वाजपेयी निवृत्त, अडवाणी अडगळीत, मुरली मनोहर दुर्लक्षित, यशवंत सिन्हा उपेक्षित, शांताकुमार संपलेले, जसवंतसिंग अंथरुणावर, अरुण शौरी बिथरलेले आणि शत्रुघ्न सिन्हा बिघडलेले ही भाजपातील सत्तेबाहेरच्या ज्येष्ठांची स्थिती, तर सत्तेत असलेले अरुण जेटली निवडणूक हरलेले, राजनाथसिंह फारसे खिजगणतीत नसलेले, सुषमा स्वराज आणि वसुंधराराजे ललित मोदींच्या आयपीएल गुंताळ्यात अडकलेल्या आणि शिवराजसिंह चौहान व्यापंम घोटाळ्यात गळ्याएवढे सापडलेले. भाजपामधील ज्येष्ठ सत्ताविहीनांची आणि दुसऱ्या स्थानावरील सत्ताधाऱ्यांची सध्याची अवस्था अशी आहे. मनोहर पर्रीकरांना संरक्षणमंत्र्याचे पद देऊन त्यांना मंत्रिमंडळाच्या राजकीय समितीत घेतले (ते पद नितीन गडकरींना द्यायचे नव्हते म्हणून). पण पर्रीकर आपला जास्तीचा वेळ गोव्यात घालवितात. छत्तीसगडच्या रमणसिंहांचे राज्य लहान, अनुभव तोकडा आणि राष्ट्रीय पातळी त्यांच्यापासून दूर राहिलेली. कधीकाळी मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्री राहिलेल्या उमा भारतींचे राजकारण संपलेले आणि नितीन गडकरींचे पूर्ती प्रकरण कॅगने संसदेच्या पटलावर ठेवलेले. राहता राहिले दोन पुढारी. त्यातले नरेंद्र मोदी बिहारातील जखमांनी विव्हळ झालेले आणि अमित शाह यांना मोदींखेरीज दुसरे कोणी बळ न देणारे. एकेकाळी या साऱ्यांना संघाचा आधार होता. पण संघाच्या प्रमुखांनी आरक्षणाचा वाद ओढवून घेऊन त्या साऱ्यांसकट स्वत:लाही संकोचून टाकलेले. मोदी बळाचा आव आणतात. बिहारमधील पराजयानंतर ते काश्मीर सीमेवर गेले. सैनिकांसोबत राहून त्यांनी दिवाळी साजरी केली. पण पराभूत नेत्यासोबतच्या त्या दिवाळीत आनंद तरी केवढासा असणार? काँग्रेसच्या दुरवस्थेमुळे भाजपाला सत्ता मिळाली; पण सत्तेवर आल्यानंतर तिची आब त्यांच्यातल्या कुणालाही राखता आली नाही. मोदी तीन वेळा मुख्यमंत्री झाले व चौथ्यांदा पंतप्रधान. वसुंधराराजे, शिवराजसिंह आणि रमणसिंहही त्याच पातळीवर होते. ते परस्पर बदनाम होऊन (किंवा त्यांना बदनाम करून) लोकमानसातून खाली उतरविले गेले. सुषमा स्वराज या प्रतिस्पर्धी होऊ शकणाऱ्या नेत्या होत्या. त्यांच्यावर संसदेचे एक अख्खे सत्र सोडून त्यांना गप्प करण्याचे राजकारण झाले. नितीन गडकरी प्रथम पक्षाध्यक्ष झाल्याने त्यांच्याकडे ज्येष्ठत्व होते. पण पूर्ती प्रकरणात ते मागे गेले आणि नंतरच्या काळात देशाच्या मध्यवर्ती राजकारणात ते कुठे दिसले नाहीत. सत्ताधारी माणूस आपले सर्व प्रतिस्पर्धी प्रथम गारद करतो व स्वत:ची गादी सुरक्षित करतो हा राजकारणातला रिवाज आहे. तो सर्वधर्मीय सत्ताधाऱ्यांनी इतिहासात सांभाळला. मोदींनी तोच कित्ता गिरविला. प्रथम पक्षातील ज्येष्ठांचे सल्लागार मंडळ स्थापून त्यांना बंदिस्त व सत्ताहीन बनविले. नंतर बरोबरी करू शकणाऱ्यांना जमेल तेवढे बदनाम करून ते आपल्याला वरचढ होणार नाहीत याची व्यवस्था केली. एकहाती लोकसभा जिंकल्याचा कैफ होताच. पुढे महाराष्ट्र, हरियाणा, झारखंड आणि काश्मिरातील विजयाने तो आणखी वाढला. बंदिस्त आणि बदनाम झालेल्यांना गप्प बसण्याखेरीज काही करणे जमणारे नव्हते. जेटली बोलत पण त्यांचा पराभव त्यांची मोदीनिष्ठा बळकट करीत राहिला. अमित शाह नाचवल्यासारखे नाचत होते आणि संघातली ज्येष्ठ माणसे, मोदी ही त्यांची पहिली निवड नसतानाही त्यांच्या विजयाने दिपल्यागत झाली होती. बिहारच्या जनतेने दारुण पराभव केला तेव्हा ‘सल्लागारा’तली माणसे बोलू लागली. शौरी आणि शत्रुघ्नही बोलायला उठले. सत्तापदावरची माणसे उघडपणे नव्हे पण खासगीत टीका करू लागली. ‘जिंकलो की त्यांचा विजय, हरलो की पराजय मात्र आमचा साऱ्यांचा’ या खुलाशातला खोटेपणा त्यांनाही उघड दिसत होता. आपल्या विजयात कुणालाही वाटेकरी होऊ न देणारे नेतृत्व पराजयाचे खापर मात्र अनुयायांत वाटून घेते तेव्हा ते सारेच फार दयनीय व अगतिक दिसू लागते. आता भाजपा आत्मपरीक्षण करणार आहे. म्हणजे काय? तर का पडलो, कुणामुळे पडलो आणि आजवरच्या विजयी घोडदौडीला पायबंद कसा बसला? जे लहान मुलांनाही कळते त्यासाठी एवढे विचारमंथन कशाला हवे? ज्यांच्यामुळे विजय मिळाला त्यांच्याचमुळे पराजयही पत्करावा लागला हे साधे वास्तव त्यांना कळत नाही असे कोण म्हणेल? मात्र नेतृत्वाला दोष देण्याचे बळ ना सल्लागारांत आहे ना सत्तापदावरील दुय्यम दर्जाच्या नेत्यांत आणि ना ते संघात आहे. ही वेळ परस्परांच्या अपयशावर पांघरूण घालण्याची आणि वेळ काढण्याची आहे. अपयश झाकायचे असते आणि त्यासाठी बळीचे बकरे शोधायचे असतात. भाजपाची सध्याची स्थिती अशी आहे. त्याची अडचण ही की मोठे नेते दोषी दिसत असले तरी त्यांच्याविरुद्ध कारवाई करता येत नाही. मात्र छोटे अपराधी निवडून त्यांना शासन करता येते. भाजपाच्या नशिबाने तेही त्यांच्याजवळ भरपूर आहेत. गिरिराजसिंह आणि महेश शर्मा, आदित्यनाथ आणि साक्षीबुवा, प्राची आणि निरांजना, चेन्नबसवप्पा आणि स्वरूपानंद... मग मार्ग निघत असतो. मोठे सुरक्षित राहतात, छोटे अडगळीत जातात आणि काठावरचे आणखी सुरक्षित होतात.
हे आत्मचिंतन कशासाठी राव ?
By admin | Updated: November 17, 2015 03:30 IST