शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !

By विजय दर्डा | Updated: April 29, 2024 03:37 IST

भाषेचे पावित्र्य जणू इतिहासजमाच झालेले आहे! नेत्यांच्या जिभा बेलगाम सुटल्या आहेत आणि शत्रुत्वाचे वादळ उठले आहे.

डॉ. विजय दर्डा, चेअरमन, एडिटोरियल बोर्ड, लोकमत समूह

देशात सध्या निवडणूक आचारसंहिता लागू आहे, हे आपण सर्व जाणतो. निवडणूक प्रचाराच्या वेळी धार्मिक प्रतीकांचा वापर करता येत नाही; तसेच धर्म, संप्रदाय आणि जातींच्या आधारे मत मागण्याचे आवाहनही करता येत नाही. भेदभाव निर्माण होऊन वैमनस्य पसरेल अशी कोणतीही गोष्ट या काळात करता येत नाही; परंतु सध्या जे काही चालले आहे, ते लपून राहिलेले नाही. नेत्यांच्या जिभा बेलगाम सुटल्या आहेत आणि शत्रुत्वाचे वादळ उठले आहे. निवडणुकीत एकमेकांच्या धोरणावर टीका  होऊ शकते आणि झालीही पाहिजे. एकमेकांवर भीषण आणि घाणेरडे आरोप मात्र करता येत नाहीत; परंतु सध्या जे चालले आहे, त्याने भारताची सामाजिक वीण मुळापासून उसवायला घेतली आहे.

गेल्या आठवड्यापर्यंत निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता उल्लंघनाच्या २०० पेक्षा जास्त तक्रारी आल्या असल्याचे आयोगाची आकडेवारी सांगते. आयोगाच्या म्हणण्यानुसार त्यांपैकी १६९ तक्रारींवर कारवाई केली गेली. भाजपाकडून ५१ तक्रारी आल्या. त्यांतील ३८ प्रकरणांवर कारवाई झाली. काँग्रेसकडून ५९ तक्रारी आल्या; त्यांपैकी ५१ तक्रारींवर कारवाई केली गेली. अन्य पक्षांकडून ९० तक्रारी आल्या आणि त्यांपैकी ८० प्रकरणांत कारवाई केली गेली. हे आकडे वाढतच चालले आहेत.

या निवडणुकीत नेते जी  भाषा वापरत आहेत, त्यांतील वाक्ये उदाहरणादाखल येथे उद्धृत करणेही शक्य नाही. मी लहानपणापासून राजकारणाचे सुसंस्कृत रूप पाहिले असून, स्वतः राजकीय जीवनात त्याचे पालनही केले आहे. येथे मी दोन घटनांचा विशेषकरून उल्लेख करू इच्छितो. माझे बाबूजी ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक जवाहरलाल दर्डा यांच्याविरुद्ध प्रचारसभेसाठी अटलबिहारी वाजपेयी यवतमाळला येणार होते. त्या काळात मोठे नेतेही रेल्वेने प्रवास करत असत. कार्यकर्त्यांच्या घरी मुक्काम करत. रेल्वेतून उतरल्यानंतर गंतव्यस्थळी मोटारीने जात. त्या वेळी मोटारीही एकट्यादुकट्याच असत. अटलबिहारींना धामणगावहून यवतमाळला आणण्यासाठी स्थानिक नेत्यांनी ज्या मोटारीची व्यवस्था केली होती, ती नादुरुस्त झाली. स्थानिक नेत्यांनी बाबूजींना फोन केला, ‘भैयाजी, आपली मदत पाहिजे. आमची मोटार नादुरुस्त झाली आहे आणि १५ मिनिटात रेल्वे येऊन पोहोचेल!’ - बाबूजींना सर्व लोक ‘भैयाजी’ म्हणत असत.

बाबूजी म्हणाले, ‘काळजी करू नका, मोटार पोहोचेल.’ बाबूजीनी बिर्ला जीनिंग मिलच्या भट्टड यांना फोन केला. भैयाजी अटलबिहारींसाठी मोटार पाठवायला सांगत आहेत, हे लक्षात येताच भट्टड यांना आश्चर्यच वाटले. बाबूजींनी कपाशीचा व्यवसाय करणाऱ्या जयरामदास भागचंद यांनाही फोन करून मोटार पाठवायला सांगितले. दोन्ही मोटारी धामणगाव रेल्वे स्टेशनवर पोहोचल्या. अटलजींनी विचारले की, या दोन गाड्या कशासाठी? त्यांना असे सांगण्यात आले की, या गाड्या दर्डाजींनी पाठवल्या आहेत. दोन अशासाठी की, एक नादुरुस्त झाली तरी आपण वेळेवर सभेच्या ठिकाणी पोहोचू शकाल. ज्यांच्याविरुद्ध प्रचार करायला आपण आलो त्यांनीच गाडी पाठवली हे पाहून अटलजी थक्क झाले. सभेनंतर बाबूजींना भेटायला ते आमच्या घरीही आले होते.

आणखी एक घटना सांगतो. बाबूजींच्या निवडणूक प्रचारकाळात मी त्यांच्याबरोबर असायचो. एकदा यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा तालुक्यातून आम्ही चाललो होतो.  रस्त्यात बाबूजींना अचानक रस्त्याच्या कडेला बुचकेजी उभे दिसले. ते बाबूजींच्या विरुद्ध निवडणूक लढवत होते. बाबूजींनी मोटार मागे घेतली आणि विचारले की, काय झाले? बुचकेजींनी सांगितले की, त्यांची मोटार खराब झाली आहे. बाबूजींनी त्यांना मोटारीत बसवले आणि त्यांच्या सभेच्या ठिकाणी नेऊन सोडले.

वैचारिक पातळीवर नेत्यांमध्ये मतभिन्नता असायची; परंतु ते एक दुसऱ्याचा सन्मान करत असत. मला आठवते, जॉर्ज फर्नांडिस, मधू दंडवते, मधू लिमये.. आदी अनेक नेते बाबूजींकडे येत असत. मीसुद्धा राजकीयदृष्ट्या दुसऱ्या विचारप्रणालीच्या लोकांशी मैत्री राखून असतो. सांगण्याचा मुद्दा हा की, मतभिन्नता असावी; परंतु मनभेद असता कामा नयेत. तथापि आज प्रचाराची पातळी ज्या प्रकारे घसरली आहे, त्यातून लोकशाहीच्या मुळांना धक्का पोहोचत आहे. आपण एक दुसऱ्याचे कितीही प्रखर टीकाकार असलो तरी आपली भाषा नेहमीच मर्यादशील राहिली पाहिजे. त्यासाठी प्रसिद्ध शायर बशीर बद्र यांचा एक शेर मला समर्पक वाटतो :

दुश्मनी जम कर करो  लेकिन ये गुंजाइश रहे जब कभी हम दोस्त हो जाएँ  तो शर्मिंदा न हों...

आपण मर्यादापुरुषोत्तम प्रभू श्रीराम आणि कर्मयोगी भगवान श्रीकृष्णाच्या भूमीवरचे लोक आहोत. आपण स्वतःला विचारले पाहिजे की, त्यांच्या आचरणाचे पालन आपण करतो आहोत काय? आपण भगवान महावीर, भगवान बुद्ध, छत्रपती शिवाजी, महात्मा गांधी आणि बाबासाहेबांना पूजणारे लोक आहोत; परंतु आपले आचरण कसे आहे? आज निवडणूक होत आहे. उद्या ती संपेल; परंतु शब्दांचे हे जे विषारी बाण सुटत आहेत आणि ज्या जखमा होत आहेत, त्यांचा कुठलाही इलाज होत नसतो. सद्य:स्थितीत समाजाचे ताणेबाणे सांभाळणे अत्यंत आवश्यक आहे. देश सगळे काही पाहतो आहे. लक्षात ठेवा, निवडणूक आणि त्यातून येणारी सत्ता ही कधीही देशापेक्षा मोठी असू शकत नाही. हीच आपल्या लोकशाहीची ताकद आहे. देश आधी, बाकी सगळे नंतर! तेव्हा सगळ्या संबंधितांना विनंती इतकीच की, किमान या देशाच्या सभ्यतेचा गळा घोटू नका!

टॅग्स :Electionनिवडणूकlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४