१९४२ चा स्वातंत्र्यलढा महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली अहिंसात्मक मार्गाने सुरू होता. त्यांच्याच विचारावर निष्ठा असणारी मात्र प्रसंगी हिंसेचा मार्ग अवलंबणारी तरुणांची एक मोठी संघटना सातारा परिसरात लढा उभा करीत होती. तिचे नेतृत्व क्रांतिसिंह नाना पाटील यांच्याकडे होते, तर सेनापतिपद कुंडलचे जी. डी. ऊर्फ बापू लाड यांच्याकडे होते. असंख्य तरुणांनी जिवावर उदार होऊन सशस्त्र लढा देण्याची तयारी करीत चक्क ‘प्रतिसरकार’च स्थापन केले होते. ब्रिटिश शासन व्यवस्था झुगारून देण्याचा आणि पर्यायी सरकार चालविण्याचा हा प्रयोग होता. ब्रिटिशांनी हा लढा मोडून काढला. याला अपवाद साताऱ्याचे प्रतिसरकार होते. ते साडेतीन वर्षे चालले. कारण ते केवळ ब्रिटिशांविरुद्ध नव्हते, तर गावोगावी जातदांडगे आणि धनदांडगे गुंडगिरी करीत होते, त्यांचा बंदोबस्त या प्रतिसरकारमधील तरुण स्वातंत्र्यसैनिकांनी केला. त्यामुळे त्यांना समाजाश्रय मिळाला होता. या संघर्षातून तयार झालेल्या पिढीतील अनेक स्वातंत्र्यसेनानींपैकी जी. डी. ऊर्फ बापू लाड व क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी यांचे अलीकडच्या काळात निधन झाले. आता हाताच्या बोटावर मोजता येतील असे दोन- चार सेनानी हयात आहेत. या सर्वांनीच त्या लढ्यापासून प्रेरणा घेऊन ब्रिटिशांना हाकलून देऊन स्वराज्य स्थापनेसाठी सतत संघर्ष केला. संयुक्त महाराष्ट्राचा लढा, गोवा मुक्तीचा संघर्ष, रयतेच्या कल्याणासाठी शेतकऱ्यांचा वर्गलढादेखील अखेरच्या श्वासापर्यंत या मंडळींनी केला. लाड यांनी त्यांच्या या संघर्षमय जीवनाची कहाणी विविध टप्प्यावर लिहून ठेवली होती. त्यांचे हे आत्मकथन त्यांच्या निधनानंतर चार वर्षांनी गत रविवारी कोल्हापुरात प्रकाशित झाले. तेव्हा महाराष्ट्राच्या राजकारणावर सातत्याने प्रभाव टाकणाऱ्या जुन्या पिढीतील आठवणी ताज्या झाल्या.हाच विचार आणि संघर्षाची परंपरा घेऊन महाराष्ट्रात विशेषत: पश्चिम महाराष्ट्रात समाजपरिवर्तनाचे अनेक प्रयोग झाले. एकावेळी शेती-शेतकरी केंद्रबिंदू मानून शिक्षण आणि सामाजिक न्यायासाठी आग्रह धरत या पिढीने संघर्ष उभा केला. त्यांची ही परंपरा काँग्रेस किंवा समाजवादी विचाराने काम करणाऱ्या नेतृत्वानेही कायम ठेवली. त्यातूनच धरणांचा आग्रह, शेतमाल प्रक्रियेसाठी कारखानदारी, बाजार समित्या, बँकांची उभारणी यासाठी संघर्ष केला. क्रांतिसिंह नाना पाटील, तुळशीदास जाधव, यशवंतराव चव्हाण, जी. डी. लाड, नागनाथअण्णा नायकवडी, वसंतदादा पाटील, किसनवीर, रत्नाप्पाण्णा कुंभार, माधवराव बागल, सा. रे. पाटील आदिंसह असंख्य स्वातंत्र्यसेनानी काळाच्या पडद्याआड गेले. त्यांच्यानंतरची पण बरोबरीने काम केलेली मोठी फळीदेखील पडद्याआड गेली. गेल्या चार-सहा महिन्यांत तर दक्षिण महाराष्ट्राला अनेक धक्के बसले. त्यातील सर्वांत मोठी व सामाजिक वास्तवाला धक्का देणारी बाब म्हणजे गोविंद पानसरे यांची हत्त्या. पाठोपाठ आर. आर. पाटील, सदाशिवराव मंडलिक, सा. रे. पाटील आणि विक्रमसिंह घाटगे यांचे निधन झाले. ही सर्व मंडळी जी. डी. बापूं्च्या संघर्षयात्रेतील वारकरीच होती. सा. रे. पाटील यांनी सातत्याने सात दशके काम केले. सदाशिवराव मंडलिक यांचे नाव सदा संघर्ष ठेवावे, असे त्यांचे जीवन होते. विक्रमसिंह घाटगे यांनी शाहू महाराजांचा वारसा सहकारी साखर कारखानदारीतून चालविला. आर. आर. पाटील यांना आधुनिक गाडगेबाबाच म्हटले जात असे. आजचे स्वच्छ भारत अभियान त्यांच्या गाडगेबाबा अभियानाचे देशव्यापी रूप आहे.अशा संघर्षयात्रेचे चित्रण आणि परंपरा जी. डी. बापू लाड यांच्या आत्मकथनात नोंदवून ठेवली गेली आहे. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या या माणसांनी सत्ता, संपत्ती आणि प्रतिष्ठेचा विचार न करता समाज घडविण्याचे काम केले. त्यांचे आत्मकथन हा महाराष्ट्राच्या इतिहासाच्या पानांचाच भाग आहे. त्यांच्या स्मृती जागविताना या वर्षात उज्ज्वल परंपरा निर्माण करण्याचा मान सोडून गेलेल्यांची आठवण जरूर येते.- वसंत भोसले