शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारनं अदानींना दिली १ रूपये प्रतिवर्ष दराने १ हजार एकर जमीन; विरोधकांचा हल्लाबोल, प्रकरण काय?
2
"काँग्रेसचे १५ खासदार विकले गेले, मुख्यमंत्री रेड्डींच्या आदेशामुळे भाजपच्या उमेदवाराला केले मतदान"; कोणत्या आमदाराने केला गौप्यस्फोट?
3
पैसे तयार ठेवा! कॅनरा रोबेको, हीरो मोटर्ससह या ६ कंपन्यांचे येणार IPO; सेबीकडून मिळाली मंजुरी, पाहा डिटेल्स
4
महाराष्ट्रात २ लाख रोजगार; ॲनिमेशन, गेमिंग धोरण जाहीर, ५० हजार कोटींची गुंतवणूक, ३,२६८ कोटींचा आराखडा
5
Electric Scooter: चार्जिंग सुरू असताना इलेक्ट्रिक स्कूटरला आग; नवरा- बायकोचा होरपळून मृत्यू!'
6
"नक्की कोण जिंकलं? आणि…’’, राज ठाकरेंचा व्यंगचित्रातून शाह पिता-पुत्रावर टीकेचा बाऊन्सर 
7
मोबिक्विकला ४८ तासांत ४० कोटींचा फटका! लाखो युजर्सच्या खात्यातून पैशांची चोरी
8
Vaishno Devi Yatra: भयंकर घटनेनंतर वैष्णो देवी यात्रेला पुन्हा सुरूवात; ३४ भाविकांचा झाला होता मृत्यू
9
केवळ ₹१ विकली जाणार होती अपोलो टायर्स; आज आहे टीम इंडियाची ओळख, कोण आहेत मालक, किती आहे संपत्ती?
10
Dashavatar: पाचव्या दिवशीही कोटींमध्ये कमाई, दिलीप प्रभावळकरांच्या सिनेमाने आत्तापर्यंत किती कमावले?
11
Janta Darshan: किडनी, हृदय रुग्णांना मोठा दिलासा; उपचाराचा खर्च उचलणार योगी सरकार!
12
शेअर बाजारात पुन्हा तेजी, सेन्सेक्स २०४ अंकांनी वधारला; Nifty २५,३०० च्या जवळ, 'हे' स्टॉक्स वधारले
13
नक्षलवादी संघटनांकडून केंद्र सरकारला शांततेचा प्रस्ताव; १ महिना सशस्त्र संघर्ष विरामाची मागणी
14
हेल्थ-लाईफ इन्शुरन्सवर सूट, ITC वर कठोर भूमिका; पाहा २२ सप्टेंबरपासून काय-काय बदलणार?
15
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
16
केवळ संशयामुळे लाेकांची झडती घेता येणार नाही, अपवादात्मक परिस्थितीत लेखी कारणे बंधनकारक : कोर्ट
17
सोशल मीडियावर ‘फोटो एडिट’ ॲपची धूम; सुरक्षित ठेवा तुमचे फोटो, फसवणूक वाढली
18
मुलाच्या वाढदिवसादिवशी पोहोचलं वडिलांचं शेवटचं गिफ्ट, कुटुंबीयांना झाले अश्रू अनावर
19
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार!
20
"इथं काम करणं आता कठीण..."; रस्त्यांवरील खड्डे अन् वाहतूक कोंडीमुळे बंगळुरूतील कंपनी शिफ्ट होणार

गांधी मरत का नाही ?

By admin | Updated: February 16, 2016 03:08 IST

विलक्षण प्रेम आणि आत्यंतिक द्वेष हे दोन्ही अनुभव जिवंतपणी ज्यांच्या वाट्याला यायचे त्या महात्मा गांधींची मृत्यूनंतरही यातून सुटका होत नाही.

विलक्षण प्रेम आणि आत्यंतिक द्वेष हे दोन्ही अनुभव जिवंतपणी ज्यांच्या वाट्याला यायचे त्या महात्मा गांधींची मृत्यूनंतरही यातून सुटका होत नाही. राग-लोभाच्या कचाट्यात गांधी आजही असतो. त्याच्या जगण्याची तऱ्हा, त्याची उपोषणे काहींच्या श्रद्धेचे तर काहींच्या निंदानालस्तीचे विषय असतात. कुठल्यातरी कारणाने, निमित्ताने गांधी आपल्या अवतीभवती असतो. जसा अस्वस्थतेत, शांततेत, तसाच आनंदात आणि दु:खातही... एखादा ग्रॅहम स्टेन्स आणि त्याची मुले जिवंत जाळली जातात, आपण अस्वस्थ होतो. कुणी अकलाख नराधमांच्या क्रौर्याला बळी पडतो, आपण व्यथित होतो. सांधू पाहणारी मने पुन्हा तुटतात की काय, या भीतीने डोळ्याला डोळा लागत नाही. या अवस्थेतही तो सोबतीला असतो, आपल्याला मोडू देत नाही आणि वाकूही देत नाही... परवा हा महात्मा पुन्हा भेटला. निमित्त त्याच्या पणतूच्या भाषणाचे. आपल्या पणजोबांच्या हत्त्येमागची खरी कारणे हा पणतू शोधण्याचा प्रयत्न करीत आहे. ज्याने गांधींना मारले तो नथुराम आणि त्याचे समर्थक ६० वर्षांपासून खोटी कारणे सांगून भ्रम निर्माण करीत आहेत. हा माथेफिरु नथुराम कधी नाटकाच्या रूपाने आपल्या विकृतीचे समर्थन करू पाहतो, तर कधी त्याचे सगेसोयरे जयंती-पुण्यतिथीला त्याला हुतात्मा ठरवून महात्म्याच्या हत्त्येचा असुरी आनंद उपभोगत असतात. गांधींच्या पुण्याईवर जगणारे गांधीवादी मात्र अशावेळी शांतपणे बसून राहतात. ‘माझ्या पणजोबांना तुम्ही राष्ट्रपिता म्हणता आणि ६७ वर्षे होऊनही त्यांच्या खुनाला जबाबदार असलेली माणसे आणि त्यांच्या संस्था प्रतिष्ठेने समाजात वावरतात! त्यांच्या निर्घृण हत्त्येमागील दडवून ठेवलेले सत्य देशासमोर का येत नाही’, हा तुषार गांधींचा अतिशय साधा आणि सरळ प्रश्न आहे. नथुरामी मानसिकतेचा उन्माद वाढला असतानाच्या काळात मग हा प्रश्न अधिक जळजळीत ठरतो. गांधींची हत्त्या हा पूर्वनियोजित आणि प्रदीर्घ कटाचा भाग होता. त्यांच्या खुनामागे ज्यांचे पाठबळ होते त्या विचाराची माणसे आज सत्तेत आहेत. ते गोडसेला महात्मा ठरवितात, गांधीजींची कुचेष्टा करतात आणि त्यांच्या नेतृत्वाखाली उभ्या राहिलेल्या स्वातंत्र्य लढ्याची आठवण पुसून टाकण्याचे घाणेरडे कामही करतात. स्वातंत्र्य लढ्यात कुठेही नसलेली किंबहुना इंग्रजांना छुपी मदत करणारी, माफीनामा लिहून देणारी, गांधींची हत्त्या झाल्यानंतर मिठाई वाटणारी ही मंडळी आज देशभक्त म्हणून मिरवितात आणि त्यांच्या हत्त्येची असत्य आणि देशभक्तीपर कारणे तरुणांच्या मनावर घट्टपणे बिंबवतात. ‘कुणी एका गालावर मारले तर दुसरा गाल पुढे कर असे सांगणारा तो भेकड म्हातारा, ‘महात्मा’ कसा’, असा प्रश्न एखादा तरुण विचारून जातो, तेव्हा हे विष किती खोलवर पेरले गेले आहे, याचा तीव्रतेने प्रत्यय येतो. या सगळ्या विखारी मानसिकतेत गांधींबद्दलचा खुनी द्वेष दडलेला आहे. पण याची कुणी दखल घेत नाही किंवा चर्चाही करीत नाही. नेमके हेच दु:ख त्यांच्या पणतूला आहे. परवा नागपूर आणि अमरावतीच्या व्याख्यानात तुषार गांधींच्या डोळ्यातील अश्रुंनी या दु:खाला वाट मोकळी करून दिली. त्यांच्या डोळ्यात, शब्दात एक विलक्षण वेदना जाणवत होती. आपल्या पणजोबांचा खून करणाऱ्या व्यक्तींचा नव्हे तर त्या मानसिकतेचा ते शोध घेत आहेत. तो प्रयत्न त्यांना कडवट बनवत नाही तर गांधींनीच सांगितलेल्या मनुष्यधर्माच्या अधिक जवळ नेणारा आहे. गांधी हा तसा किरकोळ आणि कृश देहाचा. पेटलेल्या नौआखलीत ‘तुमच्या अंत:करणातील द्वेषभावनेवर मात करा’ असे तो कळवळून सांगायचा. त्याच्या अहिंसेत, सत्त्याग्रहात असे कोणते सामर्थ्य होते? त्याला एकदा मारल्यानंतरही तो जिवंत कसा? तो अजून मरत का नाही? शरीररुपाने कधीचाच संपलेला हा म्हातारा आपल्या विकृत विचारसरणीच्या मार्गातील सर्वात मोठा अडथळा आहे, असे नथुरामभक्ताना सतत वाटत असते. त्यामुळे या महात्म्याच्या वाटेने जाणाऱ्या प्रत्येक नि:शस्त्र माणसाची त्यांना भीती वाटते. तुषार गांधींचा शोध पूर्णत्वाला जाईल की नाही? सांगता येत नाही. पण गांधी कधी संपणार नाही. नथुरामभक्तांचे हेच वैफल्य आहे. - गजानन जानभोर