शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
3
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
4
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपण"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोकठोक भाष्य
5
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
6
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
7
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
8
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
9
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
10
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
11
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
12
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
13
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
14
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
15
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
16
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
17
Crime: पतीला झाडाला बांधून पत्नीवर सामूहिक बलात्कार; नोकरी सोडल्याच्या रागातून क्रूर कृत्य!
18
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
19
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
20
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

संविधानाचा विजय, मोदींचा पराजय

By admin | Updated: May 12, 2016 02:44 IST

उत्तराखंड विधानसभेत झालेल्या शक्तिपरीक्षेत काँग्रेसने बसपा व अपक्ष आमदारांच्या मदतीने भाजपाचा ३३ वि. २७ मतांनी पराभव केल्याने त्या राज्यातील राष्ट्रपती राजवट संपुष्टात येण्याचा

उत्तराखंड विधानसभेत झालेल्या शक्तिपरीक्षेत काँग्रेसने बसपा व अपक्ष आमदारांच्या मदतीने भाजपाचा ३३ वि. २७ मतांनी पराभव केल्याने त्या राज्यातील राष्ट्रपती राजवट संपुष्टात येण्याचा, काँग्रेसचे हरीश रावत यांना त्यांचे मुख्यमंत्रिपद पुनश्च मिळण्याचा आणि ज्या पक्षाच्या तिकिटावर आमदारकी मिळाली तो पक्ष सोडून इतर पक्षांसोबत जाणाऱ्यांचे सदस्यत्व रद्द होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शिवाय अशा परिस्थितीत केंद्राने कशी भूमिका घ्यावी याविषयीचा धडा एका जबर चपराकीसह त्यालाही मिळाला आहे. २०१४ च्या निवडणुकीत विजय मिळाल्यापासून भाजपाचे सारेच पुढारी एका उन्मादी वातावरणात वावरत आहेत. सव्वाशे वर्षांची परंपरा असलेला काँग्रेस पक्ष भारतातून पूर्णपणे नाहिसा करण्याच्या वल्गना करण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे. दिल्लीतील मतदारांनी संपूर्ण आणि बिहारच्या मतदारांनी दोन तृतीयांशाएवढा पराभव केल्यानंतरही या पुढाऱ्यांचा तो उन्माद ओसरला नाही. काँग्रेसमुक्त भारत करण्याच्या आपल्या त्या भ्रमातून भाजपाने प्रथम अरुणाचलचे सरकार त्याचे आमदार फोडून अल्पमतात आणले आणि ते राज्य आपल्या ताब्यात आणले. पुढे त्याच्या रडारवर उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि मणिपूर ही कॉँग्रेस नियंत्रित राज्ये होती. भाजपाने आपला पहिला डाव उत्तराखंडात खेळून पाहिला. त्यासाठी त्याने काँग्रेसच्या नऊ आमदारांना बंडखोरी करायला लावली आणि रावत यांचे सुस्थिर सरकार अस्थिर केले. मात्र तेथील विधानसभेच्या सभापतींनी या बंडखोरांचे सदस्यत्व पक्षांतर बंदी कायद्याचा आधार घेत रद्दबातल ठरविले आणि त्यांचा विधानसभेतील मताधिकार काढून घेतला. सभापतींच्या या निर्णयाला उत्तराखंडच्या उच्च न्यायालयाने व सर्वोच्च न्यायालयाने उचलून धरताना ‘सभापती हाच विधिमंडळाचा सर्वोच्च अधिकारी आहे’ असे घोषित केले. त्याचवेळी विधिमंडळात होणारी शक्तिपरीक्षा हाच सरकारच्या पाठीशी बहुमत ठरविणारा महत्त्वाचा निकष आहे, हेही जाहीर केले. त्यानुसार रावत सरकारला आपले बहुमत दि. २८ मार्चपर्यंत सिद्ध करण्याची सूचना केली. केंद्रातल्या मोदी सरकारने न्यायालयाच्या या निर्देशाकडे दुर्लक्ष करून व उत्तराखंडच्या राज्यपालांचा अहवाल बाजूला सारून त्या राज्यात दि. २७ मार्च म्हणजे एक दिवस अगोदरच राष्ट्रपती राजवट लागू केली. परिणामी उच्च आणि सर्वोच्च न्यायालयांचे निर्णय, सभापतींचा निर्णय आणि विधानसभेचा मुख्यमंत्री निवडण्याचा अधिकार हे सारेच बाधित झाले. या घिसाडघाईमुळे देशातील संघराज्य व्यवस्था आणि ३५६ वे कलम वापरण्याचा राष्ट्रपतींचा अधिकार या साऱ्याच गोष्टी केंद्राला आपल्या लहरीनुसार वापरता येतात असेच चित्र निर्माण झाले. राज्य आणि केंद्र यांच्यात घटनेने अधिकार क्षेत्राचे वाटप केले आहे. त्या दोहोंनीही आपापल्या क्षेत्रात कामे करीत असताना दुसऱ्याच्या क्षेत्रावर कुरघोडी करू नये असे घटनेला अपेक्षित आहे. मात्र कुरघोडीच्या राजकारणाने या संवैधानिक व्यवस्थेला याआधी अनेकदा दुर्लक्षिले आहे आणि आताच्या मोदी सरकारच्या उत्तराखंडातील कारवाईने ही व्यवस्था मोडीतच काढली आहे. मात्र या कारवाईला प्रथम उच्च व नंतर सर्वोच्च न्यायालयात काँग्रेस पक्षाने आव्हान दिले आणि केंद्राचा निर्णय घटनात्मक नसून राजकीय आहे, अशी याचिका त्यासमोर दाखल केली. सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका मान्य करून उपरोक्त निर्णय दिला व त्यात उच्च न्यायालयाच्या निर्णयालाही उचलून धरले. परिणामी मंगळवारी विधानसभेत मतदान होऊन रावत सरकारच्या पाठीशी असलेले बहुमत सिद्ध झाले आणि भाजपा व नरेंद्र मोदी या दोघांच्याही राजकीय शैलीचा खरा परिचय देशाला घडला. उत्तराखंडमध्ये मिळालेल्या चपराकीनंतर हिमाचल प्रदेश आणि मणिपूर या राज्यांत पुन्हा एकवार हाच प्रयोग करण्याचा केंद्राचा इरादा मागे पडेल अशी आशा करायला आता हरकत नाही. मात्र त्यासाठी काँग्रेससह देशातील अन्य विरोधी पक्षांना कमालीचे सावध राहणे आणि आपले प्रतिनिधी आपल्यासोबत राहतील याची काळजी घेणे गरजेचे आहे. ३५६ व्या कलमाचा गैरवापर पूर्वीच्या काँग्रेस सरकारांसह मोरारजी देसार्इंच्या सरकारनेही केला. तो करताना घटनेने दिलेली संघराज्याची चौकट त्यांनी विस्कळीतही केली. मात्र आताचा मोदी सरकारचा उत्तराखंड प्रयोग त्याहून गंभीर आणि ही चौकट पार मोडीत काढणारा होता. अरुणाचलमध्ये हे सिद्ध झाले. उत्तराखंडातही मोदींचे राजकारण यशस्वी झाले असते, तर साऱ्या देशातच त्यांनी काँग्रेसमुक्तीच्या नावाखाली हा प्रयोग पुढे नेला असता. सर्वोच्च न्यायालय व उत्तराखंडचे उच्च न्यायालय यांनी आपल्या घटनात्मक अधिकारांचा सुयोग्य व सावध वापर केला नसता, तर मोदींना त्यांचे कुरघोडीचे राजकारण साऱ्या देशात राबवताही आले असते. ते टळले आणि संविधान तरले याबद्दलचा आनंद साऱ्या घटनानिष्ठ नागरिकांनी व्यक्त करावा अशी ही घटना आहे. जाता जाता एका गोष्टीचा उल्लेखही आवश्यक आहे. ‘सभापती हा विधिमंडळाचा सर्वोच्च अधिकारी असल्याचा’ निर्वाळा देणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाने विधिमंडळातील मतदानाचा अधिकृत निर्णय सभापतींवर न सोपवता स्वत:कडे का घ्यावा हा प्रश्न आहे आणि तो न्यायालयांनी प्रशासनावर चालविलेल्या कुरघोडीचा पुरावा ठरू शकणार आहे.