शहरं
Join us  
Trending Stories
1
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
2
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
3
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
4
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
5
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
6
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
7
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
8
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
9
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
10
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
11
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
12
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज
13
शंकर महादेवन यांनी खरेदी केलं चलतं-फिरतं लक्झरीअस हॉटेल! 'मसाज सीट'सह मिळतात या खास ५ स्टार सुविधा
14
अर्ध्या तासाच्या अंतराने कोसळले अमेरिकेचे हेलिकॉप्टर आणि विमान, दक्षिण चीन समुद्रात नेमकं काय घडलं?
15
Crime: गे डेटिंग अपवर ओळख, ८ जण फ्लॅटवर पार्टीसाठी भेटले; पार्टीनंतर शुभमचा मृत्यू
16
वर्ल्डकप विजेता कर्णधार MS Dhoni केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या भेटीला, Video केला शेअर
17
अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात 'वाजले की बारा' लावणी; सुनेत्रा पवारांचा थेट शहराध्यक्षांना कॉल
18
"व्हायरल होईल माहित होतं पण...", आर्यन खानच्या सीरिजमधील कॅमिओवर इम्रान हाश्मी म्हणाला...
19
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमीफायनलपूर्वी भारतीय महिला संघाला मोठा धक्का, दुखापतीमुळे आघाडीची फलंदाज स्पर्धेबाहेर 
20
निवडणूक आयोगाने देशात 'मतदार यादी दुरुस्ती' मोहिमची घोषणा केली; या १२ राज्यांमध्ये होणार सुरुवात, असे असणार वेळापत्रक

वृद्ध आई-बापाला लाथाडणाऱ्या दिवट्यांचे काय करायचे?

By किरण अग्रवाल | Updated: February 28, 2023 08:05 IST

आई-बापाची शेतीवाडी नावावर करून घेऊन म्हातारपणी त्यांना सांभाळण्यास नकार देण्याची निलाजरी संवेदनशून्यता इतकी उघडीवाघडी कशी आणि का दिसते आहे?

- किरण अग्रवाल, कार्यकारी संपादक, लोकमत, अकोला

सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे माणूस सोशल झाला, असे लाख म्हटले जात असले, तरी ते कसे फसवे, दिशाभूल करणारे व निखालस खोटे आहे, हे लक्षात आणून देणारी उदाहरणे कमी नाहीत. या फसव्या सामाजिकतेमागे दडलेला ढोंगी, विद्रुप व संवेदनाहीन चेहरा लपता लपत नाही, अन्यथा बापजाद्यांची शेतीवाडी नावावर करून घेऊन आईच्या म्हातारपणी तिचे पालन पोषण करण्यास नकार देण्याची निलाजरी संवेदनशून्यता इतकी उघडीवाघडी कधी दिसली असती?

वाशिम जिल्ह्यातील झाकलवाडीच्या एका ७२ वर्षीय वृद्ध स्त्रीला आपल्या उदरनिर्वाहासाठी सरकारी उंबरठे झिजवावे लागल्याची घटना अलीकडेच समोर आली आहे. कोरोनामुळे तिच्या पतीचे निधन झाले. त्यानंतर तिच्या तिन्ही मुलांनी वडिलांची शेती आपल्या नावे करून घेतली व आईला वाऱ्यावर सोडले. अखेर या मातेने सरकारी हेल्पलाईनद्वारे आपल्यावरील अन्यायाचा पाढा वाचल्यावर तिला न्याय मिळाला. गेल्या ऐन दिवाळीच्या दिवशी अकोला जिल्ह्यातील पातुर तालुक्यातही एका वृद्धेला तिच्या पोराबाळांनी बेवारसपणे रस्त्यावर सोडून दिल्याचे प्रकरण समोर आले होते. आई-वडिलांची संपत्ती लाटून घेतल्यावर त्यांना बेवारस सोडून देणाऱ्या या व अशा घटनांमधून जीवनातील भेसुरताच समोर येते.

समाज माध्यमांवरील अंगठेबाज प्रतिसादाने हुरळून जात स्वतःचे ‘सोशल’ असणे सिद्ध करू पाहणाऱ्या पिढीच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणाऱ्या या घटना आहेत. अशा घटना अपवादात्मक  असतात हे खरे, पण या शितांवरून समाज नावाच्या अक्राळविक्राळ पातेल्यात शिजत असलेल्या भाताच्या दर्जाची कल्पना येतेच येते! या घटना पोलिस स्टेशनपर्यंत पोहोचल्या म्हणून त्यांच्या बातम्या झाल्या आणि घरोघरी चाललेल्या कहाण्यांचे काही तुकडे समोर तरी आले. पण अनेक घरांमध्ये तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करीत असलेली व अडगळीत पडलेली जी वृद्ध मंडळी आहेत त्यांच्या वाट्याला आलेल्या घुसमटल्या त्रासाचे काय? विशेषत: संयुक्त कुटुंब पद्धतीतून बाहेर पडलेल्या एकल कुटुंबातील वृद्धांच्या नशिबी आलेले एकाकीपण व त्यातही आपल्याच रक्ताच्या माणसांकडून होणारी उपेक्षा ही जिवंतपणी किती मरणयातना देणारी असेल, याचा विचारच संवेदनशील माणसाच्या मनाचा थरकाप उडवणारा आहे. 

वृद्ध माता-पित्यांच्या संगोपनाची जबाबदारी उचलावयास भाग पाडणारा कायदा आपल्याकडे आहे खरा, पण पोरांच्याच अब्रूचे धिंडवडे निघू नयेत म्हणून वेदनेने भळभळणाऱ्या जखमा उरात बाळगून अनेक मायबाप त्यांचे म्हातारपण अक्षरश: ओढत असतात.  सहन होत नाही व सांगताही येत नाही, अशी अनेकांची अडचण आहे. कायदा असूनही हात टेकले जातात, कारण चारचौघात आपल्या घरातली ओंगळ धुणी धुण्याची लाज वाटते! पूर्वी निदान घराघरात आई-वडिलांच्या सांभाळाकडे नजर ठेवून  असलेली समाजव्यवस्था तरी तरुण जोडप्यांवर वचक ठेवीत असे. आता तर काय सगळ्याच बाबतीत समाजाला फाट्यावर मारण्याचाच रिवाज असल्याने ‘लोक काय म्हणतील?’ याची भीतीही सैल झाली आहे. त्यामुळे ना नात्यागोत्यातल्या लोकांची पर्वा, ना लोकलज्जेची. अशा स्थितीत घरातले ज्येष्ठ लोक दुर्लक्षाचे धनी होऊ लागले आहेत. आधीच जुनी घरे पाडून उभ्या राहात असलेल्या नवीन घरात म्हाताऱ्या माणसांच्या हक्काच्या जागा गमावल्या गेल्या आहेत. जुन्या घरात म्हातारा-म्हातारी अंगण, ओसरीत वावरत असत, आता ओसरी गेली आणि खेड्यातल्या घरातसुद्धा म्हाताऱ्यांची खाट  मागच्या दाराला गेली. हे कमी  म्हणून की काय, आता त्यांची  शेतीवाडी लुबाडून आई-वडिलांना थेट वाऱ्यावर सोडताना लोकांना काही वाटेनासे झाले आहे.

आपण खूप प्रगती केली. अगदी चंद्रावर पाऊल ठेवले, मंगळावर पाणी शोधायला निघालो; मोबाईलमुळे अवघे जग मुठीत आले व त्यातूनच आपण सोशल व्हायला निघालो, पण खरंच झाले का तसे? अलीकडे बुवा, बाबा, प्रवचनकारांचे प्रस्थ मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. त्यांचे मांडव भाविकांच्या गर्दीने ओसंडून वाहताना दिसतात. पण हे सारे पालथ्या घड्यावर पाणीच म्हणायचे का? मुलेबाळे असूनही वृद्धांना उदरनिर्वाहासाठी पोलिस स्टेशनची पायरी चढावी लागत असेल, तर काय उपयोग या प्रगतीचा व सत्संगाचा?     kiran.agrawal@lokmat.com