'हेरा फेरी ३' विषयी अक्षय कुमारने थोडक्यात सांगून विषय संपवला, म्हणतो- "सध्या काहीच..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2026 16:31 IST2026-04-16T16:25:52+5:302026-04-16T16:31:40+5:30
इन्स्टाग्रामवर लाईव्ह येऊन आपल्या चाहत्यांशी संवाद साधला. या लाईव्ह सेशनमध्ये त्याने चाहत्यांच्या अनेक प्रश्नांची उत्तरे दिली, मात्र सर्वांचे लक्ष वेधून घेतले ते अक्षयच्या 'हेरा फेरी ३' बाबतच्या विधानाने. काय म्हणाला अक्षय?

'हेरा फेरी ३' विषयी अक्षय कुमारने थोडक्यात सांगून विषय संपवला, म्हणतो- "सध्या काहीच..."
बॉलिवूडचा 'खिलाडी' अक्षय कुमार सध्या त्याच्या आगामी 'भूत बंगला' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. हा चित्रपट १७ एप्रिलपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. प्रदर्शनापूर्वी अक्षयने इन्स्टाग्रामवर लाईव्ह येऊन आपल्या चाहत्यांशी संवाद साधला आणि त्यांना एक सुखद धक्का दिला. या लाईव्ह सेशनमध्ये त्याने चाहत्यांच्या अनेक प्रश्नांची उत्तरे दिली, मात्र सर्वांचे लक्ष वेधून घेतले ते अक्षयच्या 'हेरा फेरी ३' बाबतच्या विधानाने. काय म्हणाला अक्षय?
'हेरा फेरी ३' बाबत काय आहे अपडेट?
इन्स्टाग्राम लाईव्ह दरम्यान एका चाहत्याने जेव्हा अक्षयला 'हेरा फेरी ३' बद्दल विचारले, तेव्हा अक्षय म्हणाला, "हेरा फेरी! मला माहीतच होते की हा प्रश्न नक्कीच विचारला जाणार. पण 'हेरा फेरी ३' बाबत सध्या तरी काहीही नवीन अपडेट नाही, सध्या तरी त्यावर काहीच सुरू नाहीये." अक्षयच्या या उत्तरामुळे या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या चाहत्यांची थोडी निराशा झाली आहे.
वादाच्या भोवऱ्यात 'हेरा फेरी ३'
'हेरा फेरी ३' ची घोषणा झाल्यापासून हा चित्रपट सातत्याने बातम्यांमध्ये आहे. या चित्रपटात अक्षय कुमार, परेश रावल आणि सुनील शेट्टी हे त्रिकुट पुन्हा एकदा एकत्र दिसणार होतं. मात्र, काही काळापूर्वी परेश रावल यांनी क्रिएटीव्ह मतभेदांमुळे चित्रपट सोडल्याच्या चर्चांनी जोर धरला होता. इतकेच नाही तर, अक्षय कुमारच्या प्रोडक्शन हाऊसने त्यांना कायदेशीर नोटीस पाठवली होती. सुदैवाने, नंतर हा वाद मिटला आणि परेश रावल पुन्हा एकदा चित्रपटात परतले.
'हेरा फेरी'चा पहिला भाग २००० मध्ये प्रदर्शित झाला होता, ज्याचे दिग्दर्शन प्रियदर्शन यांनी केले होते. या चित्रपटातील बाबू भैय्या (परेश रावल), राजू (अक्षय कुमार) आणि श्याम (सुनील शेट्टी) ही पात्रे अजरामर झाली. त्यानंतर २००६ मध्ये 'फिर हेरा फेरी'ने देखील बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. आता तिसऱ्या भागाबाबत काही अंतर्गत वाद आणि तांत्रिक अडचणी सुरू असल्यामुळे हा चित्रपट नेमका कधी पडद्यावर येणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.