निसर्ग आणि सरकार यांचा शेतकऱ्यांनी कधी भरवसा बाळगू नये असे एकवार नितीन गडकरी यांनी सांगून टाकले. त्यांच्या त्या विधानाची प्रशंसा प्रत्यक्ष राहुल गांधींनी आपल्या लोकसभेतील भाषणात केली. ‘गडकरी जे बोलले ते मोदी सरकारलाही लागू असल्याचे’ त्यावेळी त्यांनी सांगून टाकले. गडकरी यांच्याएवढेच राहुल गांधी यांचेही म्हणणे खरे असल्याचे सांगणाऱ्या घटना आपण आता रोज पाहत व अनुभवत आहोत. पेट्रोल आणि डिझेलचे दर काही काळापूर्वी ३-४ रुपयांनी कमी झाले आता ते प्रथम तीन व नंतर आणखी तीन रुपयांनी वाढवून सरकारने ते पूर्वीपेक्षा जास्तीचे केले. डाळ ही सामान्य माणसांच्या रोजच्या जेवणातली व प्रोटीन पुरविणारी एकमेव पौष्टिक बाब आहे. आजच्या घटकेला कोणत्याही डाळीचा भाव ठोक बाजारात १०० रु. किलोहून अधिक आहे. महागाई कमी होत नाही, अन्नधान्यापासून भाज्यांपर्यंतच्या वस्तू दरदिवशी लोकांच्या आवाक्याबाहेर जात आहेत आणि ज्या वस्तूंच्या जाहिराती दूरचित्रवाहिन्यांच्या पडद्यावर लोक पाहतात त्या त्यांना स्वप्नवत वाटाव्या अशा आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्त्या थांबत नाहीत, न्यायाची खरेदी-विक्री उघड्यावर चालावी अशी दिसते आणि भाषा विकासाची असली तरी वास्तवात तो कुठे अनुभवाला येताना दिसत नाही. ‘अच्छे दिन’ हा आता पूर्वीच्या ‘शायनिंग इंडिया’ सारखा हास्यास्पद व कुचेष्टेचा विषय झाला आहे. पंतप्रधान जोरकस भाषण देतात. (त्यातली बहुतेक त्यांनी विदेशात दिलेली असतात) ते संसदेत येत नाहीत आणि विरोधकांशी होणाऱ्या वादविवादात भाग घेत नाहीत. पत्रकारांच्या अडचणींच्या प्रश्नांनाही सामोरे जावे लागेल म्हणून ते त्यांना भेटत नाहीत. झालेच तर त्यांच्या मंत्रिमंडळातील दुसऱ्या कोणत्याही मंत्र्याचा शब्द जनतेला प्रमाण वाटत नाही. राजनाथसिंह देशाचे गृहमंत्री आहेत. नक्षलवाद्यांचा प्रश्न समजून घ्यायला ते नागपुरात आले, पण संबंधित अधिकाऱ्यांशी भेट घेण्याहून त्यांना संघ कार्यालयाची त्यांची भेट जास्तीच्या महत्त्वाची व जास्तीचा वेळ देण्याजोगी वाटली. अधिकाऱ्यांशी झालेली त्यांची चर्चाही अत्यंत वरवरची व प्राथमिक स्वरूपाची वाटावी अशी होती. अरुण जेटलींचा समाजाशी संबंध नसावा. सुषमा स्वराज विरोधी बाकावर असताना फार बोलायच्या. सरकारात आल्यापासून त्यांचे बोलणे थांबले आहे. वेंकय्या नायडू बोलतात कमी, चिडतात फार शिवाय पंतप्रधानांच्या गैरहजेरीवर पांघरुण घालण्याखेरीज त्यांना दुसरे काही सांगताना देशाने पाहिलेही नाही. स्मृती इराणींना सचिवांच्या अंगावर फाईली फेकण्यापासून विरोधकांवर नुसतेच आरोप करण्यापलीकडे काही जमत नाही. त्यांचा अमेठी दौरा त्यातल्या विरोधी निदर्शनांसाठी आणि त्यांच्या नाटकी अभिनिवेशासाठीच अधिक गाजलेला दिसला. उमा भारती गप्प आहेत आणि बाकी मंत्र्यांची सर्वसामान्य जनता कधी दखल घेताना दिसत नाही. पंतप्रधान विदेशात अधिक आणि स्वदेशात कमी असतात. त्यांच्यासोबत काही राज्यांचे मुख्यमंत्रीही आपापल्या स्थानिक जबाबदाऱ्या टाकून विदेशाच्या वाऱ्या करतात. परिणामी राज्यात देखील सरकारे असून ती नसल्यासारखी परिणामशून्य वाटतात. एकेकाळी अरुण शौरी या भाजपाच्या माजी मंत्र्याने सरकारला धारेवर धरले. राम जेठमलानी या दुसऱ्या मंत्र्याने त्याला आपटून धुतल्यासारखे केले आणि आता सरकारचे वकीलपत्र घेतलेले सुब्रह्मण्यम स्वामीही पेट्रोल व डिझेलच्या ताज्या दरवाढीवर सरकारला जबाबदार धरताना दिसत आहेत. एवढ्या प्रचंड देशात प्रवास करायचा तर प्रवासाची साधने स्वस्तच असली पाहिजेत, हे सरकार मात्र त्या साधनांचे भाव वाढविताना सामान्य माणसांचा विचार करीत नाही असा सुविचार एरव्ही बरेच अविचार मांडणाऱ्या या स्वामीने देशाला ऐकविला आहे. हा सारा घरचा अहेर झाला. जी माध्यमे भाजपाला लागू आहेत त्यांचे चेहरे पाहण्याजोगे झाले आहेत आणि जी टीका करणारी आहेत त्यांना आक्रस्ताळी ठरविण्याकडे सरकारी प्रवक्त्यांचा कल आहे. संघ गप्प आहे. त्याला सामान्य माणूस, भाववाढ, बेरोजगारी यासारख्या जनतेच्या खऱ्या प्रश्नांहून तिच्या धार्मिक व सांस्कृतिक उन्नयनातच जास्तीचा रस असल्यामुळे व मोदी त्याचे ऐकत नसल्यामुळे त्याच्या बोलण्याला तसाही अर्थ नाही. काँग्रेस पक्ष आता सावरू लागला असला तरी त्याला बरीच डागडुजी करायची आहे. कम्युनिस्ट जायबंदी आहेत आणि जे प्रादेशिक पक्ष त्यांच्या राज्यात प्रबळ आहेत त्यांचे एकत्र येण्याविषयी अजून एकमत होत नाही. ही स्थिती मोदी सरकारच्या नाकर्त्या घोषणाबाजीला अनुकूल ठरावी अशी आहे. त्यांचा पक्ष त्यांच्या दावणीला आहे, संघ स्तब्ध आहे, विरोधक विभागले आहेत आणि उद्योगपतींसह त्यांच्या ताफ्यातील माध्यमे त्यांचे वाजिंत्र वाजविण्यात दंग आहेत. ही स्थिती सामान्य माणसांच्या खऱ्या प्रश्नांकडे सरकारचे लक्ष जाऊ न देणारी आणि सरकारचा आत्मविश्वास अहंकारात बदलणारी आहे. मोदींच्या वक्तव्यात ‘मी’ हा शब्द अधिक येण्याचे कारणही हेच आहे. त्यांच्या सरकारात, पक्षात व परिवारात तेच एकटे कर्ते आहेत. बाकीचे नुसतेच समर्थक, प्रचारक आणि टाळ््या वाजविणारे आहेत. मोदींना प्रसन्न करणारी, पक्षाला एकारलेपण देणारी आणि जनतेला हतबुद्ध करणारी ही स्थिती आहे.
वल्गना आणि वास्तव
By admin | Updated: June 10, 2015 00:55 IST