शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
2
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
3
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
4
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
5
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
6
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
7
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
8
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
9
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
10
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
11
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
12
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
13
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
14
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
15
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
16
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
17
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
18
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
19
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बदलापूरमधील घटना
20
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?

विशेष लेख: विराट कोहलीने गाड्यांची अडगळ घराबाहेर काढली, तुमचं काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2023 08:13 IST

घरातली सगळी कपाटं उघडून पाहा. ज्या ज्या वस्तूकडे बघून ही वस्तू अनावश्यक आहे, असं तुमचं मन सांगेल ती वस्तू त्याचक्षणी घराबाहेर काढा.

भक्ती चपळगावकर, मुक्त पत्रकार

घरातली सगळी कपाटं उघडून पाहा. ज्या ज्या वस्तूकडे बघून ही वस्तू अनावश्यक आहे, असं तुमचं मन सांगेल ती वस्तू त्याचक्षणी घराबाहेर काढा. विराट कोहलीला वाटलं की, अरे; आपण गरज नसताना फारच वाहावत गेलो आणि उगाचच एवढ्या आलीशान गाड्या घेतल्या. आता जेवढी गरज आहे तेवढ्याच गाड्या जवळ ठेवाव्यात! - ज्या कधी वापरल्याच गेल्या नाहीत अशा महागड्या गाड्या मी विकून टाकल्या, असं कोहलीने अलीकडेच एका मुलाखतीत सांगितलं.

विराट तर क्रिकेटचा सुपरस्टार. आपण त्याच्यासारखे अब्जाधीश नसलो तरी आपापल्या परीने आपणही आयुष्यातला पसारा वाढवत असतोच. गरिबांकडे गरजांच्या प्रमाणात वस्तूंचे प्रमाण व्यस्तच असते; पण मध्यमवर्गीयांच्या आयुष्यात ज्यांची गरज कधीच संपली  अशा अनेक गोष्टी असतात, एवढाच फरक!  मनाच्या आणि घराच्या अडगळीत साठलेल्या या वस्तू कमी केल्या नाहीत तर आपल्या आयुष्यातली जळमटं वाढत जातात. विसाव्या शतकात जगभर मिनिमलिझम नावाच्या चळवळीला सुरुवात झाली. कलेच्या क्षेत्रात सुरू झालेल्या या चळवळीने आयुष्याच्या अनेक अंगांना स्पर्श केला. कमीत कमी वस्तू वापरत किमान गरजा भागवत आयुष्य व्यतीत करणे भारतीय उपखंडाला नवं नाही. पण गेल्या काही वर्षांपासून वस्तूंचा साठा कमी करणं हे एक मोठं आव्हान ठरलं आहे.  मरी कोंडो नावाची जपानी वंशाची बाई पसाऱ्यात जगणाऱ्या अमेरिकन लोकांच्या घरी फिरत त्यांची अडगळ आवरून देते. आता आपल्या सगळ्यांनाच मरी कोंडो होण्याची गरज आहे.

तुम्ही म्हणाल, कष्टाने पै-पै साठवून जमा केलेल्या वस्तू अशा कशा देऊन टाकाव्यात? प्रत्येक वस्तूची एक आठवण आहे. धाकटीचा भातुकलीचा सेट, मोठ्याचे क्रिकेट किट, पंधरा वर्षांपूर्वी स्कीममधून घेतलेला कुकर, वीस वर्षांपूर्वी हप्त्यावर घेतलेलं कपाट.. आम्ही काय टाटा-बिर्ला आहोत का? पण विचार करा, धाकटीने भातुकली खेळणं सोडलं त्याला किती तरी वर्षे झाली. मोठा आता क्रिकेट खेळत  नाहीच; पण तुमच्याकडे राहतसुद्धा नाही ना? स्कीममधून घेतलेल्या कुकरमध्ये स्टीम राहत नाही आणि त्या जुन्या कपाटात नको असलेल्या गोष्टीच ठेवता ना? मग त्यातल्या निदान अर्ध्या गोष्टी कमी करा.

अनावश्यक आणि भरमसाठ गोष्टींचा भार कमी करताना तीन मुद्द्यांचा विचार करा : चांगल्या, पण वापरात नसलेल्या वस्तूंचा योग्य पुनर्वापर, टाकून द्यायच्या वस्तूंची योग्य विल्हेवाट आणि उरलेल्या वस्तूंचं वर्गीकरण!- या तीनही मुद्द्यांचा विचार करून ठराविक कालावधीनंतर नियमितपणे घरातली अडगळ दूर केली पाहिजे.

आज  ज्येष्ठ असलेल्या पिढीत घरात आणलेली वस्तू  नष्ट होईपर्यंत घरातच असली पाहिजे, असा विचार होता. एकतर आजच्या मध्यमवर्गाएवढी सुबत्ता त्यांच्याकडे नव्हती. घरात येणारा पैसा कमी होता, त्याचबरोबर उपकरणं, कपडे, दागिने इत्यादी वस्तूंची उपलब्धता कमी होती. फ्रीज, फोनसाठी नोंदणी करावी लागे. कपडे वर्षाकाठी होत. आता मध्यमवर्गाला समोर ठेवून फोफावलेल्या बाजारपेठेबद्दल काय बोलावं? गरजेनुसार पुरवठा हे बाजारपेठेचं उद्दिष्ट असेल तर गरजा निर्माण करणं हे बाजारपेठेसमोरचं मोठं आव्हान आहे. तुमच्या डोक्यात कोंडा आहे? -आमचा शँपू वापरा. तुम्हाला घाम येतो? मग आमच्या कंपनीचे डिओ वापरा.. अशा जाहिरातींतून गरजा निर्माण केल्या जात आहेत. मुक्त अर्थव्यवस्थेमुळे जीवनशैली आरामदायक झाली, यात वादच नाही. पण हा आराम आपण विचारपूर्वक आखलेल्या जीवनशैलीमुळे वाढेल यात शंकाच नाही.

वस्तू कमी करा म्हणजे पैसे खर्च करू नका असं नाही. उलट वस्तू कमी असतील तर तुम्हाला उत्तम उपभोग घेता येईल. धूळखात पडलेल्या सीडी काढून टाका आणि उत्तमोत्तम म्युझिक सिस्टिम घरी आणून संगीताचा आनंद लुटा. बैठकीच्या खोलीत वर्षानुवर्षांपासून ठेवलेल्या शोभेच्या वस्तू काढून टाकल्या तर धूळ झटकण्यासाठी कमी श्रम लागतील आणि घर स्वच्छ दिसेल. परदेशी प्रवासात लागतील म्हणून वर्षानुवर्षे मुंबईच्या उकाड्यात साठवलेले स्वेटर- शाली गरिबांना देऊन टाकल्या तर त्याची जागा लेटेस्ट फॅशनचे कपडे घेतील. म्हणजे, तुमच्याच जीवनशैलीत सुखकारक बदल होतील. पुढच्यावेळी एखादी वस्तू विकत घेताना, ही वस्तू फार गरजेची नाही,  सहा आठ महिन्यात घराबाहेर जाईल मग घ्यायचीच कशाला? -असा विचार येऊन तुमचे पैसेही वाचतील.

आता ही अडगळ दूर करण्याची सुरुवात कशी करायची? - सोपं आहे. घरातून एक फेरफटका मारा. सुरुवात स्वयंपाकघरापासून करा. तिथली कपाटं उघडून प्रत्येक वस्तूकडे बघून मनाला विचारा, ही खरंच गरजेची आहे? गेल्या सहा आठ महिन्यात याचा वापर झाला आहे? येणारे सहा-आठ महिने ही लागणार आहे? आता हेच प्रश्न घरातली सगळी कपाटं उघडून सगळ्या वस्तूंना विचारा आणि ज्या ज्या वस्तूकडे बघून ही वस्तू अनावश्यक आहे, असं तुमचं मन तुम्हाला सांगेल ती वस्तू त्याच क्षणी घराबाहेर काढा.

- भक्ती चपळगावकर, मुक्त पत्रकार (bhalwankarb@gmail.com)

टॅग्स :Virat Kohliविराट कोहली