शहरं
Join us  
Trending Stories
1
'सेव्हन सिस्टर्स' तोडण्याची धमकी खरी होणार; शेख हसीनांच्या मुलाने भारताला केले अलर्ट
2
फोर्डचा मोठा निर्णय! LG सोबतचा ५८,७३० कोटींचा बॅटरी करार रद्द; डोनाल्ड ट्रम्प ठरले व्हिलन...
3
पट्ट्याने मारहाण, तोंड दाबलं; ईश्वरपुरात आठवीतील मुलीवर ओळखीतल्याच दोघांकडून बलात्कार, विवस्त्र अवस्थेतच आली चालत
4
Stock Market Today: शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १५० अंकांनी घसरला, IT, PSU Bank मध्ये तेजी
5
'शांतता चर्चा केली नाही तर युक्रेनचा आणखी भाग बळकावू'; व्लादिमीर पुतीन यांची धमकी, युरोपीय नेत्यांना म्हणाले डुकराच्या औलादी
6
Big Banks Rate Cut: नव्या वर्षाच्या आधीच खूशखबर! SBI, PNB सह 'या' ८ बँकांनी स्वस्त केले व्याजदर, किती कमी होणार EMI?
7
२ कोटींपर्यंत दंड अन् बंद होणार विद्यापीठ?; केंद्र सरकार करणार उच्च शिक्षण क्षेत्रात मोठा बदल
8
Rana Daggubati Weight Loss: नॉनव्हेज पूर्ण बंद, मीठ कमी आणि...; तब्बल ३० किलो वजन घटवण्याचा 'भल्लालदेव' फॉर्म्युला
9
शिक्षणासाठी रशियाला गेला, युक्रेन युद्धात मृत्यू झाला; आधीच MEA कडून सुरक्षा मागितली होती
10
ढाका येथे उच्चायुक्त कार्यालयाबाहेर आंदोलन; बांगलादेशी कट्टरपंथी नेत्याची भारताला पोकळ धमकी
11
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
12
Ram Sutar Death: शिल्पकलेचा उपासक काळाच्या पडद्याआड! महाराष्ट्र भूषण राम सुतार यांचे निधन
13
'धुरंधर'ला मिळालेलं प्रेम पाहून अखेर अक्षय खन्नाने दिली पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांत म्हणाला-
14
दिल्ली-एनसीआर दाट धुक्यात बुडाले, IND विरुद्ध SA चौथा T20I सामना रद्द; दृश्यमानता शून्यावर
15
SEBI नं तीन दशकं जुन्या ब्रोकिंगच्या नियमांत केले महत्त्वाचे बदल; अनेक मोठ्या सुधारणांनाही मंजुरी, जाणून घ्या
16
...तर पाकिस्तानात उद्रेक होणार?, फिल्ड मार्शल असीम मुनीर संकटात सापडले; अमेरिकेचा दबाव वाढला
17
नाशिकमध्ये भाजपा-शिंदेसेना महायुतीत ८५-३७ चा फॉर्म्युला; उद्धवसेना-मनसेचं तगडं आव्हान
18
आजचे राशीभविष्य, १८ डिसेंबर २०२५: या राशींना धनप्राप्ती होईल, आज यांचे विवाह जुळतील
19
आता कुठे गेले कोपर-ढोपर? आयपीएलचे करोडोंचे लिलाव आणि हतबल शेतकऱ्याची 'किडनी' विक्री
20
जास्त पीक! शेतात तयार झाल्या प्रचंड 'विहिरी'! तुर्कीतील शेतकऱ्यांनी स्वतःहून ओढवून घेतलेली आपत्ती
Daily Top 2Weekly Top 5

सामान्यातील असामान्य ‘काजवे’ !

By admin | Updated: June 15, 2017 16:04 IST

सेवेचा स्थायिभाव अगर माणुसकीचा कळवळा असणारी व्यक्ती साधनांनी संपन्न असो अगर नसो, तिच्या सेवेचा व कळवळ्याचा भाव कसल्या न कसल्या माध्यमातून प्रसवल्याखेरीज राहात नाही.

- किरण अग्रवाल

सेवेचा स्थायिभाव अगर माणुसकीचा कळवळा असणारी व्यक्ती साधनांनी संपन्न असो अगर नसो, तिच्या सेवेचा व कळवळ्याचा भाव कसल्या न कसल्या माध्यमातून प्रसवल्याखेरीज राहात नाही. अशी कामे करणारी व्यक्ती बहुदा समाजासमोर येतही नाही, कारण ‘प्रदर्शन’ हा तिचा उद्देशच नसतो. आपल्या परीने जे होईल, जसे होईल ते व तितके ती ‘स्वान्तसुखाय’ करीत असते. आजच्या काळातील अवतीभोवतीच्या ‘मतलबी’ लोकांसमोर आदर्श ठरावेत असे हे ‘काजवे’च म्हणायला हवेत. त्यांचा प्रकाश भलेही टिमटिमणारा असेल; पण त्यात अवघा परिसर उजळून काढण्याची ऊर्जा व शक्ती नक्कीच असते. अशांचे समाजाकडून कौतुक होणे गरजेचे आहे, त्यांना बळ मिळाले किंवा त्यांच्या सारख्यांचे कौतुक केले गेले तर इतरांनाही प्रेरणा मिळू शकेल. ‘सेवे’साठी साधन-संपन्नताच असावी लागते असे नाही, इच्छाशक्ती असली की पुरे, असा संदेशही त्यातून जाईल; पण तसे फारसे होताना दिसत नाही हे दुर्देव.

प्रस्तुत प्रस्तावना यासाठी की, लग्नसमारंभ म्हटला, म्हणजे कर्ज काढून तो पार पाडण्याची बहुतेकांची मानसिकता असते. चारचौघांत व नात्यागोत्यात आपली मान उंच ठेवण्यासाठी ताकदीच्या बाहेरच्या गोष्टीही केल्या जातात. मानपानाचे तर विचारू नका. त्यासाठी ‘होऊ द्या खर्च’ अशीच भूमिका घेतली जाते. यात लोकलज्जेच्या भीतीपोटी न झेपणारा खर्च करणारे असतात, तसेच लग्नात नाही करायचा खर्च तर कधी, असा प्रश्न करीत आपल्या ऐश्वर्याचे प्रदर्शन मांडणारे किंवा बडेजाव मिरवणारेही काही असतात. लग्नासाठी हेलिकॉप्टरमधून आला नवरदेव, एकाच रंगाच्या ५१ वाहनांतून आले वऱ्हाड यांसारख्या बातम्या अधून-मधून वाचायला मिळतात त्या त्यामुळेच. अशा अधिकतर स्थितीत नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात असलेल्या वावी या छोट्याशा गावातील एका सामान्य वारकरी कुटुंबाने शहाण्या लोकांच्या डोळ्यात अंजन घालणाऱ्या पद्धतीने आपल्याकडील विवाहसोहळा पार पाडला. लग्नातील वऱ्हाडी मंडळींना मानापानाचा टोपी-टॉवेल न देता किंवा फेटे न बांधता पांडुरंगगिरी गोसावी यांनी आपल्या मुलाच्या लग्नात आलेल्यांना आंब्याची सुमारे एक हजार रोपे वाटलीत. कीर्तनकार म्हणून समाजप्रबोधनाचे काम करणाऱ्या पांडुरंगगिरींनी संत तुकोबारायांच्या अभंगवाणीतील ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे’चा संदेश प्रत्यक्ष आचरणात आणून समाजासमोर ‘उक्ती सोबत कृती’चा आदर्श ठेवला. विशेष म्हणजे, एकीकडे पर्यावरण दिनानिमित्त वृक्ष लागवडीचे शासकीय सोपस्कार पार पडत असताना त्याच दिवशी गोसावी परिवाराने रोपवाटपाचा कृतिशील आदर्श घालून दिला.
 
आणखी एक उदाहरण यासंदर्भातले असे की, सुरगाण्यासारख्या आदिवासी क्षेत्रातील रमेश भावडू आहेर यांचे पुत्र डॉ. सागर यांचा विवाह कोल्हापूर जिल्ह्यातील वाळवे येथील डॉ. सोनल हिच्याशी पार पडला. डॉक्टर वर-वधूच्या या लग्नपत्रिकेत अन्य अनुषंगिक मजकुराऐवजी ‘वसुंधरा वाचवा’, ‘झाडांना नष्ट करू नका’, ‘रक्तदान करा’, ‘पाण्याविना नाही प्राण, पाण्याचे तू महत्त्व जाण’, असे संदेश देणारा समाज जागरणाचा मजकूर प्राधान्याने प्रकाशित केलेला दिसून आला. नाशिकच्या सातपूर औद्योगिक वसाहतीत कंत्राटी कामगार असलेला निंबा पवार हा असाच एक अवलिया. स्वत:च्या आर्थिक विवंचनेची व त्यामुळे येणाऱ्या मर्यादांची तमा न बाळगता तो जेथे जातो तेथे जलजागृती व वृक्षारोपणाचे पोस्टर्स चितारत असतो. सातपूरचाच एक रिक्षाचालक दीपक आरोटे. हातावर पोट असलेला. परिस्थिती बेताचीच; पण सामाजिक भान जपत हा रिक्षावाला कोणत्याही अंध-अपंगांना मोफत प्रवासी सेवा पुरवत असतो. सिडकोतल्या एका महापालिकेच्या शाळेत नोकरीस असलेली कविता वडघुले ही एक शिक्षिका. पगारापुरते काम न करता, तिने पदरमोड करून स्वखर्चाने शाळेची एक वर्गखोली पर्यावरणपूरक संदेशाने सजवून दिली. विद्यार्थी वर्गात रमतील असे वातावरण निर्मिले. ही अशी उदाहरणे पाहिली की, सारेच काही संपले नसल्याचा आशावाद जागल्याखेरीज राहात नाही. 
 
आणखी एक वेगळे उदाहरणही येथे देण्यासारखे आहे. नागपूरच्या एका गतिमंद महिलेला उपचारासाठी मुंबईला नेत असताना तिच्याच मुलाने मनमाड रेल्वे स्टेशनवरच सोडून दिले. धुणी-भांडी करून उपजीविका करणारी ही महिला मुळात गतिमंद असल्याने वेड्यासारखी भटकत राहिली. पोलिसांनी तिला हटकले असता तिने आपले गाव नागपूर सांगितले; पण पोलिसांनी नामपूर ऐकून तिला बागलाण तालुक्यातील नामपूरच्या बसमध्ये बसवून दिले. तेथे बेवारसपणे फिरणाऱ्या या महिलेला सौ. प्रियंका प्रमोद सावंत, सौ. अनिता विजय सावंत, सौ. रेवती प्रवीण सावंत, सौ. मनीषा श्यामकांत सावंत व सौ. वंदना अशोक सावंत यांनी आधार देऊन तब्बल दीडेक महिना सांभाळ केला. तिला बोलते करून तिचा पत्ता शोधून काढला व साडीचोळी देऊन नागपूरला तिच्या घरी पोहचते केले. किती ही माणुसकी! व्यक्ती-व्यक्तींतले, माणसातले देवपण दर्शवणारी! हे देवपणच समाजाला खऱ्या अर्थाने पुढे घेऊन जाणारे आहे. अशांचीच खरे तर पूजा बांधली जायला हवी. पण, आपण सारेच प्रदर्शनीपणा करणाऱ्यांच्या मागे धावतो. त्यांच्याच कौतुकाचे पूल बांधतो. अशात हे सामान्यातले असामान्य ‘काजवे’ आपल्याच परिघात टिमटिमत राहू नयेत, एवढेच.
 
 
 
 
 
 
 
(लेखक लोकमतच्या नाशिक आवृत्तीत निवासी संपादक आहेत)