शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
3
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
4
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
5
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
6
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
7
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
8
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
9
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
10
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
11
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
12
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
13
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
14
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
15
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
16
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
17
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
18
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
19
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
20
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
Daily Top 2Weekly Top 5

शूर बालकाची शोकांतिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2017 00:11 IST

२०१६ चा राष्ट्रीय बालशौर्य पुरस्कार मिळालेला नीलेश भिल हा बालक भावासह बेपत्ता आहे. एकाचे आयुष्य वाचविणारा नीलेश मात्र जगण्याच्या लढाईत बालपण हरवत होता...

 जलाशयात बुडणाऱ्या व्यक्तीला वाचविणाऱ्या आणि या धाडसाबद्दल राष्ट्रीय बालशौर्य पुरस्कार मिळविलेला १२ वर्षीय नीलेश रेवाराम भिल हा बालक सात वर्षीय भावासह १५ दिवसांपासून बेपत्ता आहे. पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला असून, चौफेर तपास करूनही त्याचा शोध लागलेला नाही. राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या या बालकाच्या बेपत्ता होण्याने अनेक अस्वस्थ प्रश्न निर्माण झाले आहेत. नीलेश हा जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी या गावातील रहिवासी. भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यामुळे कोथळी गाव प्रसिद्ध आहे, त्यात नीलेशमुळे आणखी भर पडली. कोथळीला संत मुक्ताबाईचे मंदिर आहे. तेथे वर्षभर भाविकांची वर्दळ असते. जलाशय असल्याने अंघोळ करून भाविक दर्शनाला जातात. ३० आॅगस्ट २०१५ रोजी बुलढाण्याचे भागवत ओंकार उगले हे भाविक जलाशयात बुडत असताना नीलेशने त्यांना वाचविले. नीलेशने दाखविलेल्या धाडसाबद्दल गावकऱ्यांनी कौतुक केले. त्याच्या शौर्याची दखल शासकीय पातळीवर घेण्यात आली. २६ जानेवारी २०१६ रोजी नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राष्ट्रीय बालशौर्य पुरस्कार देऊन त्याचा गौरव करण्यात आला. छोट्या गावातील आदिवासी मुलाच्या शौर्याची दखल राष्ट्रीय पातळीवर घेतली गेल्याने खान्देशात आनंदोत्सव साजरा झाला. नीलेशचे वडील रेवाराम आणि आई सुंदराबाई यांचे कोथळीत गावकुसाबाहेर घर आहे. आशापुरी मंदिराजवळ त्यांचे कुडाच्या भिंती आणि पत्र्याचे छप्पर असलेल्या घरात चौकोनी कुटुंब राहते. आई-वडील हातमजुरी करतात. नीलेश आणि गणपत गावातील शाळेत जातात. राष्ट्रीय बालशौर्य पुरस्कार मिळाल्यानंतर नीलेशचे महिनाभर कौतुक झाले. राजकीय मंडळी, शासकीय अधिकारी, स्वयंसेवी व सामाजिक संस्थांचे पदाधिकारी यांनी कोथळीत जाऊन नीलेशसोबत ‘फोटोसेशन’ केले. चांगल्या शाळेत शिक्षण, घरकुल अशी आश्वासने देण्यात आली. सायकलीशिवाय कोणतेही आश्वासन दीड वर्षात पूर्ण झालेले नाही. ‘मोठेपणी डॉक्टर व्हायचेय’ असे स्वप्न देशाच्या पंतप्रधानापुढे मांडणाऱ्या नीलेशचे बालपण जीवनाची लढाई लढण्यात करपत होते. शिक्षणाची आवड असताना पोटाची खळगी भरण्यासाठी बकऱ्या चारण्याचे काम करावे लागत होते. अनिच्छेने तो हे काम करायचा आणि नाराज असायचा, अशी माहिती ग्रामस्थांकडून आता समोर येत आहे. नीलेश व गणपतच्या बेपत्ता होण्याने शासकीय व पोलीस यंत्रणेत खळबळ उडाली. आई सुंदराबाईच्या फिर्यादीवरून अपहरणाचा गुन्हा दाखल झाला. पोलीस दलाने २० कर्मचाऱ्यांचे विशेष पथक नियुक्त करून कसून शोध सुरू केला. वनविभाग आणि श्वान पथकाची मदत घेत नजीकचे जंगल पिंजून काढण्यात आले. भावंडांची छायाचित्रे असलेली पत्रके बसस्थानक व रेल्वेस्थानकावर लावण्यात आली. सीसीटीव्ही कॅमेरे तपासून शोध घेतला गेला. ‘ट्रॅक द मिसिंग चाइल्ड’ या हायटेक यंत्रणेचा उपयोग करीत माग काढण्यात आला. पंतप्रधान कार्यालयाकडूनही अपहरणाविषयी माहिती घेण्यात आल्याने पोलीस दलाने दुप्पट ताकद लावत तपास सुरू केला आहे. आयपीएस अधिकारी नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली विविध शक्यता पडताळून पाहण्यात येत आहे. नीलेशला पुरस्कारावेळी मिळालेली रक्कम ही शासनातर्फे त्याच्या नावे मुदत ठेव करण्यात आली आहे. तो १८ वर्षांचा झाल्यावर ही रक्कम त्याला मिळणार आहे. त्यामुळे आर्थिक कारण बाद होते. घराच्या छतावर पडलेली नादुरुस्त सायकल आणि शिक्षणाऐवजी बकऱ्या चारायचे करावे लागणारे काम या नाराजीतून तो घरातून निघून गेला आहे काय? बालकांचे अपहरण करून वाममार्गाला लावणाऱ्या टोळीच्या तावडीत तर ही भावंडे सापडली नाहीत ना, या शक्यता पोलीस दल तपासून पाहत आहे. नीलेशचे आई-वडीलदेखील आपल्या परीने परिसरात शोध घेत आहेत. अगदी ज्योतिषाची मदतदेखील त्यांनी घेतली. खान्देशचा हा शूरवीर बालक सुखरूप असावा आणि लवकर घरी परत यावा, अशी प्रार्थना जळगावकर करीत आहेत. 

  - मिलिंद कुलकर्णी -