'जेंडर'पेक्षा कथा महत्त्वाची! 'धुरंधर'च्या चाहत्यांकडून ट्रोल होतेय आलिया भट; कारण काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2026 15:15 IST2026-05-13T15:15:00+5:302026-05-13T15:15:30+5:30
भारतीय सिनेमाबद्दल असं काय म्हणाली आलिया भट?

'जेंडर'पेक्षा कथा महत्त्वाची! 'धुरंधर'च्या चाहत्यांकडून ट्रोल होतेय आलिया भट; कारण काय?
बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट 'कान्स फिल्म फेस्टिवल २०२६' मध्ये सहभागी झाली आहे. या सोहळ्यातील आलियाचा प्रत्येक लूक चाहत्यांच्या पसंतीस पडला आहे. कान्समध्ये आलियाने अनुपमा चोप्राला मुलाखत दिली. यावेळी तिने पुरुष प्रधान सिनेमांना मिळणाऱ्या प्राधान्यावर बोट ठेवलं. महिलांनाही अशा प्रकारची संधी का मिळत नाही याबद्दल तिने चर्चा केली. यावरुन आलियाला तिच्या आगामी 'अल्फा'बद्दल चिंता सतावते की काय असा अंदाज नेटकऱ्यांनी लावला.
'द हॉलिवूड रिपोर्टर इंडिया'ला दिलेल्या मुलाखतीत आलियाने हॉलिवूडमधील 'बार्बी' आणि 'द डेव्हिल वेअर्स प्राडा २' सारख्या चित्रपटांची उदाहरणे देत सांगितले की, "या चित्रपटांच्या प्रेक्षकांमध्ये महिलांची संख्या मोठी होती. याउलट भारतात जेव्हा बॉक्स ऑफिसचा विषय येतो, तेव्हा ७५ टक्के प्रेक्षक पुरुष असल्याने केवळ त्यांच्या आवडीचे मास चित्रपट बनवण्यावर भर दिला जातो. जर आपण फक्त पुरुषांना केंद्रस्थानी ठेवून चित्रपट बनवले, तर महिला प्रेक्षकांचे काय?"
आलिया पुढे म्हणाली की, "पुरुषांना सिनेमापासून दूर ठेवा असं मी म्हणतच नाही. पण कोणालाच दूर का ठेवायचं? चित्रपट हे 'जेंडर ॲग्नोस्टिक' असायला हवेत जिथे केवळ कथेला महत्त्व असेल. कलाकार स्त्री असो वा पुरुष, कथानक प्रभावी असणे गरजेचे आहे."
आलियाच्या या विधानानंतर सोशल मीडियावर ट्रोलिंग सुरू झाले असून, काही नेटिझन्सनी तिच्या या विधानाचा संबंध 'धुरंधर' चित्रपटाच्या अभूतपूर्व यशाशी जोडला आहे. काही युजर्सच्या मते 'धुरंधर' मुळे आलियाला तिच्या 'अल्फा' सिनेमाबद्दल काळजी वाटत आहे. दुसरीकडे, अनेक चाहत्यांनी आलियाच्या विचारांचे समर्थनही केले आहे. आलिया केवळ कथा आणि महिला-केंद्रित चित्रपटांना समान स्थान मिळावे याबद्दल बोलत असून लोकांनी तिचे विधान चुकीच्या पद्धतीने घेऊ नये, असे मत तिच्या चाहत्यांनी मांडले आहे.
दरम्यान, आलिया सध्या तिच्या आगामी 'अल्फा' आणि 'लव्ह अँड वॉर' या चित्रपटांच्या कामात व्यग्र आहे. 'अल्फा' याच वर्षी जुलैमध्ये प्रदर्शित होणार असून 'लव्ह अँड वॉर'साठी चाहत्यांना २०२७ पर्यंत वाट पाहावी लागणार आहे.