गेल्या आठवड्यात घडलेल्या दोन घटनांनी मी कमालीचा अस्वस्थ झालो होतो. प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची नक्कल करून ती सोशल मीडियावर टाकणाऱ्या भाजपच्या कार्यकर्त्या प्रियांका शर्मा यांना झालेली अटक ही पहिली घटना होती. दुसरी घटना ही भाजपच्या भोपाळ येथील लोकसभेच्या उमेदवार प्रज्ञासिंग ठाकूर यांनी केलेले वक्तव्य. ‘‘महात्मा गांधींची हत्या करणारे नथुराम गोडसे हे देशभक्त होते आणि देशभक्त राहतील.’’ या त्यांच्या वक्तव्यामुळे देशभर संतापाची लाट उसळली. गोडसेला जे दहशतवादी म्हणतात त्यांनी आत्मचिंतन करायला हवे, अशी पुस्तीही त्यांनी जोडली. अशा लोकांना निवडणुकीच्या निकालातून चोख प्रत्युत्तर मिळेल, असेही त्या म्हणाल्या!
स्वातंत्र्यानंतर आपल्या देशात व्यंगचित्रकारांची फार मोठी परंपराच निर्माण झाली आहे. के. शंकर पिल्लई, आर. के. लक्ष्मण, अबू अब्राहम, ओ. व्ही. विजयन, सुधीर तेलंग आणि बाळ ठाकरेसुद्धा त्यात सामील आहेत. त्यांनी सत्तेत असणाºया सत्ताधाऱ्यांची व्यंगचित्रे काढताना कधीच मागेपुढे बघितले नाही. इतकेच नाहीतर, ते ज्यांची व्यंगचित्रे काढायचे त्या व्यक्ती त्यांच्या व्यंगचित्रांचे स्वागतच करायच्या. सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार तेलंग यांच्या व्यंगचित्रांच्या तडाख्यातून पं. नेहरूही सुटले नव्हते आणि पंडितजींनीही त्या व्यंगचित्रांचा आनंद मनमुराद लुटला होता. अटलबिहारी वाजपेयी हे त्यांची व्यंगचित्रे बघून खळाळून हसायचे. सुधीर तेलंग या व्यंगचित्रकाराने काढलेले एक व्यंगचित्र तर त्यांनी फ्रेम करून ठेवले होते. तेलंग हे एक महान व्यंगचित्रकार होते ज्यांनी आपणा सर्वांचा फार लवकर निरोप घेतला!सर्वोच्च न्यायालयाने प्रियांका शर्मा यांची ताबडतोब सुटका करण्याचे आदेश दिले हे फार चांगले झाले. पण विद्वान न्यायमूर्तींनी त्यांना त्यांच्या कृत्याबद्दल माफीनामा लिहून देण्यास का सांगावे हे मात्र अनाकलनीय आहे.
प्रज्ञासिंग ठाकूर यांनी गोडसेचे उदात्तीकरण करणे हेही अनेक कारणांनी अस्वस्थ करणारे होते. वाचाळपणा करण्याचा त्यांचा हा पहिलाच प्रसंग नाही. बाबरी मशिदीचा विध्वंस करण्यात आपण आघाडीवर होतो हेही त्यांनी अत्यंत फुशारकीने सांगितले होते. अशा तºहेने कायदा हातात घेण्याची त्यांची वृत्ती आणि त्याविषयी अभिमान बाळगण्याची त्यांची प्रवृत्ती हीसुद्धा गुन्हेगारी प्रवृत्तीची द्योतक म्हणावी लागेल.साध्वीच्या वक्तव्याचा भाजपने जाहीरपणे निषेध करून त्यांना माफी मागायला लावली त्याप्रमाणे साध्वींनी माफी मागितलीसुद्धा. पण या प्रकरणाची आणखी एक गंभीर बाजू आहे. भाजप आणि रा. स्व. संघ यांच्या विचारांची अभिव्यक्ती साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर यांनी किती प्रमाणात केली होती, हा प्रश्न विचारावासा वाटतो. कारण केंद्रीय मंत्री अनंतकुमार हेगडे यांच्यासह आणखी दोघा भाजप नेत्यांनी साध्वींच्या विचारांशी सहमती दर्शविणारी मते सोशल मीडियावरून व्यक्त केली होती.