शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: रशियाच्या समुद्राखाली शक्तीशाली भूकंप! कुरील आयलंडवर त्सुनामी; अमेरिका, जपान, न्यूझीलंडसह जगाला धोका
2
मुख्यमंत्री अतिशय उद्विग्न, मंत्र्यांना सज्जड दम; बेशिस्त खपवून घेणार नाही, २० मिनिटे खडेबोल
3
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
4
भारताने लवकर व्यापार करार करावा, अन्यथा २५% टॅरिफ लादू! डोनाल्ड ट्रम्प यांची पुन्हा धमकी
5
लाडकी बहीण योजनेत पुरुष कसे काय घुसले?: मुख्यमंत्री, ‘लोकमत’च्या वृत्ताचे मंत्रिमंडळ बैठकीत पडसाद
6
एकही चूक न करायच्या अटीवर कोकाटेंना अभय, मंत्रिपद टेम्पररी, दर १५ दिवसांनी आढावा: अजित पवार
7
‘ऑपरेशन सिंदूर’ थांबवा, असे जगातील कोणत्याही नेत्याने सांगितले नाही: पंतप्रधान नरेंद्र मोदी
8
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका टप्प्याटप्प्याने घेणार; आधी जिल्हा परिषद, नंतर मनपा होणार
9
ठाकरे बंधुंना सलामी दिली, प्रो-गोविंदा स्पर्धेतून बाहेर; जय जवान पथक व्यवस्थापकांचा आरोप
10
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याविरूद्ध अनिल परबांनी दिले पुरावे; CM फडणवीसांकडे सादर
11
आजी-माजी खासदार आमने-सामने; विचारेंना मानसोपचार तज्ज्ञांची गरज; तर म्हस्के ‘वाचाळ रत्न’!
12
गणेशोत्सवासाठी ST सज्ज; ५,२०० जादा बस उपलब्ध करून देण्याचे नियोजन सुरू, मुंबईतून ६०० बस
13
उंचीच्या सक्तीमुळे उडणार मंडळांची धांदल; दोन विसर्जनस्थळे गाठण्यासाठी कसरत
14
वसई-विरार पालिकेचे माजी आयुक्त ईडीच्या कचाट्यात; सोमवारी निरोपाचा सत्कार, मंगळवारी धाड
15
लोकलमध्ये बसल्यावर मिळते तिकीट; UTSचा गैरवापर, QR कोड सुविधा बंद करण्यासाठी रेल्वेला पत्र
16
AI, कॉम्प्युटर इंजिनीअरिंगच्या साडेचार हजार जागा वाढल्या; प्रवेशासाठी १ लाख ७६ हजार जागा
17
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
18
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
19
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
20
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी

विरोधकांच्या तंबूतून.. !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 08:06 IST

एकीकडे भाजप व दुसरीकडे काँग्रेस यांना दूर ठेवून तिसरी आघाडी स्थापन करण्यासाठी शरद पवार सरसावले आहेत, असे चित्र निर्माण झाले

देशातील विरोधकांना किमान चर्चेसाठी का होईना, एकत्र आणण्यासाठी आता माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा पुढाकार घेताना दिसत  आहेत. भाजपने अलगदपणे दूर केलेले सिन्हा सध्या तृणमूल काँग्रेसचे उपाध्यक्ष आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी त्यांना राज्यसभेवर पाठवतील, अशी चर्चा आहे. त्यामुळे ते सक्रिय झाले आहेत. शिवाय ममता बॅनर्जी यांनाही राष्ट्रीय राजकारणात महत्त्व हवे आहे. अशा स्थितीत विस्मरणात गेलेल्या आपल्याच राष्ट्र मंच संस्थेद्वारे यशवंत सिन्हा यांनी शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी  भाजपविरोधक व समविचारी मंडळींची बैठक बोलावली. पण तिचा आधीच इतका गवगवा झाला की, आता राष्ट्रीय राजकारणात आमूलाग्र बदल होणार,  असेच सर्वांना वाटावे. विरोधकांची मोट बांधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार दिल्लीत गेले, अशी चर्चा आधी मुंबईत आणि मग दिल्लीत सुरू झाली.

एकीकडे भाजप व दुसरीकडे काँग्रेस यांना दूर ठेवून तिसरी आघाडी स्थापन करण्यासाठी शरद पवार सरसावले आहेत, असे चित्र निर्माण झाले. त्यामुळे हा तिसरा पर्याय कसा असेल, काँग्रेसची त्याविषयी काय भूमिका असेल, यावर दिल्लीत अपेक्षेप्रमाणे चर्वितचर्वण सुरू झाले. दिल्लीला गप्पा आणि अफवा यांसाठी असे विषय सतत हवेच असतात. त्यामुळे शरद पवार यांच्या निवासस्थानी काल दिवसभर पत्रकार, कॅमेरामन तळ ठोकूनच होते. कोणकोण बैठकीसाठी येत आहे, कोण मध्येच बाहेर पडले, याचे वर्णन सुरू होते.  बैठक संपवून पवार कधी एकदा बाहेर येतात आणि कोणती मोठी घोषणा करतात, याकडे प्रसारमाध्यमांचे लक्ष लागले होते. पण पवार फार काही न बोलताच, केवळ प्रास्ताविक करून परत निघून गेले.

बैठकीची जी माहिती दिली गेली, त्यातून माध्यमांच्या हाती काहीच सनसनाटी वा मसालेदार लागले नाही. त्यामुळे विरोधकांची बैठक फसली, तो फ्लॉप शो ठरला, अशा बातम्या पसरल्या. बैठकीत काँग्रेसचा एकही प्रतिनिधी नव्हता. त्यामुळे मुद्दाम त्या पक्षाला निमंत्रण नव्हते, अशीही चर्चा झाली. पण काँग्रेसच्या तीन नेत्यांना निमंत्रण दिले होते, काही कारणास्तव ते आले नाहीत, असेही स्पष्ट झाले. अर्थात बैठकीचा अजेंडा स्पष्ट नसल्याने आणि शरद पवार नव्हे, तर यशवंत सिन्हा यांनी पुढाकार घेतला असल्याने काँग्रेसने आपल्या नेत्यांना बैठकीला न जाण्याच्या सूचना दिल्या असू  शकतील. ही बैठक फसली की यशस्वी झाली, हे आयोजक असलेल्या सिन्हा यांनाही आताच सांगता येणार नाही, कारण ही पहिलीच बैठक होती. तिचा स्पष्ट अजेंडा नव्हता. शिवाय बैठकीचे आमंत्रण राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींबरोबर माजी न्यायाधीश, ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ, विचारवंत, अन्य मान्यवर, शेतकरी प्रतिनिधी यांनाही होते.

कोणत्याच राजकीय पक्षाशी थेट संबंध नसलेल्या या मान्यवरांच्या उपस्थितीत झालेल्या  पहिल्याच बैठकीत तिसरी, चौथी वा कोणतीही आघाडी होणे वा त्याबाबत चर्चा  होणेही शक्यच नव्हते. त्यामुळे बैठकीत या मंडळींनी देशातील राजकीय, सामाजिक, आर्थिक स्थिती, सरकारविरोधी भूमिका घेणाऱ्यांवर लावली जाणारी देशद्रोहाच्या गुन्ह्यांची कलमे, कोरोना मृतांचे आकडे लपविण्याचा कथित प्रयत्न, लसीकरणास होणारा विलंब, पेट्रोल, डिझेल यांच्या किमतीतील भरमसाठ वाढ, खाद्यतेले व अन्नधान्यांची दरवाढ आणि एकूणच महागाई आदी विषयांचा आढावा घेतला. या सर्व मुद्द्यांवर मोदी सरकार अपयशी ठरले आहे आणि सरकारला व्हिजन नाही, यावर सर्वांचे एकमत होते. पण कोरोना विषाणूंच्या संसर्गाच्या काळात सरकारविरोधात रस्त्यांवर उतरणे शक्य नाही, आंदोलनांसाठी हा काळ योग्य नाही, असेच विरोधकांना वाटत आहे. अशा स्थितीत वेळोवेळी आपण भेटावे, परिस्थितीचा आढावा घ्यावा,  दबाव गट बनवून सरकारला वळणावर आणण्याचा प्रयत्न करावा, अशी तिथे चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे.

पुढील वर्षी उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा यासह काही राज्यांच्या विधानसभा निवडणुका आहेत. त्यासाठी त्यांना रणनीती ठरवायची आहे. पण पहिल्याच बैठकीत ती ठरू शकत नाही आणि काँग्रेसला दूर ठेवून भाजपविरोधात लढणे शक्य नाही, हेही सर्वांना माहीत आहे. आपण एकत्र आलो तर काँग्रेस काहीसे नमते घेईल, असेही काही विरोधकांना वाटत आहे. अशा विविध अंगांनी चर्चा झाली. लगेच निष्पन्न काहीच झाले नाही तरी त्यामुळे ही बैठक फसली असे म्हणता येणार नाही. विरोधकांच्या तंबूत अद्याप बरेच काही घडू शकेल. या तंबूत शिरून काँग्रेस तंबूचा ताबा घेते की यातील काही जणच या तंबूतून बाहेर पडतात, हे कळायला सहा महिने तरी लागतील.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारBJPभाजपा