शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
3
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
4
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
5
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली
6
Python Hunting: अजगर मारून त्याचं मांस शिजवलं, दोन जणांना अटक! 
7
सिक्कीममध्ये निसर्गाचा कोप! भूस्खलनात ४ जणांचा मृत्यू, ३ जण बेपत्ता, बचावकार्य सुरू
8
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
9
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
10
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
11
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
12
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
13
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
14
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
15
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
16
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
17
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
18
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
19
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
20
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल

आजचा अग्रलेख: उत्तराखंड : ‘समान’तेचे पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2025 07:00 IST

निकट भविष्यात उत्तराखंडच्या पावलावर पाऊल ठेवत भारतीय जनता पक्षाची सत्ता असलेली इतर राज्येही यूसीसी लागू करण्याचा विचार करू शकतात.

उत्तराखंड राज्याने नुकताच समान नागरी कायदा (यूसीसी) लागू करून चर्चेचे मोहळ उठवले आहे. पोर्तुगीज काळापासून यूसीसी लागू असलेल्या गोव्यानंतर हा कायदा लागू करणारे उत्तराखंड हे दुसरे राज्य ठरले आहे. भारतीय राज्यघटनेच्या दृष्टीने, समान नागरी कायदा लागू करणे हे अनुच्छेद ४४ अंतर्गत निर्देशित तत्त्वांपैकी एक महत्त्वाचे तत्त्व मानले जाते. त्यामुळे उत्तराखंडच्या निर्णयाचे दूरगामी परिणाम काय असतील, हे जाणून घेणे महत्त्वाचे ठरेल. सध्या भारतात विविध धार्मिक समुदायांसाठी वेगवेगळे वैवाहिक, वारसा हक्क आणि घटस्फोटाचे कायदे अस्तित्वात आहेत. यूसीसी लागू झाल्याने आता उत्तराखंडमधील सर्व नागरिकांना एकच कायदा लागू होईल. त्यामुळे कायदेशीर प्रक्रियेत अधिक स्पष्टता आणि सुसूत्रता अपेक्षित आहे. यूसीसीमुळे सर्व महिलांना समान हक्क मिळतील आणि त्यांचे सामाजिक स्थान बळकट होईल. कौटुंबिक कायद्यांमधील भिन्नतेमुळे अनेक प्रकरणे न्यायालयात जातात आणि विविध कायद्यांमुळे निर्णयही वेगवेगळे लागतात. यूसीसी लागू झाल्यास अशा बाबतीत एकसमान निर्णय येण्यास मदत होईल आणि परिणामी न्यायसंस्थेवरील ताणही थोडा कमी होईल. यूसीसीचे हे लाभ मान्य केले तरी त्यामागे केवळ तोच हेतू आहे, असे मानणे हा फारच भाबडेपणा होईल. हे सर्वविदित आहे की देशात यूसीसी लागू करणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवाराच्या मुख्य वैचारिक कार्यक्रम पत्रिकेवरील एक प्रमुख विषय आहे. जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे राज्यघटनेतील कलम ३७० हटविणे आणि अयोध्येत राम जन्मभूमीस्थळी भव्य राम मंदिराची उभारणी करणे ही इतर दोन उद्दिष्ट्ये पूर्ण झाली असल्यामुळे, आता परिवार तिसऱ्या उद्दिष्टपूर्तीच्या दिशेने वाटचाल सुरू करेल, हे अपेक्षित होतेच! उत्तराखंडमधील यूसीसीच्या निमित्ताने त्या दिशेने पहिले पाऊल उचलण्यात आले आहे, असे म्हटल्यास ते चुकीचे ठरणार नाही.

निकट भविष्यात उत्तराखंडच्या पावलावर पाऊल ठेवत भारतीय जनता पक्षाची सत्ता असलेली इतर राज्येही यूसीसी लागू करण्याचा विचार करू शकतात. गुजरात, मध्य प्रदेशसह काही अन्य राज्यांनी आधीच यूसीसी लागू करण्याच्या दिशेने पावले उचलण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे लवकरच ही संकल्पना देशातील इतर राज्यांमध्ये राबविण्याचे प्रयत्न झाल्यास आश्चर्य वाटू नये. भारतीय राज्यघटनेच्या कलम ४४ नुसार, सरकारने नागरिकांसाठी समान कायदा निर्माण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे; मात्र ते ‘मार्गदर्शक तत्त्व’ असल्याने त्याची सक्ती करता येत नाही. सर्वोच्च न्यायालयानेही शाह बानो (१९८५) आणि सरला मुद्गल (१९९५) या दोन प्रकरणांमध्ये यूसीसीची गरज नमूद केली आहे. इतरही काही खटल्यांवरील सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला यूसीसी लागू करण्यासाठी प्रोत्साहित केले आहे. त्यामुळे, उत्तराखंडच्या यूसीसी कायद्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आल्यास, सर्वोच्च न्यायालय या कायद्याचे समर्थन करण्याचीच शक्यता अधिक आहे; परंतु न्यायालय काही बदल सुचवू शकते किंवा काही कलमे घटनात्मक कसोटीवर तपासू शकते. ते करताना न्यायालय राज्यघटनेतील मार्गदर्शक तत्त्वे आणि धर्मस्वातंत्र्य (कलम २५) यामध्ये संतुलन कसे साधेल, हे बघावे लागेल.

सध्या तरी उत्तराखंडच्या निर्णयामुळे देशात यूसीसीबाबत नवा अध्याय सुरू झाला आहे. त्यामुळे महिला सशक्तीकरण, सामाजिक समरसता, राष्ट्रीय एकात्मतेला चालना मिळतानाच, न्यायसंस्थेवरील भार कमी होण्यासही मदत होईल. इतर राज्ये आणि केंद्र सरकार पुढे काय भूमिका घेते, यावरच देशभर यूसीसी लागू होण्याची शक्यता अवलंबून असेल. अर्थात, सध्या लोकसभेत भाजपला स्वबळावर बहुमत नसल्याने आणि भाजपच्या काही मित्र पक्षांचाही यूसीसीला विरोध असल्याने, किमान आणखी काही वर्षे तरी देशव्यापी यूसीसी लागू होण्याची शक्यता नाहीच! तूर्त, उत्तराखंडने यूसीसी लागू करून ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. आगामी काळात इतर राज्यांनीही उत्तराखंडची री ओढल्यास, भविष्यात देशव्यापी यूसीसी अस्तित्वात येण्याची शक्यता वाढेल. कोणत्याही लोकशाहीप्रधान देशात तात्त्विकदृष्ट्या यूसीसी असायलाच हवा; पण ते साधताना, विशिष्ट समुदायांना लक्ष्य करण्याची नव्हे, तर देश आणि समाज पुढे नेण्याची मानसिकता असावी!

टॅग्स :Uniform Civil Codeसमान नागरी कायदाUttarakhandउत्तराखंड