भारत आणि पाक यांच्यातील १९६५ साली झालेल्या युद्धाला ५० वर्षे पूर्ण होत असतानाच जनरल मुशर्रफ यांना पुन्हा एकदा कंठ फुटला आहे. कारगील युद्धाच्या वेळी आम्ही भारताचा गळा आवळला होता, पण आमच्या राजकीय नेतृत्वाच्या कमकुवतपणामुळं घात झाला, अशी वल्गना मुशर्रफ यांनी इस्लामाबादेत एका समारंभात बोलताना केली. असाच प्रकार १९६५ च्या युद्धात हाती काही न लागल्यामुळे ५० वर्षांपूर्वी त्यावेळच्या अयुब खान यांच्या सरकारात परराष्ट्रमंत्री असलेल्या झुल्फिकार अली भुत्तो यांनी केला होता. फक्त आता मुशर्रफ राजकीय नेतृत्वाच्या कमकुवतपणाला दोष देत आहेत, तर त्यावेळी भुत्तो यांनी अमेरिका या मित्रराष्ट्रावर ठपका ठेवला होता. गेल्या अर्धशतकात पाक लष्कर आणि त्या देशातील एकूणच राज्यसंस्थेच्या मनोभूमिकेत ‘जित्याची खोड...’ या म्हणीप्रमाणे तसूभरही फरक पडलेला नाही, हेच मुशर्रफ यांचं विधान दर्शवते. भारताविरुद्ध १९६५ साली युद्ध छेडताना जी चूक भुत्तो यांच्या सांगण्यावरून अयुब खान यांनी केली, तीच १९९९ साली मुशर्रफ यांच्यावर भरवसा ठेवून नवाझ शरीफ यांनी केली. चीनशी झालेल्या युद्धात भारताने सपाटून मार खाल्ला आहे आणि तो सध्या पराभूत मन:स्थितीत आहे, तेव्हा ही संधी आपण साधावी व काश्मीर ताब्यात घ्यावे, अशी भुत्तो यांची ही योजना होती. शीतयुद्धाचा काळ असल्याने अमेरिका आपल्या पाठीशी उभी राहील, असा विश्वास भुत्तो यांना वाटत होता आणि त्यांनी अयुब खान यांना भरीस घातले. काश्मिरी लोक भारताच्या जुलमाने विटले आहेत आणि ते आपल्याला पाठबळ देण्यासाठी उठाव करतील, अशी पाकची अपेक्षा होती. पण ती फोल ठरली. काश्मीरवर असलेला पाकचा लष्करी दबाव कमी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून लाहोरच्या दिशेने भारतीय सैन्याने कूच केले. त्याला उत्तर म्हणून जालंदर, फिरोझपूर व अमृतसर ताब्यात घेण्याच्या उद्देशाने पाकच्या रणगाड्यांनी मुसंडी मारली. या अमेरिकी बनावटीच्या अत्याधुनिक पॅटन रणगाड्यांना भारताच्या सैन्याने खेमकरण येथे अडवले. तुंबळ चकमक झाली. केवळ पाच रणगाड्यांच्या बदल्यात भारताने बहुसंख्य पॅटन रणगाड्यांचे भंगार बनवले. दुसऱ्या महायुद्धानंतर जगात झालेली ही पहिली मोठी रणगाड्यांची चकमक होती. पुढे युनोने हस्तक्षेप केला. शस्त्रसंधी होऊन २२ दिवसांनी युद्ध संपले. पण अमेरिकेने काही पाकला पाठबळ दिले नाही. हेच १९९९ सालीही कारगीलमध्ये घडले. पाकने काश्मीरच्या या विभागात सैन्य घुसवले. नंतर भारताने त्याला प्रखर उत्तर देत सर्व भूभाग परत मिळवला. पण अमेरिकेने काही हस्तक्षेप केला नाही. उलट ‘तुम्ही प्रत्यक्ष सीमारेषा ओलांडली आहे, तेव्हा तुम्ही सैन्य मागे घ्या व युद्ध थांबवा, आम्ही भारताला शस्त्रसंधी करायला सांगणार नाही’, असे अमेरिकी अध्यक्ष बिल क्लिन्टन यांनी नवाझ शरीफ यांना बजावले होते. मुशर्रफ ‘राजकीय नेतृत्वाचा कमकुवतपणा’ म्हणतात, त्याचे कारण शरीफ यांनी अमेरिकेपुढे नमते घेतले, असा त्यांचा आक्षेप आहे. पाक तेव्हा अण्वस्त्रधारी देश बनला होता आणि वेळ पडल्यास ही अण्वस्त्रे हलवून भारताला धमकावण्याचा मुशर्रफ यांचा प्रयत्न होता. त्याची अमेरिकेला कल्पना होती. तसा इशाराही क्लिन्टन यांनी शरीफ यांना दिला होता. १९६५ व १९९९ मधील घटनांचे तात्पर्य इतकेच की, काश्मीरचा मुद्दा पाक सोडणार नाही व त्यासाठी आता प्रत्यक्ष युद्धाच्या ऐवजी दहशतवादाचा वापर तो करीत असून, त्याचा फटका भारतातच नव्हे, तर देशाबाहेरील हितसंबंधांना बसत आहे. अफगाणमधील एका हॉटेलवर काही दिवसांपूर्वी झालेल्या आत्मघातकी हल्ल्यात चार भारतीय मारले गेले. प्रत्यक्षात या हल्ल्याचे खरे लक्ष्य होते, ते तेथे उपस्थित राहण्याची शक्यता असलेले भारतीय राजदूत. सुदैवाने ते बचावले. काबुलमधील भारतीय वकिलातीवर अडीच वर्षांपूर्वी असाच हल्ला करण्यात आला होता. त्यावेळी दोन भारतीय राजनैतिक अधिकारी मारले गेले होते. नवे अफगाण अध्यक्ष अश्रफ गनी यांना आपली सत्ता मजबूत करायची आहे. त्यासाठी तालिबानच्या काही गटांना सत्तेत सहभागी करून घेण्याची व इस्लामीकरणाचा तालिबानी अजेंडा काही प्रमाणात मान्य करण्याचीही त्यांची तयारी आहे. त्यासाठी पाकची मदत मिळणे निर्णायक ठरणार आहे. भारताला थारा नको, अशी पाकची अट आहे. उलट अफगाण जनतेला भारताचा हात धरायचा आहे. पण भारताचा हात धरायचा असेल, तर आमचा सोडा आणि सत्ता स्थिर बनवायची इच्छाही सोडून द्या, असे पाक अफगाण अध्यक्षांना सांंगत आहे. अमेरिकेलाही ते मान्य आहे. त्यामुळे भारताची कोंडी होत आहे. भारताला आव्हान देण्यासाठी त्याचाच पाक वापर करीत आहे. ते ओळखूनही केवळ निवडणुकीत मते मिळविण्यासाठी ‘देशाला पटेल’ असा तोडगा काश्मीर प्रश्नावर काढू व पाकला धडा शिकवू, अशा घोषणा प्रचारात करण्यात आल्या. पण काँग्रेसपेक्षा वेगळे काहीच मोदी सरकारला करता येत नाही, हे काश्मीर निवडणुकीनंतर आता स्पष्ट झाले आहे. म्हणूनच मग ‘दाऊदला परत आणू’, अशा पोकळ घोषणा करण्यावर भर दिला जातो आणि तोच मुशर्रफ यांच्यासारख्यांना वारंवार कंठ फुटण्यास वाव देत असतो.
जित्याची खोड...!
By admin | Updated: May 20, 2015 00:16 IST