शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
2
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
3
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
4
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
5
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
6
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
7
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
8
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
9
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
10
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
11
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
12
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
13
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
14
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
15
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
16
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
17
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
18
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
19
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
20
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?

लेखकाला ‘भित्रा’ ठरवणाऱ्या व्यवस्थेचे काय करावे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2022 09:31 IST

लेखकाने आजूबाजूच्या कोलाहलापासून अनभिज्ञ वा उदासीन राहता कामा नये. हे योग्यच, पण सक्ती झाली, तरी त्याने त्या कोलाहलाला शरणही जाता कामा नये.

अभिराम भडकमकर, ख्यातनाम साहित्यिक

साहित्यिकाचं मूळ काम आपल्या आजूबाजूला जे काही आहे त्याच्याकडे बघणं, त्याचा अन्वयार्थ लावणं आणि ते साहित्य मांडणं असा होतो.  आजूबाजूला म्हणजे नेमकं कुठे, कुठपर्यंत, म्हणजे लेखकाचा भवताल असा एका स्थळ-काळापुरता बांधून घालता येतो का, सध्या ‘समकालीन’ वास्तव असा एक शब्द फार ऐकू येतो; पण साहित्यात, कलेत समकालीन नामक काही असतं का, असू शकतं का, आताच्या कोलाहलात हा प्रश्न कदाचित असंवेदनशील वाटेलही; पण आजचे साहित्य समकालीन वास्तवाला भिडते का, यावर परिसंवाद घेण्याआधी साहित्याचं ते काम आहे का, याचा विचार व्हायला नको का? - म्हणजे मग साहित्यिकाने आजूबाजूच्या परिस्थितीकडे कानाडोळा करायचा का, असा प्रश्न येऊ शकतो. साहित्य आजूबाजूचे सामजिक, धार्मिक, राजकीय प्रश्न  कवेत घेणार की नाही, एकीकडे लेखक एका काळापुरता बांधील राहू शकत नाही म्हणायचं आणि दुसरीकडे या सगळ्यांचीही लेखनात अपेक्षा करायची, असं कसं होऊ शकेल आणि लेखकाला या भवतालापासून दूर राहता येईल का? माझ्या मते, महान लेखक ही कोंडी फोडण्यात यशस्वी ठरतो तो इथेच. तो त्याला ज्ञात असलेल्या काळाचा तुकडा घेतो आणि तत्कालीन भवतालाबद्दल बोलताबोलता सार्वकालिक होत जातो. म्हणूनच शेक्सपिअर गोष्ट सांगतो ती त्या काळातली असूनही ती मला माझी, आजची वाटू शकते. मोठा लेखक कदाचित समकालीन शोषणाने सुरुवात करील; पण एकूणच माणसातली शोषकवृत्तीच उलगडून काढेल. जसे महर्षी व्यास षडविकाराने लिप्त माणसाची मांडणी करतात. जी. ए. नियतीचा धांडोळा घेतात, तर चिं. त्र्यं. खानोलकर अज्ञाताच्या प्रदेशाचा. दळवींना माणसाच्या लैंगिक घुसमटीचा, तर चेकोव्हला महत्त्वाकांक्षांनी जखडलेल्यांचा शोध खुणावतो. हे सर्व एका मूलभूत चिंतनाकडे नेणारं असतं आणि ते तात्कालिकतेच्या पल्याड जातं.याचा अर्थ आजूबाजूच्या परिस्थितीबाबत अनभिज्ञ असणं अथवा उदासीन असणं असा नव्हे, तर एक मोठीच जबाबदारी लेखकावर असते असा आहे. केवळ सद्य:स्थितीबाबत एक जागृती किंवा तात्पुरती उपाययोजना (ज्यात असहमती वा  लढ्यापासून सत्तांतरापर्यंत सर्व काही येईल) यासाठी जनमानस तयार करणे इतपतच मर्यादित भूमिका अपेक्षित नाही, असा आहे. यासाठीही साहित्यकृतीचा वापर होऊ शकतो; पण ते सर्वथैव, एकमात्र प्रयोजन असू शकत नाही. लेखकाला स्थळकाळ निरपेक्ष असा शोध घ्यायचा असतो. तो एकाचवेळी समकालीन आणि सार्वकालीन असतो तो याच अर्थाने.लेखक त्याला आकळलेल्या आयुष्याचा एक तुकडा म्हणजेच आयुष्य मानत नाही. मोठ्या लेखकाकडे जीवनाकडे समग्रपणे पाहण्याची शक्ती निर्माण होते. मग त्याचं साहित्य जेव्हा दुःखाकडे  बघतं, नीती- अनीतीकडे बघतं  आणि मग त्याची दुःखाची व्याख्या व्यापक होऊन जाते.  साहित्यिकाला असं दुःखाचं एक समग्र भान आलं की, दुःखाचा परीघच वाढतो.लेखकाने आजूबाजूच्या कोलाहलापासून अनभिज्ञ वा उदासीन राहता कामा नये हे योग्यच; पण तसंच त्या कोलाहलाला शरणही जाता कामा नये. साहित्यबाह्य प्रवाह आज तर अधिक जोमानेच साहित्यिकांकडून विविध अपेक्षा करीत आहेत. अगदी उच्चरवाने करीत आहेत. या मोजपट्टीत बसलो नाही तर असंवेदनशील अगदी भित्रे वगैरेही ठरवले जाण्याची व्यवस्था कार्यरत असली तरीही लेखकाने आपल्या अंत:स्वराला या गोंगाटात हरवू देता कामा नये. गर्दीत राहून एकटेपण जपलं पाहिजे. एकदा लेखकानं आपलं अस्तित्व एका विविक्षित काळापुरतं नसतंच हे मान्य करून टाकल्यानंतर सभोवातालाशी किंवा त्या मोजपट्टीच्या निकषावर उतरत बसण्याची तमा तरी का बाळगावी? लेखकाचं लेखन तो असताना आणि नसतानाही पायपीट करीत राहतं किंबहुना ते त्या ताकदीचं असावं. नाव, पैसा, पुरस्कार हे थांबे क्षणभर विसाव्यासाठी आवश्यक असतीलही; पण पायपीट हेच लेखकाचं भागधेय असतं. ही पायपीट सुखकर होत नाहीच; पण किमान अंगवळणी तरी पडावी इतकाच प्रयास तो करू शकतो.abhiram.db@gmail.com(मराठी वाङ्मय परिषद बडोदे, यांनी आयोजित केलेल्या साहित्य संमेलनात केलेल्या अध्यक्षीय भाषणातले संपादित टिपण)