शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

शरद पवार ‘असे’ का बोलले असतील?

By यदू जोशी | Updated: April 14, 2023 07:28 IST

पवार यांना नेहमीच दूरचे दिसते. यावेळीही त्यांना काही दिसले असावे, आणि म्हणूनच त्यांनी भाजपला हलके मधाचे बोट लावले असावे का?

पवार यांना नेहमीच दूरचे दिसते. यावेळीही त्यांना काही दिसले असावे, आणि म्हणूनच त्यांनी भाजपला हलके मधाचे बोट लावले असावे का? 

‘आपण भाजपसोबत गेले पाहिजे’, असा आग्रह धरणारे काही नेते राष्ट्रवादीमध्ये आहेत. शरद पवार यांनी शिवसेना, काँग्रेसला सोबत घेऊन महाविकास आघाडीचा प्रयोग केला, त्याआधी आणि नंतरही राष्ट्रवादीचे नेते भाजपसोबत चला असा हट्ट करत होते पण, साहेब ठाम राहिले. अजित पवार यांचे बंड त्यांनी मोडून काढले. (ते बंड त्यांनीच अजितदादांना करायला सांगितले होते, असाही एक  तर्क दिला जातो.)

भाजपसोबत पवार साहेब स्वत: का गेले नाहीत ? - असे म्हणतात की, पुलोद सरकार स्थापन करताना वसंतदादा पाटील यांच्या पाठीत खंजीर खुपसल्याच्या आरोपांचे ओझे इतकी वर्षे वाहत असल्याने त्यांना आता भाजपसोबत जाऊन नवीन ओझे डोक्यावर घ्यायचे नसावे. - पण ‘पवार काहीही करू शकतात’ हे त्यांनी सिद्ध करून दाखविले आणि २०१९ मध्ये भाजपला सत्तेपासून दूर ठेवले. ‘मी पुन्हा येणार’ या देवेंद्र फडणवीसांच्या निर्धाराला त्यांनी वेसण घातली. आपल्याच काही सहकाऱ्यांचा हट्ट पुरवून पवार भाजपसोबत गेले असते तर, केंद्र व राज्यात सत्तेचा वाटा मिळाला असता. कन्येला मंत्री म्हणून स्थापित करता आले असते.

मात्र, भाजपच्या विरोधातच राजकारण करण्याची भूमिका घेत त्यांनी तो मोह आवरला. भाजप विरोधात देश पातळीवर विरोधी पक्षांची मोट बांधण्यात महत्त्वाची भूमिका निभावणारा नेता, अशी पवार यांची परवापर्यंत प्रतिमा होती. गेल्या आठवड्याभरातील त्यांच्या विधानांनी या प्रतिमेला तडा गेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विख्यात उद्योगपती गौतम अदानी यांच्यावर शरसंधान साधत मोदी / भाजपविरोधात काँग्रेसने देश पातळीवर वातावरण तापवले असतानाच पवार यांनी  अचानक अदानी यांची तारीफ केली अन् विरोधकांचे चाक पंक्चर झाले. यामागे पवार यांची मोठी राजकीय खेळी असल्याचे कोणाला वाटत असेलही पण, अदानी यांच्याशी असलेली मैत्री त्यांनी निभावली, हा वास्तवाच्या जवळ जाणारा अर्थ आहे. राजकारणापलिकडे जाऊन अशी मैत्री काही व्यक्तींबाबत त्यांनी यापूर्वीही निभावल्याचे दाखले आहेत.

अदानींची प्रशंसा करून मित्रपक्षांची नाराजी  ओढवून घेण्याचा धोका आहे, शिवाय आपण भाजपच्या जवळ गेल्याचा आरोपदेखील होईलच, याचे भान पवारांना नक्कीच असणार. तरीही त्यांनी तो धोका पत्करला.  त्यानंतर दोनच दिवसांनी उद्धव ठाकरे यांच्या संदर्भात पवार जे काही बोलले ते अधिक महत्त्वाचे आणि पुढील संभाव्य राजकारण स्पष्ट करणारे आहे. सोबतच्या घटक पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांशी सल्लामसलत न करताच उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला होता, उद्याचे सांगता येत नाही, पहाटेचा शपथविधी पुन्हा होईल की नाही हे आज सांगता येणार नाही, पण कोणी तशी भूमिका घेतलीच तर ती त्यांची वैयक्तिक भूमिका असेल... ही पवार यांची विधाने मविआला चिंतेत टाकणारी आहेत. 

पवार असे का बोलले असावेत? संभाजीनगरमधील सभेने उद्धव ठाकरे हेच महाविकास आघाडीचे एकखांबी नेते आहेत, हे चित्र समोर आले ते पवार यांना खटकले असावे, असा अर्थ काढला जात आहे. मुख्यमंत्री म्हणून ठाकरे यांचे नेतृत्व स्वीकारणे ही त्यावेळची मजबुरी होती. मविआचे नेते म्हणून त्यांना नेतृत्व द्यायला पवार यांची तयारी नाही, असा तर्क काढण्यास  वाव आहे. कारण मविआचे नेतृत्व ठाकरेंकडे गेले तर पवारांच्या अधिपत्याचा संकोच होतो. आपले वर्चस्व अबाधित राहावे, यासाठी आपल्या पुतण्याला झुकवले ते ठाकरेंना मविआचे नेतृत्व देतील, अशी शक्यता नाही.

दुसरे म्हणजे पवार हे ठाकरेंना कंटाळलेलेही असू शकतात. एकतर दोघांचा स्वभाव मेळ खात नाही. ठाकरे हे त्यांच्या तत्त्वांना भावनिकतेचा मुलामा लावतात. पवार हे भावनिक मुद्यांना तत्त्वांचा मुलामा लावतात, हा मूळ फरक! शिवाय दोघांची धाटणी वेगळी. ‘एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात आम्ही विधानसभेची निवडणूक लढू’, असे देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे नेते आज  सांगत तरी आहेत पण, ‘आम्ही उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात लढणार’ असे राष्ट्रवादीचा एकही नेता म्हणत नाही. पुढचे राजकारण त्यातच लपले आहे. 

हिंदुत्ववादी भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी हिंदुत्ववादी शिवसेनेला पवार यांनी २०१९ मध्ये जवळ केले. तेव्हाही त्या मागे वैचारिक शुद्धता (आयडॉलॉजिकल प्युरिटी) नव्हती. त्यामुळे पुढे पवार यांनी एखादी वेगळी भूमिका घेतली तर, तेव्हाही ती कदाचित नसेलच. भारतीय राजकारण शंभर टक्के तत्त्वनिष्ठेने चालतेच असे नाही. तत्त्वनिष्ठ असणे जरुरीचे नाही, आपण घेतलेल्या भूमिकेला तत्त्वांचा मुलामा लावणे आवश्यक असते, ते पवार यांना चांगले जमते. 

राज्यातील सत्ताकारणासंदर्भात सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देणार, याबाबत प्रचंड उत्सुकता आहे. उद्या शिंदे सरकारच्या विरोधात निर्णय गेला, तर राज्यातील समीकरणे लगेच बदलतील. निकाल बाजूने लागला तरीही बदलतील पण, त्यासाठी काही अवधी लागेल . महाविकास आघाडीची वज्रमूठ ढिली होत जाईल. त्याची सुरुवात झाली आहे. पवार यांना नेहमीच दूरचे दिसते. यावेळीही त्यांना दिसले असावे आणि म्हणूनच त्यांनी भाजपला हलके मधाचे बोट लावले असावे का? सत्तेशिवाय राहिल्यास राष्ट्रवादीची पडझड होते, हे त्यांना ठावूक आहे. नाही पूर्ण राष्ट्रवादी जाऊ शकली तर, काही लोकांना अजित पवार यांच्या नेतृत्वात भाजपमध्ये पाठविले जाईल का? या सगळ्यांची उत्तरे सर्वोच्च न्यायालयाचा निकाल शिंदे यांच्या विरोधात लागला, तर लगेच मिळतील. निकाल बाजूने लागला तर या प्रश्नांची उत्तरे २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी मिळतील, एवढेच !

टॅग्स :Sharad Pawarशरद पवार