते. मात्र अशातच दुसऱ्या धर्मात लग्न केल्याच्या बातमीने तिच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. मोनालिसाच्या लग्नावर तिच्या आजीने प्रतिक्रिया दिली आहे.
मोनालिसाने आपल्या बॉयफ्रेंडसाठी कुटुंबाचा विश्वासघात केला आहे. मुलीच्या या निर्णयामुळे तिचे कुटुंबीय कोलमडून गेले आहेत. 'न्यूज १८' शी बोलताना आजी प्रमिला म्हणाली, "मोनालिसा उज्जैनमध्ये शिक्षण घेत होती. तिथे कोणीतरी तिला सागितलं की, तू इथे बसून काय करणार? गाणं-नाचणं शिकलीस तर मोठी होशील. जर उज्जैनमध्येच राहिलीस तर प्रगती कशी होणार? असं बोलून त्या मुलीला फसवलं. माझा मुलगा (मोनालिसाचे वडील) देखील आपली मुलगी काहीतरी शिकून मोठी होईल या आशेने तिला घेऊन गेला."
आजी पुढे म्हणाली की, तिला हिरोईन व्हायचं होतं. माझ्या मुलाला काय माहिती होतं की मुलगी असं काही करेल? आम्ही शिवरात्री साजरी करायला गेलो होतो, तेव्हा माझा मुलगा तिला केरळला घेऊन गेला होता. आम्हाला सांगण्यात आलं होतं की, गळ्यात माळा घालून फिरलात तर प्रगती कशी होणार? याच विचाराने तो तिला उज्जैनबाहेर घेऊन गेला. काल माझा मुलगा पोलीस ठाण्यात ढसाढसा रडला. त्याने त्या दोघांची तिकिटे काढली होती, पण विमानतळावर पोहोचताच त्याला गाडीतून ढकलून देण्यात आलं.
पोलिसांनी त्याला निघून जायला सांगितलं, पण तो आपल्या मुलीला सोडून कसा येणार? त्याच्याकडे पैसे नव्हते आणि फोनमध्ये चार्जिंग नसल्यामुळे कोणाशी संपर्कही होऊ शकला नाही. आम्हाला सर्व लोक सांगायचे की ही मुलगी तुमच्या पसंतीने लग्न करणार नाही. ती आता अभिनेत्री झाली आहे, ती स्वतःच्या मर्जीनेच लग्न करणार. आम्ही तिला लग्नासाठी कधीच सक्ती केली नाही, आम्ही फक्त तिला मोठं बनवण्याचा विचार करत होतो."
मोनालिसाने कॅमेऱ्यासमोर सांगितलं होतं की, तिला तिच्या कुटुंबापासून धोका आहे आणि कुटुंबीय तिचं लग्न दुसरीकडे लावून देत होतं. यावर आजी म्हणाली, "हे सर्व ती मुद्दाम बोलत आहे. स्वतःला वाचवण्यासाठी तिने हे आरोप केले आहेत. तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नका. जर आम्हाला जबरदस्ती लग्न लावायचं असतं तर गावात काय सरकार नव्हतं का? तिने स्वतःच्या मर्जीने लग्न केलं असतं तरी आम्ही आनंदीच झालो असतो. किमान ती या माळा विकण्याच्या कामातून तरी बाहेर पडली असती, असं आम्हाला वाटलं असतं."
"मोनालिसाचे वडील तिच्यासमोर गयावया करून हात जोडून रडत होते, तिला सांगत होते की बेटा किमान सांगून तरी जायचं होतं. जी आपल्या वडिलांची होऊ शकली नाही, ती माझी काय होणार? ती पासपोर्ट बनवण्यासाठी आली होती, आम्ही घरातील पैसे खर्च करून तिचा पासपोर्ट बनवला. तेव्हा ती लहान होती, आता १८ वर्षांची झाली आहे. तिने वडिलांना सांगितलं की आपण केरळला फिरायला जाऊया. पण जेव्हा तिला घरी परतण्यासाठी विचारलं, तेव्हा ती म्हणते की मला तिथे जायचे नाही, तिथे लोक मला घेरतात."
जेव्हा आजीला विचारलं गेलं की, जर ती तिच्या पतीसोबत घरी आली तर तुम्ही तिला स्वीकाराल का? त्यावर त्या म्हणाल्या, "ती करोडपतीला सोडून एका भिकाऱ्याच्या घरी गेली आहे. तो भिकारी आहे. आम्ही तिला का मारू? आम्हाला काय फासावर जायचं आहे का? प्रत्येकजण म्हणायचं की, तुमची मुलगी तुमच्या जातीत लग्न करणार नाही आणि आम्हीही तेच मान्य केलं होतं की ती वेगळ्या जातीत लग्न करेल. आता तिला जिथे राहायचे आहे तिथे राहूदे."